आमचे मुख्यमंत्री -४९

कृषिनिष्ठ पुरस्कार सुरू करून कृषिउद्योगाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्यांनी शेतक-याकरता वीस कलमी कार्यक्रम आखला. त्यात शेतक-यांना कर्जमाफी, अल्पभूधारकांना विहिरीसाठी अनुदान, शेतमजुरांच्या किमान वेतनात वाढ, शेती-पंपांना वीजपुरवठा इत्यादींचा अंतर्भाव होता. आय.आय.टी. बरोबर बायो टेक्नोलॉजीचे उद्योग कसे वाढतील ह्यावर त्यांनी भर दिला.

औद्योगिक दृष्टिकोन व कार्य

उद्योगांना उत्तेजन देण्याकरता त्यांनी औद्योगिक वसाहतींची वाढ केली. वीज व विक्रीकरात सवलत दिली. आजारी उद्योग व अडचणीत असलेले परदेशी उद्योग ह्यांना त्यांनी मदत केली. उदा., कमानी. तसेच बंद गिरण्यांची विक्री करून त्या पैशातून गिरण्यांच्या आधुनिकीकरणाच्या योजना हाती घेतल्या. मागास भागांचा विकास करण्याकरता वैधानिक विकास महामंडळे स्थापन केली. साखर उद्योगाला वळण लावण्याचा प्रयत्न केला. पर्यटन विकास व मत्स्योद्योग विकासाला वाव देण्याकरता बंदराच्या विकासकार्यावर लक्ष दिले. कृषीआधारित पूरक व्यवसायाला प्रोत्साहन दिले. त्यांनी आखलेल्या औद्योगिकरणाची वैशिष्टये पुढीलप्रमाणे होती –

निर्याती अभिमुखी
विकासावर भर
अनिवासी भारतीय व विदेशी उद्योजकांना गुंतवणूक करण्यास उत्तेजन
सहकारी उद्योगांना उत्तेजन
कृषिउद्योगाला उत्तेजन
रोजगार निर्मितीला प्राधान्य
उद्योजकतेचा पाया विस्तृत करणे
औद्योगिक विकास पर्यावरणाशी सुसंबध्द करणे

त्यांनी गाव तेथे रस्त हे धोरण आखले. कारण त्यामुळे उद्योगांना विक्रीकेंद्रे उपलब्ध होतात. वीजटंचाई दूर करण्याकरता त्यांनी एन्रॉन, दाभोळ प्रकल्पाची चर्चा सुरू केली.

शिक्षणक्षेत्रालाही पवारांच्या कार्यक्रमात अग्रक्रम होता. राष्ट्रीय योजनेद्वारे निरक्षरतेचे पूर्ण उच्चाटन करणे, ग्रामीण भागात उच्च शिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून महाविद्यालये, वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालये स्थापण्यास उत्तेजन दिले. शिक्षण, गृहनिर्माण संस्था स्थापण्यास उत्तेजन दिले. मुलींना मोफत शिक्षणाची व्यवस्था केली व त्यांच्याकरता पुण्यात एक वसतिगृह बांधले. आदिवासी मुलींना गणवेश व पुस्तके मोफत देण्याची व्यवस्था केली.