आमचे मुख्यमंत्री -४४

रोजगाराकरता त्यांनी स्वयंरोजगाराला उत्तेजन दिले. स्वयंरोजगारासाठी बिनतारण आर्थिक साहाय्य देऊ केले. रोजगार हमी योजनेला सक्रिय साहाय्य व उत्तेजन दिले. सुशिक्षित बेकारांकरता भांडवलाची सोय करवून दिली.

दादांचा आवडता विषय म्हणजे सहकार चळवळ. ह्या चळवळीचे महाराष्ट्रातील अध्वर्यू दादाच. त्यांची विचारधारा अशी होती की सहकार ही संकल्पना फक्त शेती, कारखाने, कर्जपुरवठा इतपत मर्यादित न ठेवता तिचा विस्तार त्यांनी सर्व स्तरांवर केला. त्याकरता त्यांनी ग्राऊंडनट (शेंगदाणे) को. सोसायटी स्थापन केली. पेंड भुईमूग ह्या पिकावर प्रक्रियात्मक उद्योग उभे करणे हा अशा सोसायट्यांचा प्रमुख हेतू. त्याचप्रमाणे कोरडवाहू शेतक-यांना सातत्याने उत्पन्न मिळवून देण्याकरता व त्यांना शेतीची अवजारे, यांत्रिक उपकरणे ह्या गोष्टी पुरविण्याकरता सहकारी तत्वावर कोऑपरेटिव्ह इंजिनियरींग सोसायटी स्थापन केली. शेतकरी सहकारी साखर कारखाना व सहकारी औद्योगिक वसाहत ही रोजगार निर्मितीच्या दृष्टीने दादांची मोठी कामगिरी आहे. दादांनी दुधाच्या सहकारी संस्था, कामगार गृह सहकारी संस्था आणि त्यांच्या पतपेढ्या स्थापन करण्यास उत्तेजन दिले. खताकरता महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह फर्टिलाझर्स ॲड केमिकल्स ही संस्था स्थापन केली. त्यांनी कोंबडी सहकारी संस्था व संकरित बियाणे केंद्र स्थापन करण्यात पुढाकार घेतला.

दादांनी सहकारी क्षेत्रात एक नवी कल्पना रुजविली ती म्हणजे भाग विकास निधी व शिक्षण निधी. ह्याचा अर्थ साखर कारखान्याच्या भरभराटीचा वाटा सामान्य लोकांपर्यत पोहोचला पाहिजे. ह्याकरता कारखान्यांचे ग्रामीण विकास केंद्र बनले पाहिजे. शिक्षणाकरता महाविद्यालये, औद्योगिक शिक्षणाकरता तांत्रिक शिक्षणसंस्था स्थापन केल्या पाहिजेत अशी दादांची विचारधारा होती. त्याचप्रमाणे शेती उत्पन्नावरील प्रक्रियेचे कारखाने, सूत गिरण्या, कागद निर्मिती ह्या संस्था सुरू करण्याकरता नेतृत्व दिले पाहिजे अशी त्यांची अपेक्षा होती. म्हणूनच त्यांनी २३-५-१९८३ रोजी विनाअनुदान तत्वावर अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतने सुरू केली.

शिक्षण क्षेत्रात त्यांचे कार्य म्हणजे अमरावती येथे विद्यापीठाची स्थापना व विनाअनुदान तत्वावर महाविद्यालये स्थापण्याची परवानगी देणे. या ऐतिहासिक निर्णयामुळे महाराष्ट्रात सर्व विषयांसाठी म्हणजे मेडिकल इंजिनियरींग व्यवस्थापन महाविद्यालये स्थापन होऊन अनेकांना उच्च शिक्षणाची संधी मिळाली. त्यामुळे शिक्षणमहर्षी असा एक नवा वर्ग शिक्षणक्षेत्रात निर्माण झाला. त्यामुळे अनेक अनिष्ट प्रकार प्रचारात आले ही गोष्ट वेगळी.

गरीबातील गरीबाला शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी दहावीपर्यंत मुलांना मोफत शिक्षणाची सोय केली. प्राथमिक शाळांतील मुलांना पौष्टिक आहार पुरविण्याचे धोरण आखले. तांत्रिक शिक्षण देण्याकरता सहकारी इंडस्टियल स्कूल स्थापन केले. क्रीडा विकासाकरता कांदिवली येथे स्वतंत्र संस्थेची स्थापना केली. वाचनालयांना उत्तेजन देण्याकरता ग्रंथालयांना डॉ. आंबेडकर पुरस्कार देण्याची सोय केली. पुणे विद्यापीठात त्यांनी संत नामदेव अध्यासन स्थापन केले. कोल्हापूर येथे चित्रनगरी उभी केली. त्यांनी औद्योगिक शिक्षण संस्था स्थापण्यास उत्तेजन दिले. उद्योगकेंद्रे व आरोग्यकेंद्रांच्या स्थापनेला वेग आला तो दादांच्याच कारकिर्दीत. इंदिरा गांधी यांचा २० कलमी कार्यक्रम दादांनी प्रभावी रीतीने कार्यान्वित केला.