विदेश दर्शन - ११

तीस वर्षांहून अधिक काळ राज्यात आणि केंद्रात सत्तेच्या उच्चस्थानी विराजमान असलेल्या या नेत्याने राजकीय क्षेत्रात काम करीत असताना आपले मनोव्यापार काय चालले आहेत या विषयीही मोकळेपणाने एका पत्रात नमूद करून ठेवलं आहे.
प्रवास, प्रवासातील घटना, अनुभूती, नियोजित कार्य, त्यातील समस्या आणि उकल, नाना देशांत भेटलेली नाना प्रकारची, स्वभावाची माणसं, त्यांच्याशी झालेल्या चर्चा, त्याचे निष्कर्ष, जागतिक अर्थकारण, राजनीती, भारताची भूमिका हे सर्व या लेखनात समाविष्ट आहे.

त्याचबरोबर ज्या राष्ट्रांना वा शहरांना त्यांनी भेटी दिल्या तेथील इतिहास, भूगोल, ऐतिहासिक स्थानं, शिल्पकला, कलादालनं, वस्तु-संग्रहालये, प्रबोधिका, प्रशिक्षण-संस्था, संशोधन-संस्था, वैज्ञानिक-संस्था, कारखानदारी, शेती, विश्वविद्यालये, सांस्कृतिक जीवन, लोकजीवन, रूढी-परंपरा, निसर्ग, वनश्री, नद्या, डोंगर, किल्ले, प्रचार-माध्यमे, भारतीयांच्या संस्था असं त्यांनी पाहिलं आणि शब्दबध्द केलं.

विकसनशील भारताला सर्वांगिण प्रगतीचं शिखर गाठायचं असेल तर सर्वांगिण प्रगती म्हणजे नेमके काय हे उमजावं, नव्या पिढीनं याचा अभ्यास करावा, प्रगतीची पथ्ये आत्मसात करावीत हेच या सर्व नोंदींचं कारण असलं पाहिजे.
देशातील मुत्सद्दी, विचारवंत म्हणून मान्यता प्राप्त झालेल्या विचारवंत नेत्याचं अभ्यासपूर्ण, अनुभवसंपन्न असं हे विचारधन आहे.

या विचारधनाचं दर्शन घडताच ठरविलं की, माझ्यासारखे यशवंतरावांवर, त्यांच्या विचारावर, कर्तृत्वावर अलोट प्रेम करणारे या देशात हजारो चहाते आहेत. त्यांच्यापर्यंत ही भेट पोहोचली पाहिजे. स्वतंत्र भारतातील नवी पिढी, जी सक्रीय राजकारणात रस घेते आहे, घेणार आहे, त्यांच्यापर्यंत हा विचाराचा वारसा पोहोचला पाहिजे. तो पोहोचवणं माझं कर्तव्य आहे.

यशवंतरावांनी हे सर्व लिहून ठेवलं, मला भेट म्हणून दिलं हे त्यांचं मोठं ॠण. हे ॠण असं आहे की, त्यातून मुक्त होण्याचा उपाय गवसत नाही. ॠणात निरंतरचं राहावं तर मनाची बेचैनी स्वस्थ बसू देत नाही. ग्रंथरूपानं हे सर्व साहित्य प्रकाशित झाले आणि त्यांच्या हजारो चहात्यांनी ते वाचले तर मनाची बेचैनी कमी होण्याची शक्यता वाटली म्हणून यशवंतरावांच्या 'विदेश-दर्शन' या ग्रंथाचे प्रकाशन करीत आहे.