यशोधन-८

अगदी साध्या प्रतिकाच्या भाषेत बोलावयाचे झाल्यास मला हिंदुस्थानचे असे चित्र दिसते आहे की, रस्ता डोंगराळ आहे, वेळ उन्हातान्हाची आहे, जवळपास पाणी मिळेलच याची खात्री नाही, साथीला माणसे असतीलच असा भरवसा नाही; परंतु दोम्ही खांद्यांवर हे बोजे घेऊन वाटचाल ही केलीच पाहिजे. हिंदुस्थानची जी सफर चालू आहे, त्या सफरीतला आजचा जो मुक्काम आहे, त्याचे हे चित्र आहे.
 
महाराष्ट्राच्या राजकारणात जबाबदारीने काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे. मी हिंदुस्थानच्या राजकारणात गेलो काय किंवा जगाच्या राजकारणात गेलो काय, शेवटी माझे पाय या मातीवर उभे आहेत आणि या मातीतच मला परत यावयाचे आहे, हे मला विसरून चालणार नाही.
 
विणकर जेव्हा महावस्त्र विणण्यासाठी बसतो, तेव्हा ते महावस्त्र ताबडतोब तयार होत नाही. सुरवातीला जेव्हा तो आपल्यासमोर गुंतागुंतीचे सगळे लांब धागे टाकून बसतो, तेव्हा आपल्याला सगळा गोंधळ दिसतो. एका धाग्याशी दुसरा धागा समांतर अशा पध्दतीने टाकलेले अनेक धागे आपल्याला दिसतात. त्यावरून त्यातून हा कसले महावस्त्र निर्माण करणार अशी आपल्याला शंका येते;  परंतु तो जेव्हा त्या समांतर धाग्यांमधून आडवे धागे टाकत जातो, तेव्हा त्यातून हळूहळू सुंदर महावस्त्र तयार होत चालल्याचा प्रत्यय आपणास येतो. समाजवाद आणण्यासाठी अशाच त-हेचा प्रयत्न हिंदुस्थानमध्ये करावा लागेल आणि तो सर्वांना करावा लागेल. आमची आशी इच्छा आहे की, तो समाजवाद लवकरात लवकर यावा; परंतु त्याची काही विशिष्ट प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेतूनच आपल्याला जावे लागेल, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे.

ज्या ज्या वेळी या विचारांच्या आचाराबाबत दुबळेपणा घडेल, मग कॉग्रेस पक्षाकडून घडो किंवा इतर कोणत्याही राष्ट्रीय पक्षाकडून गडो, त्या त्या वेळी राष्ट्रीय जीवनावर संकट येईल आणि या संकटाबरोबर लोकशाहीसुध्दा संकटात येते की काय असे वाटू लागेल. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सगळ्यात मोठा आवाज आपल्याला ऐकावयास सापडतो तो हा की, लोकशाहीवर संकट आले आहे; पण एकतेचा विचार, धर्मनिरपेक्षतेचा विचार, समाजवादाचा विचार आणि लोकशाहीचा विचार हे या देशातील जे पायाभूत विचार आहेत त्यांत गडबड झाली, तरच अशा प्रकारचे संकट येऊ शकेल.

कुठल्याही व्यक्तिच्या विचारांवर किंवा निष्ठेवर आधारलेले काम टिकत नाही. महात्मा गांधींसारख्या माणसाला लोक विसरले. मी उद्या सत्तेतून गल्यानंतर माणसे मला विसरतील हे मला ठाऊक आहे.
 
माणसे शेवटी जी मोठी होतात, ती निव्वळ मोठ्यांच्या पोटी जन्माला येतात म्हणून नव्हे. मोठ्यांच्या पोटी जन्माला आल्यामुळे मिळणारे मोठोपण आता जुन्या इतिहासात जमा झाले आहे. आधुनिक काळात समाजामध्ये अनेक प्रश्न, अनेक आव्हाने निर्माण होत असतात. त्यांचा धैर्याने स्वीकार करून त्यामध्ये यशस्वी होण्याचा जी माणसे प्रयत्न करतात, तीच माणसे मोठी होतात.
 
जनता आणि नेते यांचे असे हे माता आणि पुत्र यांचे नाते आहे. जनता हीच शेवटी माता. तिच्या आशीर्वादातून, तिच्या सर्वस्वातून, तिच्या भावनेतून, तिच्या परंपरेतून नेतृत्त्व उभे राहते. जनता व नेतृत्त्व यांचे हे नाते निर्माण होण्याचे काम इतिहासकाळात घडावे लागते.