ऋणानुबंध (58)

संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे काही पूर्वक्षण

प्रतापगड येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ १९५७ मध्ये पं. नेहरूंच्या हस्ते पार पडला. प्रतापगडचा समारंभ व त्या वेळी झालेली निदर्शने, या निदर्शनांचे नियंत्रण यांचा नेहरूंच्या मनावर चांगला परिणाम झाला. त्यांची अशी खात्री झाली, की माझाही जनतेशी जवळचा संबंध आहे व मी तिचे नेतृत्व करू शकतो. नेहरूंनाही लोकांचे प्रचंड निदर्शन पाहता आले आणि त्यांच्या भावना ओळखता आल्या. निदर्शन प्रचंड होते, पण लोक संयमाने वागले व त्याचाही नेहरूंच्या मनावर परिणाम झाला. आमच्या सभांतूनही ते लोकांशी बोलले. या वेळी त्यांच्या लक्षात आले, की आम्ही जरी द्वैभाषिक राबवीत आहोत, तरीही लोकांच्या मनात काही संदेह आहे.

वाईमार्गे आम्ही पुण्याला येत असता अनेक निदर्शक पायी वा सायकलवरून परत फिरत असताना भेटत होते. ते उत्साही होते आणि नेहरूंना पाहिल्यावर ते त्यांचे स्वागत करीत. नमस्कार करीत आणि काही जण, 'मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे', अशा घोषणाही करीत. नेहरू हे सर्व पाहत होते आणि त्यांची मन:स्थिती उल्हसित होत होती. लोकांच्या या स्वागताने व घोषणांनी त्यांचा उत्साह वाढला होता. खेळकर वृत्तीने ते निदर्शनांचा विचार करीत असावेत. मला ते हिंदीत म्हणाले, की 'पंजाबीही रागावलेले आहेत (त्या वेळी पंजाबी सुभ्याचा प्रश्न होता); पण पंजाबी रागावतात लवकर आणि विसरतातही लवकर. परंतु तुम्ही मराठी लोक मोठे विलक्षण आहात. तुम्हाला लवकर राग येत नाही व आल्यानंतर तुम्ही तो लवकर विसरत नाही.'

नेहरू हे सर्व सद्भावनेने बोलत होते.

आम्ही मग पुण्याजवळ आलो. तेथेही निदर्शने झाली आणि स्वागतही झाले. लोक कसल्या घोषणा देत आहेत? असे त्यांनी मला विचारले. तेव्हा मी म्हणालो,

'लोक तुम्हाला दीर्घायुष्य चिंतीत आहेत, पण त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्र स्थापन करा, महाराष्ट्रापासून मुंबई हिरावून घेऊ नका, असेही म्हणत आहेत.'

यावर त्यांनी विचारले,
'मुंबई त्यांच्यापासून कोण हिरावून घेत आहे?'
मी मनात विचार केला, की याचा उपयोग करून घेता येईल काय?

पुढे मी दिल्लीला गेलो असताना नेहरूंनी मला सांगितले, की
'हैदराबादला काँग्रेस महासमितीची बैठक भरेल. तेव्हा तू मला गाजावाजा न करता एकट्याने भेट, मला आता सवड नाही.'