थोरले साहेब - ४

मी ज्या ज्या क्षेत्रात काम केले ते शैक्षणिक क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, सामाजिक कार्याचे क्षेत्र असेल, तिथे माझ्या कार्याची दखल त्या त्या क्षेत्रातील जाणकारांनी घेतलेली आहे.

माझे मित्र सुधीर गव्हाणे (माजी प्रभारी कुलगुरू, यशवंतराच चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक) यांनी माझ्याबाबतीत लिहिलेल्या एका लेखामध्ये आपलं मत व्यक्त केलं आहे ते असं :  'विजय पाथ्रीकर हे एक अफलातून खेळाडू आहेत.  त्यांनी खेळाची मैदाने गाजविलेली आहेत.  महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च 'शिवछत्रपती पुरस्कार' त्यांना मिळालेला आहे.  महाराष्ट्र शासनानं त्यांचा यथोचित सन्मान केलेला आहे.  विजय पाथ्रीकर यांनी थोरल्या साहेबांच्या कार्याविषयी अनेक लेख लिहिले आहेत.  'मातीचं नातं' नावाची एक प्रभावी कथा लिहिली.  ती 'लोकमत' दैनिकात छापूनही आली.  त्यावरून मी असं अनुमान काढलं की, विजय पाथ्रीकर हे शब्दाशी अप्रतिमपणे खेळू शकतात.'

शिक्षण, क्रीडा व साहित्यक्षेत्रातील माझे सवंगडी प्रा. सुरेश जाधव (उपप्राचार्य, शिवाजी महाविद्यालय, परभणी) म्हणतात, 'मानवाच्या जीवनाशी हवा, पाणी व आगीचं जे अतूट नातं आहे तेच नातं विजय पाथ्रीकर यांचं मराठवाड्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जीवनाशी आहे.  विजय पाथ्रीकर यांनी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध केले आहे.  ग्रामीण विद्यार्थ्यांच्या विकासाच्या बाबतीत आडकाठी निर्माण करणार्‍यांविरुद्ध विजय पाथ्रीकर यांनी हवा, पाणी व आगीसारखे रुद्ररूप धारण केलेले आहे.'

महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे नेते प्रा. उत्तमराव सूर्यवंशी म्हणतात :  'ज्या ज्या क्षेत्रात विजय पाथ्रीकर यांनी कार्य केलं त्या त्या क्षेत्रात ते पहिल्या क्रमांकाचे नेते राहिले.  मराठवाड्यातील हे यशस्वी नेतृत्व साहित्यक्षेत्रातही क्रमांक एकवर राहील याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाही.'

प्रत्येक यशापाठीमागे भक्कम पाठबळ असावं लागतं.  तसं भक्कम पाठबळ मला मिळालं.  यशाचा कळस सर्वांना भावतो.  हा यशाचा कळस ज्या पायावर बिनधास्त उभा असतो त्या पायाचा विसर पडता कामा नये.  या पायाचे चिरे जेवढे मजबूत तेवढा यशाचा कळस उंच गगनाला गवसणी घालू शकतो.  पांडुरंगराव ऊर्फ आबासाहेब पाथ्रीकर, कै. दगडूजी ऊर्फ काकासाहेब पाथ्रीकर, कै. उत्तमराव ऊर्फ बाबासाहेब पाथ्रीकर, डॉ. भगतसिंग राजूरकर, कै. डॉ. ढोकरट, सुभाष राजूरकर यांनी माझ्या उत्कर्षाचा पाया रचला.

माझ्यासारखेच पण वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालेले आमचे बंधू व माझ्या यशामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे द्वारकादास पाथ्रीकर, दत्ता पाथ्रीकर, कै. गंगाधर पाथ्रीकर, त्र्यंबक पाथ्रीकर.  जे पाथ्रीकर नाही, पण पाथ्रीकरांना भाऊ मानून ज्यांनी पाथ्रीकरांची पाठराखण केली असे किशोर पाटील, गुजरकाका, लक्ष्मण उबाळे, छबुराव पाटील, अशोक हजारे, मनोहर पांगारकर, शेख पाशू, कै. कृष्णा जायभाये, रमेश चव्हाण.

प्रतिस्पर्धी असूनही या यशाकरिता सकारात्मक भूमिका पार पाडणारे कै. नाना बापट, बाबुराव अतकरे, कन्हैयालाल सिद्ध, मधू बक्षी, मधू कदम, कैलास माने, प्रा. बापूराव जगताप, प्रा. विठ्ठल मोरे, प्रा. पंडित मुंडे यांचा नामोल्लेख करणे अनिवार्य आहे.  

मी शब्दाशी खेळू शकतो.  शब्दाशी खेळण्याचं भान मला ज्यांनी दिलं आणि मला लिहितं केलं ते माझे चाहते कै. बंकट पाटील, कै. मुरलीधर गवळी, प्राचार्य गजमल माळी, विद्याभाऊ सदावर्ते, राम सोनवणे, प्रा. डॉ. दादा गोरे, प्रा. प्रभाकर म्हारोळकर, महावीर जोंधळे, चक्रधर दळवी व अरविंद वैद्य यांना विसरणं मला शक्य नाही.

माझ्या विचाराला मी शब्दांत व्यक्त केलं.  माझे हे विचार जनतेपर्यंत पोहोचविण्याचं सत्कार्य दै. अजिंठा, दै. मराठवाडा, सा. कालचक्र, दै. लोकमत, दै. सकाळ यांनी केलं.