थोरले साहेब - ४०

डाह्याभाई पटेल बाहेर आले.

त्यांनी साहेबांना विचारलं, ''तुमचं काय काम आहे ?''

साहेबांनी आपण का व कुठून आलो हे डाह्याभाई पटेल यांना सांगितलं.  मला भेटीची संधी द्यावी, अशी विनंती डाह्याभाई यांना केली.  डाह्याभाईंना साहेबांची दया आली असावी.  ते काही न बोलता आत गेले व लगेच बाहेर आले.  साहेबांना सोबत घेऊन सरदार पटेल यांच्यासमोर उभं केलं.  सरदार पटेल यांची धीरगंभीर मुद्रा पाहून साहेबांचा आवाज घशातून बाहेर पडावयास तयार नव्हता.  

जीव एकवटून साहेब म्हणाले, ''मी ग्रामीण भागातला एक कार्यकर्ता आहे.  सातारा जिल्ह्यातील एका मतदारसंघातून ग्रामीण कार्यकर्त्याला तिकीट मागण्यासाठी आलो आहे.  या ग्रामीण भागातील कार्यकर्त्याची कैफियत आपल्या कानावर घालण्यासाठी मला पाठविलं आहे.  आपल्याकडे न्याय मागायला आलोय.  आपण आम्हा ग्रामीण कार्यकर्त्यांना न्याय द्याल असा आम्हा सर्व कार्यकर्त्यांना विश्वास आहे.  सरदार पटेल यांनी साहेबांची चौकशी केली.

शेवटी एक प्रश्न विचारला, ''ग्रामीण भागातील उमेदवार पडला तर त्याची जबाबदारी कोण घेईल ?''

साहेबांच्या तोंडून उत्स्फूर्त वाक्य बाहेर पडलं, ''अर्थातच आम्हा सर्व कार्यकर्त्यांची राहील.''

भेट संपली.  साहेब बंगल्याबाहेर पडले.  आपण आपली बाजू व्यवस्थित मांडल्याचा आनंद साहेबांना झाला.  कारण दहा-पंधरा मिनिटं सरदार पटेलांनी साहेबांची मुलाखत घेतली.  जेव्हा उमेदवारांची यादी जाहीर झाली तेव्हा त्यात आत्माराम पाटील यांचं नाव होतं.  ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून आत्माराम पाटलांना निवडून आणलं.  साहेबांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालं.

या निवडणुकीनं साहेबांच्या राजकारणाची दिशा निश्चित केली.  आतापर्यंत साहेब काँग्रेस, समाजवादी, मानवेंद्रनाथ रॉय आणि साम्यवादी या विचारांच्या तळ्यात-मळ्यात असायचे.  ज्या विचारांचे सहकारी भेटायचे त्यासोबतच साहेब जायचे.  या निवडणुकीनं साहेबांना गांधी-नेहरू काँग्रेसच्या मार्गानं जाण्यास भाग पाडलं.  काँग्रेस व साहेब यांची जीवनगाठ या निवडणुकीत बांधली गेली.  ती शेवटपर्यंत टिकली.

अशीच एक सत्त्वपरीक्षा साहेबांना द्यावी लागली.  साहेबांचे बंधू गणपतराव हे सत्यशोधकी समाजाच्या विचारानं भारावलेले.  कराडच्या सार्वजनिक जीवनात त्यांचा सहभाग असायचा.  कराड नगरपालिकेची निवडणूक लढविण्याचं त्यांनी ठरविलं.  अत्यंत चाणाक्ष व धूर्त स्वभावाचे हे बंधू.  त्यांनी एकदा निर्णय घेतला म्हणजे त्या निर्णयापासून माघार नाही.  साहेब व गणपतराव यांचे वैचारिक मार्ग वेगवेगळे होते.  साहेबांचा कोल्हापूर ते कराड प्रवास शिक्षणकाळात चालूच होता.  गणपतरावांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार उभा केला होता.  साहेबांना कोल्हापूरला निरोप आला - ''निवडणुकीच्या प्रचाराकरिता कराडला यावं लागेल.''