यशोधन-१०

आपल्याला लोकांच्या जीवनातील दैन्य व दारिद्र्य नाहीसे करायचे आहे. त्यासाठी आपण विकासाच्या कार्यक्रमात आपण गुंतलो असताना आपले राजकीय विचारांचे ज्ञान ताजे ठेवले पाहिजे. आपण कशासाठी व कोणासाठी विकासयोजना राबवीत आहोत, याचे ज्ञान दिलोदिमागामध्ये असले पाहिजे. कार्यकर्त्याचा राजकीय विचार पक्का पाहिजे. विद्यमान परिस्थितीचे सम्यक ज्ञान व जळते प्रश्न त्याला माहीत असले पाहिजेत आणि आपल्या वाचनातून व परिस्थितीच्या निरीक्षणातून त्याला त्या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. आज आपल्यापुढे जरूर काही ज्वलंत प्रश्न आहेत. प्रश्न नसलेले हे जीवन राहणार नाही. हे प्रश्न सोडविण्यासाठी लागणारा आत्मविश्वास व विचार कॉंग्रेसजवळ निश्चितपणे आहे.
 
व्यक्तीच्या किंवा देशाच्या जीवनामध्ये जेव्हा संशयाचे, संभ्रमाचे, संकटाचे प्रश्न निर्माण होतात, तेव्हा आपल्या तत्त्वांची आठवण करणे अतिशय महत्त्वाचे असते, असे मी मानतो. अर्जुनाला संभ्रम निर्माण झाला त्या वेळी त्याला भगवान श्रीकृष्ण भेटले; पण तुम्हां-आम्हांला थोडेच भगवान श्रीकृष्ण भेटणार आहेत? तुमचे-आमचे भगवान श्रीकृष्ण म्हणजे आपली मूलभूत तत्त्वे, आपले मूलभूत सिध्दांत.
 
पक्ष चालतात ते निष्ठेने चालतात हे जरी खरे असले, तरी लोकशाही पक्ष हे विचारांच्या निष्ठेने चालले पाहिजेत, असा तुमचा-आमचा आग्रह असला पाहिजे. व्यक्तीवरच्या निष्ठा चुकीच्या आहेत. त्या निष्ठा काम देत नाहीत. कारण व्यक्ती शेवटी चूक करू शकते. मनुष्य कितीही मोठा असला, तरी त्याच्या हातून चूक होणार नाही असे कोणीही करू शकणार नाही.
 
आपण माझा शिवाजीमहाराजांबरोबर आणि लोकमान्य टिळकांबरोबर उल्लेख केला. पण या सर्व खोट्या तुलना आहेत. या खोट्या तुलनेमध्ये तुम्ही फसू नका आणि कृपा करून मला फसवू नका, असे माझे सांगणे आहे. एकच शिवाजीमहाराज होऊन गेले आणि एकच टिळक होऊन गेले. महाराष्ट्राचा इतिहास ज्यांनी घडवला ते शिवाजीमहाराज आता पुन्हा निर्माण होणार नाहीत. ब्रिटिशांच्या सत्तेखाली दबलेल्या हिंदुस्थानला स्वराज्याचा जन्ममंत्र देणारे लोकमान्य टिळक एकदाच होऊन गेले, ते आता पुन्हा होणार नाहित; पुन्हा होणार नाहीत असे म्हणण्याचे कारण हिंदुस्थान पुन्हा परतंत्र होणार नाही.
 
आज आपली ही जी छोटी छोटी राज्ये झाली आहेत, त्यांच्याकडे आपण आपल्या विकासाचे एक साधन म्हणून पाहिले पाहिजे; पण छोटी छोटी राज्ये होऊनही पूर्वीचे हेवेदावे कायम राहणार असतील, तर ते एक संकटच ठरेल. ह्या साधनांचा उपयोग लोककल्याणासाठी होतो आहे किंवा नाही, हे आपण पाहिले पाहिजे. ह्या कसोटीवर महाराष्ट्र राज्य उतरत नसून महाराष्ट्र राज्यापासून विदर्भाचे नुकसान होत आहे, अशी माझी खात्री करून दिली, तर मी स्वत:च हे महाराष्ट्र राज्य मोडून टाकीन.
 
कोठलाही विचार हा क्रियाशील होण्यापूर्वी भावनेने समजून घ्यावा लागतो आणि जर भावनेने समजून घ्यावा लागतो आणि जर भावना अपुरी असेल किंवा चुकीची असेल, तर तीतून येणारा निर्णय, तीतून येणारा विचार हा अपुरा आणि चुकीचा असण्याची शक्यता असते आणि म्हणून ‘अवेअरनेस’ ची अतिशय आवश्यकता आहे.