ऋणानुबंध (146)

आत्मचरित्रामधून सत्य लपविले जाणे, आत्मगौरव व आत्मसमर्थन होणे याला आपले सामाजिक जीवनातील दुहेरीपण ब-याच प्रमाणात जबाबदार असावे. म्हणजे आपले आदर्श, आपली तत्त्वे आणि व्यवहार यांत फरक असतो, विरोध असतो. या आजच्या सामाजिक वास्तवतेचा - हवे तर दांभिकतेचा म्हणा - आविष्कार आत्मचरित्र-लेखनातही अपरिहार्यपणे होतो. म्हणून आत्मचरित्रांचे मोठेपण, मी, ती संपूर्ण सत्य सांगतात की नाही, या कसोटीवर ठरवत नाही; आणि खरे म्हणजे, संपूर्ण सत्य हे शेवटी आकाशपुष्पासारखेच नाही काय?

राजकीय-सामाजिक कार्यक्षेत्रातील - किंबहुना सार्वजनिक जीवनात भाग घेणा-या व्यक्तीने आत्मचरित्र लिहिणे आवश्यक आहे; हे तिचे एक कर्तव्य आहे, असे मला वाटते. कारण यामुळे ऐतिहासिक महत्त्वाच्या घटनांचे धागेदोरे उलगडणे सुलभ होईल. आपल्याकडे वस्तुनिष्ठ, विश्लेषणात्मक इतिहासलेखन न होण्याचे एक कारण म्हणजे अशा सामग्रीचा अभाव, असे मला वाटते.

मी आत्मचरित्र लिहिणार का? अशी ब-याच वेळा मला विचारणा करण्यात येते. मी नियमितपणाने डायरी लिहावी, असेही अनेक मित्र वेळोवेळी सुचवतात. पण ते काही मला आजवर जमलेले नाही. काही वेळा महत्त्वाच्या प्रसंगाच्या नोंदी मी करून ठेवतो, नाही, असे नाही. पण डायरी लिहिणे मात्र धावपळीच्या जीवनामुळे जमत नाही. गेल्या चार-सहा वर्षांत मी काही निवडक आत्मचरित्रे मुद्दाम मिळवून वाचीत आहे. ती निवड अशा चरित्रनायकांची आहे, की ज्यांचे आपल्यावर काही वैचारिक, बौद्धिक वा भावनात्मक ऋण आहे. अलीकडे अधूनमधून माझ्या मनाला शंका वाटून जाते, की या वाचनाद्वारे मी माझ्याच आत्मचरित्रलेखनाची तयारी तर करीत नाही ना ? मी ज्या घटनांतून गेलो, त्याबद्दल इतरांना काय म्हणावयाचे आहे, याबद्दल मला उत्सुकता वाटण्याचेही कदाचित हेच कारण असावे. पण आतापर्यंत प्रसंगोपात्त लेखनाशिवाय अन्य लेखन मी केलेले नाही; करू शकलो नाही. आत्मचरित्र लिहायला मला आवडेल. पण त्यालाही कदाचित अवकाश आहे. मनाची तटस्थता आल्याशिवाय असले लेखन करणे शक्य नसते. मी जर कधी काळी आत्मचरित्र लिहिले, तर त्यात अभिनिवेश नसेल, माझे तेच खरे, असा हट्टाग्रह नसेल, अशी मला आशा आहे.