यशोधन-१२

चांगले म्हणणा-यालाच दोष देण्याचा अधिकार असतो. मुलाला मारण्याचा हक्क सख्ख्या आईला असावा. सावत्र आईला नसावा. आणि कायदाच करावयाचा असेल, तर बापाला मुळीच नसावा. कारण, येथे मारणा-या डोळ्यांतही मार खणा-याप्रमाणेच पाणी येते. सख्ख्या आईशिवाय हे शक्य नाही आणि जनता ही आईच आहे असे मी मानतो.

जातीयवादी राजकारण म्हणजे काय?  जेव्हा तुम्ही राजकारणाचा विचार करता, आणि मी हिंदु आहे व हिंदुत्वाचा मला विचार केला पाहिजे, माझ्या हिंदूत्वाला जास्त प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे, किंवा माझ्या इस्लामला जास्त प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, असा ज्या वेळी तुम्ही मनात विचार आणता त्यावेळी राजकारण जातीयवादी बनते. या जातीयवादी राजकारणाचा दुसराही एक भाग महत्त्वाचा आहे. जे लहान लहान अल्पसंख्य आहेत त्यांच्या मनामध्ये संशय निर्माण झाला, शंका निर्माण झाली, तर ती समजण्यासारखी आहे; परंतु जो बहुसेख्य समाज आहे तोच जर जातीयवादी झाला तर राष्ट्र संपले म्हणून समजावे.
 
आम्ही या देशात किंवा त्या देशाचे मित्र आहोत असे जाहीर करणे म्हणजे अलिप्ततावाद नव्हे, तर आपल्याला सर्वांचेच मित्र व्हावयाचे आहे ही मूलभूत गोष्ट आहे. आपण जागतिक शांततेचे पुरस्कर्ते आहोत, कारण जागतिक शांततेखेरीज प्रगती अशक्य आहे. पण आम्हांला जागतिक शांतता हवी असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा अमुक वा तमुक देशाशीच आम्ही मैत्री करू, असे आपल्याला म्हणता येणार नाही.
 
सामान्यपणे समाजवादाच्या माझ्या कल्पनेने तीन कसोट्या आहेत. सर्वांना समान संधी ही त्यातली पहिली कसोटी. खरे म्हणजे ही लोकशाहीची व्याख्याच मानली गेली होती. परंतु राजकीय लोकशाहीचा अनुभव नसल्यामुळे तिच्यातून मग समाजवादाचा विचार निघाला आणि सर्वांना समान संधी ही समाजवादाची एक कसोटी समजली गेली. नंतर उत्पादनाच्या पाठीमागची प्रेरणा, ही वैयक्तिक नफेबाजीपेक्षा समाजाच्या सुखाची, समाजाच्या हिताची असली पाहिजे, ही समाजवादाची दुसरी कसोटी. आणि उत्पादनाबरोबरच त्याच्या विभागणीचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा असल्यामुळे, ही विभागणी होत असताना लोकांच्या गरजा आणि त्यांच्या विकासाची शक्याशक्यता यासंबंधीचा विचार ही समाजवादाची तिसरी कसोटी होय.

देशाच्या आर्थिक प्रगतीचे जे तत्त्व आपण स्वीकारले आहे, त्या तत्त्वाचा आपल्याला त्याग करता येणार नाही. ज्या दिवशी ह्या तत्त्वाचा आपण त्याग करू त्या दिवशी संरक्षणाच्या प्रशनांची धुळधाण होईल, हे आपण नक्की समजा. माझ्या या सगळ्या म्हणण्याचा सारांश असा की, देशाची अंतर्गत नीती, परराष्ट्रनीती आणि देशाची संरक्षणनीती ही परस्परावलंबी असतात, एवढेच नव्हे तर राष्ट्रीय नीतीच्या एकाच सूत्राची ही केवळ वेगवेगळी रूपे असतात. कुठल्याही देशाची संरक्षणाची नीती अलग, परराष्ट्रनीती अलग आणि अंतर्गत आर्थिक नीती अलग, अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणजे त्या देशाचे भवितव्य धोक्यात येते.
 
हिंदुस्थानचे स्वातंत्र्य हिरावून घेऊन येथे स्वत:चे अधिराज्य इंग्रजांनी निर्माण केले होते, त्यांनीच येथून जाताना एक विषारी विचार पाठीमागे सोडून दिला. हा विषारी विचार हिंदुस्थानच्या दृष्टीने शाप ठरला आणि या विषारी विचारातूनच पाकिस्तानचा जन्म झाला. तो विचार हा की, येथील मुसलमान हा एक स्वतंत्र देश आहे. धर्म हा एक स्वतंत्र देश बनू शकतो, हा भयानक विचार जर हिंदुस्थानने स्वीकारला तर, हिंदुस्थानला हिंदुस्थान म्हणून राहण्याची शक्यताच नाही.