थोरले साहेब - २२५

भारतीय लोकशाही अस्थिरतेच्या वावटळीत हेलकावे घेऊ लागली.  ७९ मधील शेवटच्या सहा महिन्यांत दिल्लीत राजकारण्यांनी अक्षरशः शिमगा साजरा केला.  या धामधुमीतून साहेबांनी वेळ काढला.  घराण्यातील तिसर्‍या पिढीची प्रतिनिधी - आपला पुतण्या शिवाजीची कन्या कु. वर्षा चव्हाणचा विवाह म्हैसाळकर शिंदे सरकारच्या घराण्यातीलच श्री. दिपक शिंदे यांच्याबरोबर मोठ्या धूमधडाक्यात पार पडला.  साहेबांनी दिल्लीतील ताणतणावाला या कार्यात थारा दिला नाही.  आपली नात आबासाहेब शिंदे सरकारच्या घराण्यात सून म्हणून जातेय याचा साहेबांना अभिमान वाटला.  साहेबांनी आल्या-गेल्याचं अत्यंत अगत्यानं स्वागत केलं.  या विवाहात साहेब अत्यंत आनंदी दिसले.  

जनता पक्षातील आपापसांतील लाथाळ्यांमुळं इंदिराजींचं राजकारणात पुनर्वसन झालं.  १९८० मधील लोकसभेच्या निवडणुकीत इंदिराजींना हुकमी बहुमत मिळालं.  महाराष्ट्रातून रेड्डी काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून साहेब निवडून आले.  तत्त्व, सच्चरित्र, नैतिकता या विचाराला इंदिराजींच्या राजकारणात गौण स्थान प्राप्‍त झालं.  इंदिराजींच्या पुत्राच्या अनुयायांना स्वातंत्र्यलढ्यातील मूल्य व राष्ट्रीय भावनेबद्दल काडीचेही देणेघेणे नव्हते.  देश आणि वंचितांना सन्मानानं जीवन जगता यावं हा आशावाद उरात बाळगून साहेबांनी आपल्या राजकारणाची वाटचाल आखली.  या आशावादाचा पराभव साहेबांना स्वीकारावा लागला.  बदलत्या राजकारणाची पावलं स्वार्थानं बरबटलेली.  पक्षीय ध्येयधोरणाला तिलांजली देऊन व्यक्तिस्तोमाचा उदय राजकारणात स्थिरावला.  खुशमस्कर्‍यांना राजदरबारी महत्त्व प्राप्‍त झालं आणि अशा लोकांना जनतेनं स्वीकारलं.  आपल्या आशावादाचा पराभव स्वीकारून साहेब विषण्ण अवस्थेत दिवस काढीत होते.  रेड्डी काँग्रेसला सर्व प्रांतांत जनतेनं नाकारलेलं.  याही परिस्थितीत आपण वंचितांच्या सुखाचा जो विचार केलेला आहे तो कसा राबवणार अशा विचारात साहेब चिंतित असत.  वंचितांच्या भविष्याच्या हितासाठी साहेबांनी इंदिराजींच्या काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.  इंदिराजींनी दीर्घकाळ साहेबांना ताटकळत ठेवून शेवटी पक्षात प्रवेश दिला.  साहेबांनी या प्रवेशाला 'स्वगृही प्रवेश' असं संबोधलं.  साहेबांना आठव्या वित्त आयोगाचं अध्यक्षपद देण्यात आलं.  साहेबांच्या नेतृत्वाला पूर्वीची उंची गाठता आली नाही.  

येणार्‍या-जाणार्‍यांचा राबता कमी झालेला.  गतकाळातील आठवणीला उजाळा देण्यात आमचा वेळ जाऊ लागला.  दुःखाचे पहाड साहेबांवर कोसळले; पण साहेब डगमगले नाहीत.  सर्व संकटांचा मुकाबला धैर्यानं केला.  मार्च ८३ उजाडला.  १२ मार्च साहेबांचा वाढदिवस.  तो मी दिल्लीतच साजरा करावयाचा ठरवलं.  माझा डॉक्टर पुत्र - राजानं त्याच्या लग्नाची तारीख १२ मार्च ठरवून लग्न केलेलं.  त्याच्या लग्नाचा वाढदिवस आणि साहेबांचा वाढदिवस मी हौसेनं साजरा करीत आले.  माझी प्रकृती ठीक राहत नसल्यानं मला राजाकडं जाता येणार नव्हतं.  त्यानंच दिल्लीला यावयाचं ठरविलं.  ८ मार्चला सातारा रोडवरील कॅन्सर रोगनिदान शिबिर आटोपून तो कारने पुण्याकडे यावयास निघाला.  घाट पार करून गाडीखाली उतरत असताना एका पुलाला जाऊन कार धडकली.  तो गाडीसह खोल दरीत फेकला गेला... रात्री फोन खणखणला.  साहेबांनी तो घेतला.  फोवरून बातमी कळताच साहेब कोसळले.  क्षणभरात स्वतःला सावरीत मला ही दुःखद घटना कशी सांगावी या विचारात पडले.  माझ्याजवळ आले.  मला जवळ घेतलं आणि सावकाश म्हणले,

''वेणू, आपला राजा आपल्याला सोडून गेला.''

साहेबांचे हे बोल ऐकताच मी हंबरडा फोडला आणि अबोल झाले.  वेणू, वेणू... म्हणून साहेब मला रडतं करण्याचा प्रयत्‍न करू लागले.  एकदाचा हुंदका फुटला.  मी टाहो फोडून रडू लागले.  साहेब माझी समजूत घालू लागले.  मी विचार करू लागले, 'आता जगायचं कशासाठी ?' राजाच्या जाण्यानं माझ्या जगण्याची उमेदच खुंटली.