शब्दाचे सामर्थ्य १५

नाटक पाहता-पाहता नाटकात काम करावे, अशी मला इच्छा झाली. आमच्या शाळेच्या संमेलनातील‘माईसाहेब’या नाटकात किर्लोस्करवाडीला एका प्रयोगात मी काम केल्याचे आठवते. आमच्या नाटकाचे सूत्र-संचालन श्री. बाबूराव गोखले यांनी केले होते.

मला याच्यापेक्षा दुसरी चांगली नाटके पाहावीत, अशी इच्छा असे, पण योग येत नसे. बालगंधर्व, केशवराव दाते या नामवंत नटांची नावे नुसती ऐकत होतो; पण प्रयत्‍न करूनही त्यांची कामे पाहायला मिळत नसत. केशवराव दाते यांच्या महाराष्ट्र कंपनीचे नाटक कोल्हापूरला आहे, असे समजले. त्यांच्या‘प्रेमसंन्यास’ नाटकाची जाहिरात‘नवा काळ’मध्ये मी पाहिली आणि मनाने ध्यास घेतला, की हे नाटक पाहिले पाहिजे.

गावात माधवराव घाटगे नावाचे माझे एक मित्र होते. ते नुकतेच ट्रेंड शिक्षक म्हणून नोकरीला लागले होते. त्यांची नेमणूक कराडलाच झाली होती. माझ्यापेक्षा ते वयाने थोडे मोठे होते; पण आमची मैत्री जुळली होती. माझ्यावर प्रेम करणारे हे गृहस्थ होते.

मी माधवरावांना म्हटले,
‘केशवराव दाते यांचे काम पाहण्यास कोल्हापूरला जायचे काय?’

नुकत्याच त्यांचा शाळेतल्या नोकरीचा पगार झाला होता आणि त्यांच्या खिशात पैसे होते. ते मला म्हणाले,‘जरूर जाऊ या. परंतु कोल्हापूरमध्ये राहणार कुठे? तेथे माझी कुणाशी ओळख नाही.’
मी म्हणालो, ‘नको कोणाची ओळख, दुपारच्या सर्व्हिस मोटारने कराडहून निघून संध्याकाळी कोल्हापूरला जायचे. कुठेतरी हॉटेलात चहा-फराळ करून नाटक पाहून झाले, की थेट स्टेशनवर येऊन रात्रीच्या गाडीने कराडला परत येऊ.’

माधवरावांना माझी सूचना पटली आणि आम्ही दोघे कोल्हापूरला त्या वेळच्या सर्व्हिस मोटारने गेलो. कोल्हापूरला पोहोचायला तीन तास लागत असत. दुपारनंतर आम्ही निघालो. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी कोल्हापूरला पोचलो. कोल्हापूरची काहीच कल्पना नव्हती. विचारीत-विचारीत पॅलेस थिएटरकडे गेलो. तिकीट-विक्री सुरू होती. दोन तिकिटे घेतली. शेजारच्या हॉटेलमध्ये जाऊन चहा, भजी खाल्ली आणि थिएटरमध्ये जाऊन आपल्या जागी बसलो. आम्ही एवढ्या लांबून‘प्रेमसंन्यास’पाहायला आलो होतो; पण कोल्हापूरकरांना‘प्रेमसंन्यास’पाहण्याची फारशी आवड दिसली नाही. कारण अर्धेअधिक थिएटर मोकळेच होते. नाही म्हटले, तरी अशा गोष्टींचा परिणाम मनावर राहतो. नाटक सुरू झाले आणि जयंताच्या भूमिकेत मी केशवराव दात्यांना पाहिले. त्यांचा अभिनय, शब्द उच्चारण्याची पद्धत मला फारच आकर्षक वाटली. ज्यासाठी मी आलो होतो, त्याचे चीज झाल्यामुळे मला समाधान झाले.

रात्री दीड-दोनच्या सुमारास नाटक संपले.

आता पुढे काय करायचे, असा आमच्यापुढे प्रश्न होता. तेव्हा पॅलेस थिएटरपासून चालत आम्ही रेल्वे स्टेशनपर्यंत गेलो. रेल्वे स्टेशनवर तेव्हा कराडला जाणारी कुठलीच गाडी नव्हती. पॅसेंजर वगैरेही तेथे कोणी नव्हते. सर्व एकदम शांत शांत होते. पांघरायला गरम असे काही नेले नव्हते. फक्त अंगांवरचे कपडे होते. निदान स्टेशनच्या भिंतीचा आडोसा तरी होता; पण आमची पंचाईत केली रेल्वेच्या पोलिसाने. त्याने चौकशी सुरू केली,