साहेब यशवंतरावजी चव्हाण-२६

“सरकारावर टीका करायचा अधिकार तुम्हाला निश्चितच आहे. पण, crisis च्या ‘लोकसत्ते’ चा १० टक्के पाठिंबा ‘विशाल सह्याद्रीच्या’ १०० टक्के पाठिंब्यापेक्षा मी जास्त मोलाचा मानतो.”
तसा मुख्यमंत्री-पदाचा मुकुट काटेरीच असतो!
“फड नासोचि नेदावा
पडिला प्रसंग सावरावा
अतिवाद न करावा
कोणी एकासी||”
हे समर्थ-सूत्र मनात बाळगूनच मी व्यवहार करीत राह्यलो. शेवटी, ‘संयुक्त महाराष्ट्राचा मंगल-कलश मी  आणला, असे लोक बोलू लागले. खंर तर, समितीच्या कर्तृत्वाचं यश मी केव्हाच मोकळेपणानं मान्य केलं होतं.
एकच प्रसंग सांगतो:
पं. नेहरूंना काळी निशाण दाखविणारा मोर्चा वाईहून निघाला, तो पोलिसांनी गल्लीतच अडवला. मी त्यांना म्हटलं,
“असं करू नका! पंडितजींना लोकांचा संताप तर दिसलाच पाहिजे.. मोर्चा हामरस्त्यापर्यंत, पंडितजींच्या नजरेच्या टप्प्यात येईपर्यंत पुढं येऊ द्या!  आणि एसमेना माझा निरेप सांगा: म्हणावं, मोर्चा शांतपणे येईल, एवढी काळजी घ्या.”
२७ एप्रिलला आम्ही शिवनेरीवरून जगाला गर्जून सांगितलं:
“महाराष्ट्र राज्याच्या निमित्तानं आज एक नवं कर्तृत्वं जन्माला येतंय... तृप्तीचा हा क्षण छत्रपतींच्या पुण्याईनं पहायला मिळाला!
(तुतारीचा मंगल ध्वनी)
ही राजसत्ता लोक-कल्याणासाठी राबणार आहे. ४०० वर्ष संतांनी साधलेलं हे मराठी माणसाचं ऐक्य, नव्या महाराष्ट्रानं आणखी दृढ केलं पाहिजे!”
३० एप्रिलला आम्ही पंडितजींना शब्द दिला:
“जर कधी हिमालयावर संकट आलंच, तर ‘सह्याद्री’ आपल्या काळया फत्तराची छाती हिमालयाच्या रक्षणासाठी उभी करील!”
त्या मध्यरात्री नव-महाराष्ट्राची पहिली पहाट उगवली-
(घन:श्याम सुंदरा-ही भूपाळी ऐकू येते)
संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालं!
जीवघेण्या खिंडीतनं आम्ही पार पडलो.... लोकांच्या अपेक्षांना आणि उत्साहाला उधाण आलं! आधुनिक महाराष्ट्राच्या उभाणीचा ‘सह्याद्री’ एवढा प्रश्न माझ्यापुढं उभा होता. या पर्वतारोहणाला माझ्या मनाची तयारी होती.
पहिलाच प्रश्न होता:

‘हे राज्य मराठा की मराठी?’
महाराष्ट्राच्या इतिहासातून चालत आलेल्या ह्या परस्पर-अविश्वासाच्या गाठी होत्या. मला हे राज्य मराठ्यांचं करायचं नव्हतं, ‘मराठी’ चंच करायचं होतं!.... ज्यांना धड लिहिता-वाचता येत नाही, बोलताही येत नाही, अशा सामान्यातल्या सामान्य मराठी माणसाला ‘हे राज्य आपलं आहे’ असे वाटेल, असं राज्य मला उभं करायचं होतं.

महार-वतनं नष्ट करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ३० वर्षापूर्वी चळवळ केली.... त्यासाठी माझ्या सरकारनं कायदा केला!
औरंगाबादला मी कलेक्टरांची ‘मीटिंग’ बोलावली, माझं भाषण संपल्यावर एक पोरसवदा कलेक्टर उठला. म्हणाला,
“साहेब, कशाला हा कायदा करता? एक कोटी रूपये खर्च येईल सरकारला-“

“खाली बैस!” मी ओरडलो, “बस खाली! गुलामगिरीच्या बेडया तोडायचा खर्च मोजायला मला सांगतोस? बस खाली!”
दलित बंधू नव-बौद्ध झाले; धर्म बदलंला, तरी परीस्थिती बदलत नव्हती. घटनेनं दिलेल्या मागासवर्गीयांच्या सवलतींना ते मुकणार होते... नव्या सरकारनं त्या सवलती नव-बौध्दांनाही चालू ठेवल्या!

ब्राम्हण-ब्राम्हणेतर अविश्वासाचे वारे तर, पेशवाईपासून वहात होते. गांधीजींच्या हत्येनंतर त्यांचा स्फोट झाला. अनेक ब्राम्हणांची घरे जळाली. त्यांच्या पुनर्वसनाची सगळी कर्ज माझ्या सरकारनं माफ केली.

‘ब्राम्हणांच भवितव्य’ हे दिनकरराव जवळकरांचं भाषण मी अगदी लहानपणी ऐकलं होतं. ‘देशाच दुष्मन’ हे त्यांचं पुस्तकही वाचलं होतं... त्या भाषणानं, त्या पुस्तकानं मी मनानं आणि विचारानं आमूलाग्र बदलून गेलो. जवळकरांनी टिळकांवर केलेली टीका बरोबर नव्हती. लोकमान्य टिळक हे इंग्रजांविरूध्द लढणारे एक महान सेनापती आहेत. अशा थोर माणसावर टीका करणारी ही माणसं इंग्रजांचे मित्र तर नसतील, अशी शंका माझ्या मनात येऊन गेली.