आमचे मुख्यमंत्री -३७

12 shankarrao chavan
१२. श्री. शंकरराव चव्हाण

संयुक्त महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री
(२१-२-१९७६ ते १२-३-१९८६। २०-६-१९८८)

मराठवाड्यातील श्री. शंकररावजी हे पहिले मुख्यमंत्री. त्यांच्या शिस्तशीर व्यक्तिमत्वामुळे त्यांना हेडमास्तर म्हणत असत. संतभूमीत – पैठणला जन्म झाल्यामुळे त्यांचे एक सात्विक व निष्कलंक चारित्र्य होते. संबंधित विषयाची त्यांची जाण अतिशय खोलवर असे.

जन्म व शिक्षण

शंकररावांचा जन्म १४-७-१९२० रोजी पैठण येथे झाला. एका मध्यमवर्गीय सुशिक्षित शेतक-याच्या घराण्यात झाला. घरातले वातावरण शिस्तशीर चारित्र्याची व सार्वजनिक कामांची हौस असलेले असे होते. ही परंपरा शंकररावांकडे आली.

शंकररावांचे सर्व शिक्षण हैद्राबाद येथे झाले. त्यांची शैक्षणिक कारकीर्द चांगली होती. १९४३ साली ते मद्रास विद्यापीठातून बी. ए. झाले. १९४५ साली ते उस्मानिया विद्यापीठातून पहिल्या श्रेणीत वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाले. अर्थात त्यांना शिक्षण स्वकष्टाने करावे लागले.

राजकारणात भाग

शंकररावांनी निजामाच्या विरुध्द लढ्यात भाग घेतला. सप्टेंबर १९४८ मध्ये निजामाने शरणागती पत्करली व हैद्राबाद निजामाच्या राजवटीतून मुक्त झाले. मुक्ती लढाईनंतर शंकररावजी नांदेडला स्थायिक होऊन तेथेच वकिली करू लागले. ते कॉंग्रेसच्या प्रवाहात सक्रिय कार्यकर्ते म्हणून सामील झाले. ते नांदेड कॉंग्रेसचे सरचिटणीस होते. नांदेडची मध्यवर्ती सहकारी बॅंक, नांदेड नगरपालिका ह्यांचे अध्यक्ष होते. त्यांनी नांदेडला धर्माबाद येथे महाविद्यालय स्थापन केले. पुण्यात पत्रकार नगरीशेजारी मुलींकरता होस्टेल बांधले. ते इंटकमध्येही कार्यशील होते.

विधिमंडळातील कारकीर्द (१९५६ साली)

कर्नाटक महाराष्ट्रातून वेगळे राज्य झाले. मराठवाडा व विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात विलीन झाले. द्विभाषिक महाराष्ट्र राज्य स्थापन झाले.

१९५२ साली शंकरराव निवडणुकीत यशस्वी होऊ शकले नाहीत. परंतु ते कोणत्याही विधीमंडळाचे सदस्य नसताना यशवंतरावांनी त्यांना १९५६ साली महसूल खात्याचे उपमंत्री नेमले. अर्थात ही त्यांच्या कार्यक्षमतेला यशवंतरावांनी दिलेली पावती आहे. १९५७ साली विधीमंडळाची दुसरी सार्वत्रिक निवडणूक होऊन शंकरराव धर्माबाद मतदारसंघातून यशस्वी झाले. महसूल खात्याच्या कार्यात त्यांनी शिस्त आणली. त्याचबरोबर कुळकायद्याची सक्त अंमलबजावणी केली. अशा त-हेने जमीनदारी व सरंजामदारी नष्ट करण्यास त्यांनी चालना दिली.