यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ३६

जाधवरावांना शिंद्यांचे राष्ट्रीय राजकारण व म. गांधीनिष्ठा मुळीच मान्य नव्हती. शेवटी जाधवराव एकटे राहिले! शिंद्यांची राष्ट्रीय मराठा संघाची कल्पना चव्हाणांनी एकपरी पुरी केली. ‘बहुजन समाज म्हणजे ज्यांची सुखदु:खे समान आहेत तो’ अशी व्याख्या यशवंतरावांनी केलेली आढळली. मराठा म्हणजे म्हणजे मराठी सर्व भाषिक, अशी म. फुल्यांची व्याख्या व व्याप्ती होती. ती यशवंतरावांच्या समाजकारण (व राजकारण) कृतीत उतरली. सांगण्याचा मुद्दा हा की – राष्ट्रीय अखिल भारतीय दृष्टी व काँग्रेसनिष्ठा हे दोन मुद्दे शिंदे व यशवंतराव यांच्यात समान दिसले. अशी काही अधिकाधिक वैषम्यातही साम्ये सांगता येतात. जाधवरावांनी मराठा शिक्षण परिषद जोपासली होती. हिच्यामार्फत पुण्यास निघालेल्या शाहू कॉलेजला यशवंतरावांनी अरण्येश्वर विभागात मोठी जागा- जमीन सरकारातून दिली. सहकारी चळवळीचा प्रसार हा समान मुद्दा होता.

विवाद्य झालेले पुण्याचे भांबुर्डा (शिवाजीनगर) येतील शिवस्मारक व शिवाजी प्रिपरेटरी स्कूल ही मिलीटरी शाळा उभारण्यात जाधवरावांनी महत्त्वाची कामगिरी केली. यशवंतरावांनी प्रतापगडावर शिवाजी पुतळा उभारला. इतिहासात भूत व भविष्यकाळ यांच्यात संबंध आढळतात.

मराठी भाषा बाळबोध लिहावी. संस्कृत शब्द वापरून ती बोजड करू नये असा ‘दीन बंधू’ कर्ते बिर्जे व जाधवरावांचा आग्रह असे. ‘कृष्णाकाठ’ आत्मचरित्र असे सोप्या व बोली मराठी भाषेत लिहिले आहे. त्यात पंडिती मराठीचा बडेजाव नाही. जाधवराव व यशवंतराव साहित्यिक होते.

लोकमान्य टिळक सत्यशोधक-ब्राह्मणेतर परिषदांतून जो राज्यनिष्ठेचा (साम्राज्यनिष्ठेचा) पहिला हमखास ठराव पास होई, त्याविरूद्ध होते. यशवंतरावांवर लोकमान्यांच्या जहाल राजकारणाचा प्रभाव होता. टिळकांच्या समाज सुधारणांविरोधी पवित्र्यावर चव्हाणांनी टीका केल्याचे सापडले नाही. चव्हाणांचे राष्ट्रीय समाजकारण समजावे म्हणून प्रास्ताविक हा विस्तार केला आहे एवढेच. शेवटपर्यं एकाकी राहून जाधवरावांनी सत्यशोधक समाजाचे कार्य पाहिले. काँग्रेसमध्ये ते कधीच गेले नाहीत.

‘जाधवराव व भाऊराव पाटील’ यांनी सातारा जिल्ह्यात जी समाजजागृती केली. तिचा उपयोग चव्हाणांना झालाच नाही असे नव्हे. ‘जागृत सातार’ चव्हाणांना उपलब्ध होता.