विदेश दर्शन - १०१

जनतेची काँग्रेस खऱ्या अर्थाने बनावी, यासाठी जनतेत राहिले पाहिजे - सत्तेच्या बाहेर राहिले पाहिजे असे मला एकसारखे वाटते. श्रीमतीजींना विरोध करण्यासाठी नाही. माझी तशी भावनाच नाही. प्रथमपासूनच माझा त्यांच्याकडे ओढा होता हे तुला माहिती आहे.

१९६९ मध्ये मी त्यांच्याविरुध्द मत दिले ते त्यांना सत्तेवरून काढण्यासाठी हे निदान माझ्याबाबतीत तरी खरे नाही. मी त्यांचे मत एकसारखे विचारले होते. त्यांचे मत बनत नव्हते. हे करू का ते करू अशी चंचलता होती. शेवटी मी जे ठरवीन ते इतरांनी मानावे अशी त्यांची रीत होती.

मला हेही कबूल केले पाहिजे की श्रीमतीजी माझ्याशी कधी सूडाने वागल्या नाहीत. Fair वागणे म्हणतात तसे गेली ६ वर्षे त्यांनी माझ्याशी व्यक्तिश: वर्तन केले. पण शेवटी हे सगळे वैयक्तिकच ना? सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात जी तत्त्वे मानली त्यांच्या भविष्याचे काय?

आम्ही साऱ्यांनी वैयक्तिक विचार करूनच वागणे योग्य आहे का असा संघर्ष मनात चालू आहे. निवडणुकीला उभे राहू नये आणि लोकांत काम करीत रहावे, किंवा निवडणूक करून ती जिंकून सत्तेबाहेर राहावे असे दोन पर्याय आहेत. कोणता स्वीकारावा? पण निवडणुका तरी होणार आहेत का?

सत्तेच्या बाहेर राहिल्यानंतर आजची शक्ती राहणार नाही. लोकांची दृष्टि बदलेल. दूर होतील. साधनांची कमतरता होईल. आणि मग मनाने कष्टी होऊन एकाकी पडावे लागेल हेही शक्य आहे. पण त्याची तयारी नको का करायला?

जनतेच्या जिव्हाळयाच्या प्रश्नापासून दूर न होता, किंबहुना त्यांच्याशी एकरूप होऊन राहावयाचे म्हटले तर ही भीति कशासाठी?

आणि मला महाराष्ट्र काँग्रेस पक्षालाच मार्ग दाखविला पाहिजे. छुपे शत्रु आणि आज वरवर दिसणारे मित्रही लांब जातील, विरोध करतील हे सर्व समजून उमजून निर्णय घ्यावा लागेल.

कुटुंबाचा विचार केला तर माझे कर्तव्य सर्वांच्या दृष्टीने माझ्या परीने मी पुरे केले आहे. संसारातले प्रश्न कधीच संपत नाहीत. आणि माझे मन पूर्वीही त्यात नव्हते. आजही नाही. प्रश्न आहे तुझा नि माझा. तू धैर्याने साथीला मनापासून असलीस म्हणजे मला कशाची पर्वा नाही.

आयुष्यातली शेवटली जी काही वर्षे आता राहिली आहेत ती तेजोभंग करून घेऊन काढण्यात अर्थ नाही.

माझ्या मनात काय चालले आहे ते स्पष्टपणे लिहिले आहे. त्यामुळे ते मलाही अधिक स्पष्ट समजले आहे. निर्णय काहीच घेतलेला नाही. मनोव्यापार काय चालले आहेत ते माहीत व्हावे म्हणून लिहिले आहे.
एकमेकांच्या सल्ल्यानेच निकाल घेऊ. घाई कसलीच नाही. पण एक गोष्ट निश्चित की हा निर्णय - 'हो' चा की 'नाही' चा - कसाही घेतला तरी तो माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि कदाचित शेवटचाच ठरणार आहे.

माँटेगो बे मधील 'हॅपी डेज' या बंगल्यातून शांत समुद्र दिसतो आहे. जसा मलबारहिलवरील 'ऐरी' बंगल्यातून दिसत असे तसा. त्या वेळी माझी जी मन:स्थिती होती तीच आज आहे की काय न कळे!

वातावरण प्रसन्न आहे. खूप विश्रांति मिळाली. मन मोकळे झाले. आता ४॥ च्या विमानाने किंग्जटनला परतावयाचे आहे.

हे सर्व लिहीत असताना तू समोर बसली आहेस असे मला एकसारखे वाटत होते.