कृष्णाकांठ६५

यांना पोलिसांनी पकडल्यानंतर आणखी कोण कोण साथीदार आहेत, याची चौकशी केली. तेव्हा मी समजून चुकलो, की माझे नाव सांगितले जाणार आणि अटक होण्याच्या तयारीनेच शाळेत जायला पाहिजे. त्याप्रमाणे ११ वाजता मी नित्याप्रमाणे शाळेत गेलो. शाळा सुरू झाली आणि माझ्या वर्गात बसलो. शाळेचा तास चालू होता. पण माझे त्यात लक्ष नव्हते. शाळेचा चालू असलेला तास संपण्यापूर्वीच हेडमास्तर एका पोलिस अधिका-याला घेऊन आमच्या वर्गात आले. त्यांनी मला बाहेर बोलावून घेतले.

आम्ही हेडमास्तरांच्या कचेरीत गेल्यानंतर पोलिस अधिका-याने सकाळच्या झेंडावंदनाची आणि बुलेटिनची वगैरे माहिती विचारली. तात्या डोईफोडे यांनी माझे नाव सांगितले असल्याची गोष्ट मला सांगितली. त्यांना मी सांगितले,

''हो, मी हे सर्व केले आहे. आणि असे करत राहण्याचा आमचा निर्धार आहे.''

पोलिस अधिका-याने हेडमास्तरांना सांगितले,

''मी ह्या विद्यार्थ्याला अटक करतो आहे आणि घेऊन जातो आहे. त्याच्या पालकांना कळवा.''

... आणि अशा रीतीने माझी पहिली शास्त्रशुद्ध अटक झाली.

सबंध दिवसभर पोलिस-कचेरीत मला बसवून ठेवले. ते अधूनमधून माझ्याजवळ येत व माझ्याकडून काही अधिक माहिती मिळते का, याची चौकशी करीत. परंतु मी त्यांना काहीही अधिक सांगायचे टाळत होतो. दिवसभर प्रयत्न करूनही माझ्याकडून काही जास्त माहिती मिळत नाही, असे पाहिल्यानंतर रात्र होताच त्यांनी मला तुरूंगात एका कोठडीत ढकलले.

माझ्या घरच्या मंडळींना ही बातमी कळलीच होती. पण त्यांना करता येण्याजोगे काहीच नव्हते.
ती पहिली रात्र मी कशी काढली, याची माझी आठवण अगदी ताजी असल्यासारखी आहे.

दहा बाय् बाराची खोली. अंधाराने भरलेली. पोलिस कस्टडीच्या बाहेर व्हरांड्यात असलेल्या खांबावरच्या दिव्याचे जे काही क्षीण प्रकाशकिरण त्या कोठडीपर्यंत पोहोचत, तेवढाच काय तो प्रकाश. मी खोलीच्या आजूबाजूला पाहिले, तर माझ्याशिवाय आणखी दोन माणसे त्यात होती.

मला वाटले होते, कदाचित मला तात्या डोईफोडे यांच्याबरोबर ठेवतील, परंतु तात्या त्यांत नव्हते. दोन्हीही सामान्य, नित्याचे कैदी असावेत परंतु त्यांतला एक मोठा धिप्पाड गृहस्थ असावा, असे वाटत होते. त्याच्या हातांत व पायांत बेड्या होत्या. पण त्या मला दुस-या दिवशी दिसल्या.