विदेश दर्शन - ५६

२५
२३ सप्टेंबर, १९७३

काल संबंध दिवसभर अतिशय कामात गेला. त्यामुळे काही लिहू शकलो नाही. आजही C 20 ची बैठक सुरू आहे. त्या बैठकीत बसूनच हे लिहीत आहे.

प्रकृती बरी आहे. अंगावर सूट घालून उभे राहिले म्हणजे फारच त्रास होतो. बसले म्हणजे हलके वाटते. जखमा बऱ्या होतात की नाही याची कल्पना येत नाही. पावडर मारण्याचा कार्यक्रम नित्याने सुरू आहे. बाकीची औषधे वेळेवर घेत आहे. झोप उत्तम लागते ही एक चांगली गोष्ट आहे.

येथील बाजारात सर्व वस्तू बाहेरून येतात, त्यामुळे फारच महाग असतात असे दिसले.

आज सर्व दिवस कामात जाईल. उद्यापासून मुख्य परिषद सुरू होत आहे. त्यामुळे कामात दिवस जातील अशी आशा आहे.
('बोर्डस् ऑफ गव्हर्नर्स'च्या बैठकीला नैरोबीला गेलेले असताना यशवंतरावांनी हे लिहिले आहे.)

२६ नैरोबी

२३ सप्टेंबर, १९७३

दिवसभर मन गुंतून गेलेले असले की, प्रकृतीची आठवण कमी व औषधांचेही विस्मरण होते. परंतु संध्याकाळी हॉटेलवर येऊन बसले की, प्रकृतीचे सर्व प्रश्न एकदम उभे राहतात.

तुम्ही सर्वांनी प्रेमाने मला इतके दुबळे केले आहे की, स्वत:चेही काही करावयाची सवय राहिली नाही. काखेतील जखमा ओल्याच आहेत. पावडरचा मारा मात्र चालू आहे. त्या लवकर बऱ्या होतील अशी चिन्हे नाहीत. छातीवर घुमारा करून बसलेल्याही जशाच्या तशाच आहेत.

अंगावर जाड कपडे चढले की, काटयासारखे टोचतात. पण आता त्याची सवय केली पाहिजे. दुपारचे नित्याचे जेवण व संध्याकाळी 'सूप' असा कार्यक्रम ठेवला आहे. त्यामुळे अजून पोटाची तक्रार नाही. पण हे प्रकृतीचे पुराण किती सांगणार? तेच तेच पुन्हा सांगत राहिलो आहे.

सौ. सुशिला रोहटगी दारेसलामहून परत आल्या. त्या येथे भेटल्या. उद्या संध्याकाळी येथून त्या निघणार आहेत. दारेसलामच्या परिषदेमध्ये त्यांनी चांगलीच छाप टाकली. मला सर्वांनी हे सांगितले तेव्हा अतिशय आनंद वाटला.