कृष्णाकांठ१३९

के. डी. पाटील, आमदार चंद्रोजीराव पाटील, तात्या कोरे किंवा त्यांचे बंधू या सर्वांनी आमच्याबरोबर मुंबईला यावे, असे मी योजिले आणि मुंबईला जायच्या तयारीला लागलो. तेव्हा माझे लग्न होऊन एक-दीड महिना झाला होता. नवीन घरात नवीन लग्न झालेली तरुण पत्नी होती. तिच्याशी अजून हे सर्व राजकारणातील प्रश्न बोलू शकलो नव्हतो. पण आमचे आयुष्य कोणत्या दिशेला जाणार, हे केव्हा तरी तिला सांगितले पाहिजे, असे माझ्या मनात येत होते.

गणपतरावांना माझ्या विचारांची कल्पना मी दिली. त्यांनी सांगितले, की 'हे एकदम वेणूबाईला सांगून तू तिला घाबरवू नकोस, जसजशी परिस्थिती येईल, तसतसे पाहत राहू.' आईलाही थोडी-फार कल्पना द्यावयाचा मी प्रयत्न केला. ती थोडी दु:खी झाली. परंतु कदाचित अजूनही हे चळवळीचे संकट टळेल, अशी आशा ती मनात बाळगून राहिली.

जुलै महिना जसजसा जात होता, तसतसे देशातील राजकीय क्षेत्रात अपेक्षांचे वातावरण निर्माण झाले होते आणि या अपेक्षा अशा होत्या, की गांधीजींच्या निर्णयाचा विचार करून सरकार काही पावले पुढे येईल किंवा आपला जुना हट्ट कायम ठेवून देशामध्ये एक प्रकारचा विस्फोट होईल. अशा दोन्ही तऱ्हेच्या भावनांनी वातावरण भरलेले होते. ७ ऑगस्टला मुंबईला आम्ही जाण्यापूर्वी जे चित्र होते, ते हे असे होते.

मुंबईच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सभेसाठी आम्ही बरेचजण जाणार होतो, म्हणून आमची राहण्याची व्यवस्था आम्ही खेतवाडीतील पानबाजारमध्ये श्री. कोरे यांच्या माहितीने केली होती. त्याच बिल्डिंगमध्ये माझे काही नातेवाईक राहत होते. त्यामुळे मलाही तेथे राहणे सोयीचे होते. आम्ही जवळजवळ दहा-बारा जण असे एकत्र राहत होतो. पानबाजाराच्या तिस-या किंवा चवथ्या मजल्यावरील दोन खोल्या आमच्यासाठी मोकळ्या करून दिल्या होत्या. आम्ही त्यांत जाऊन राहिलो.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची बैठक दिनांक ७ ऑगस्टला दुपारनंतर सुरू झाली, गवालिया टँकवरील ही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची ऐतिहासिक बैठक मोठ्या थाटामाटाने सुरू झाली. लोकांमध्ये अमाप उत्साह होता. सर्व प्रमुख नेते मुंबईमध्ये आले असल्यामुळे त्यांच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी फार होती.

आम्ही कार्यकर्ते म्हणून अधिवेशनाला हजर राहण्यासाठी लागणा-या प्रवेशपत्रिका मिळविल्या होत्या. त्यामुळे लवकर चांगली जागा मिळावी, म्हणून अधिवेशन सुरू होण्याच्या अगोदर जवळ जवळ दोन तास आम्ही आधीच मंडपात जाऊन पोहोचलो.

आज काय घडणार, या अपेक्षेमुळे आणि चिंतेमुळे माझे मन व्यग्र झाले होते. आज काही तरी नवीन, क्रांतिकारक घडणार, अशी भावना मनामध्ये होती. त्या दिवशी सकाळीच वर्किंग कमिटीची सभा झालेली होती आणि प्राथमिक औपचारिक गोष्टी झाल्यानंतर वर्किंग कमिटीतर्फे ठराव मांडण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू उभे राहिले.

त्यांनी 'भारत छोडो' अशा अर्थाचा प्रसिद्ध असलेला ठराव मांडला आणि त्यावर त्यांनी दीर्घ भाषण केले व ठरावाची भूमिका स्पष्ट केली. आज त्यांच्या भाषणातील सर्व भाग माझ्या लक्षात नाही, पण त्यांनी असे सांगितल्याचे स्पष्ट स्मरते,

''आमचा हा ठराव म्हणजे कोणाला धमकी नाही. हे सहकाराचे निमंत्रण आहे.'