यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ४०

थोरले बंधू गणपतराव व धाकडे यशवंतराव यांच्यात चर्चा, प्रश्नोत्तरे व संवाद चालू लागला!

“बहुजन समाजाने शिकले पाहिजे हे खरे, पण कशासाठी? निव्वळ नोकरीसाठी की देशासाठी काही विशेष करण्यासाठी?... निव्वळ ब्राह्मणांना विरोध करून बहुजन समाजाचे हित कसे होईल?” यावर गणपतरावांनी उत्तर दिले:- “ब्राह्मणांचा द्वेष केलाच पाहिजे असा आग्रह नाही. पण सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक बाबतीत या मंडळींनी इतर समाजाची गळचेपी केलेली आहे. यातून मुक्त नको का व्हायला...? (पृ. ३४)

यशवंतरावांना सत्यशोधक-ब्राह्मणेतर चळवळीचा उद्देश समजावा म्हणून गणपतराव यांनी त्यांना पंढरीनाथ पाटील कृत महात्मा फुले चरित्र वाचावयास दिले. ते यशवंतरावांनी वाचले व निर्णयास आले:- “म. फुल्यांचा विचार मूलगामी आहे व तो काही नवीन दिशा दाखवतो आहे असे मलाही वाटले. त्यांनी उभे केलेले काही प्रश्न तर निरूत्तर करणारे होते. शेतकरी समाजाची होणारी पिळवणूक, दलित समाजावर होणारा अन्याय आणि शिक्षणापासून वंचित ठेवलेला बहुजन समाज व स्त्रिया यांचे प्रश्न सोडविल्याखेरीज देशाचे कार्य होणार नाही. हा त्यांच्या विचारांचा सारांश माझ्या मनामध्ये ठसला.” सत्यशोधक गणपतराव व टिळकाभिमानी यशवंतराव यांच्यात चर्चा चालूच राहाते!

यशवंतराव त्यांना म्हणतात:- “त्यांनी (फुल्यांनी) उभे केलेले प्रश्न महत्त्वाचे आहेत; पण त्यासाठी कुठल्यातरी एका जातीचा द्वेष केला पाहिजे... हे मला पटत नाही. जे समाज मागे पडले आहेत. त्यांना जागृत करणे, त्यांच्यात नवीन धारणा निर्माण करणे हाच मार्ग उत्तम आहे...” (पृ. ३४)

चव्हाणांचेच मूळ उतारे आधारास घेण्यामुळे त्यांनी त्यांच्या “कृष्णाकाठ” या आत्मचरित्रात किती सोपी, सुबोध, प्रसन्न व बालबोध मराठी भाषा वापरली आहे, हे समजून येते. आत्मचरित्र त्यांनी तोंडी सांगितले व ते उतरून घेतले. यामुळेही हा सोपेपणा, सहजपणा आला. निरक्षर शतेकरी व बाया बापडी यांनी समजेल अशी ही मराठी आहे. हा एक या आत्मचरित्राचा विशेष आहे. गणपतराव त्यांचा सत्यशोधकी  विचार मांडतात व यशवंतराव त्यांची स्वत:ची बनलेली स्वतंत्र मतेदेखील स्वच्छ सांगतात. दोघा बंधूमधील हा संवाद वादळेवाद आणि त्यावेळेचा मतभेद समाजकारणाच्या अभ्यासात उपयोगी होणारा आहे. हल्ली “सत्यशोधक समाज” ही संस्था, परिषद किंवा चळवळ म्हणून वर्तमान नाही. हा सर्व विषय ब्रिटिश साम्राज्य सत्ता येथे असताना पुढे आला होता.

परंतु इतिहास म्हणून हा विषय अँकॅडमिक झाला आहे. देशी व परदेशी विद्वान या विषयावर अभ्यासांती लिहित-बोलत असतात. म्हणूनही हा विषय प्राध्यापकांना, दुय्यम व विश्वविद्यालयीन विद्यार्थ्यांना उपयोगी व्हावा म्हणूनही मी येथे घेतला आहे. असो. यशवंतराव म्हणतात:-