यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे-५

यशवंतराव स्वत: साहित्यिक होते. त्यांनी साहित्यावर, विचारवंतांवर मनापासून प्रेम केले. ते प्रभावशील व प्रतिभावंत वक्ते होते. ते आपल्या वत्त्कृत्वाने लाखोच्या जनसमुदायाला मंत्रमुग्ध करीत. त्यांचे भाषण म्हणजे माणसे जोडणारा पूल असे, विचारांची मेजवानी असे. प्रसंगानुसार त्यांनी भाषणे केली, औचित्यपूर्णता हे त्यांच्या भाषणाचे वैशिष्टय होते. त्यांच्या भाषणांचे संग्रह 'सह्याद्रीचे वारे', 'युगांतर' 'शिवनेरीचे सोबती', 'यशवंतराव चव्हाण - शब्दाचे सामर्थ्य', 'भूमिका' वाचत असतानाच त्यांच्या या भाषणांचा साहित्यिक दृष्टिकोनातून विचार करावा असे वाटू लागते. त्यांची भाषणे फक्त उत्कृष्ट शब्दांची जुळवाजुळव नसून त्यामागे एक साहित्यिक विचार आहे, तत्त्वज्ञान आहे. ते सदैव पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरणारे आहेत. याची खात्री झाली. 'विचार प्रकटीकरण' हाच त्यांच्या भाषणाचा मुख्य हेतू वाटतो. यावरुन मराठी साहित्यातील एक उच्च प्रतिभाशक्ती असलेली निबंधकार म्हणून त्यांच्या या संकलित भाषण संग्रहांचा अभ्यास करणे महत्त्वाचे वाटते. ही भाषणे वाचताना मुळात ही भाषणे होती याची आठवण ही वाचकाला येत नाही. यामुळेच या भाषणांचा लेखकाच्या मते एक उत्कृष्ट निबंधाचा दर्जा प्राप्त झाला आहे. मानवतावादी जीवननिष्ठा आणि विविध क्षेत्रांना व्यापून टाकणारी कल्पनाशक्ती त्यांच्या या वैचारिक लेखनात आहे. जनसामान्यांच्या मनातील आशा-आकांक्षा समजून घेण्याबाबत त्यांचा हातखंडा होता. यात शंका नाही. महाराष्ट्रातील सर्व सामाजिक स्तरातील जनतेबरोबर आपल्या प्रभावी संभाषण कौशल्यामुळे सुसंवाद स्थापन करण्यात ते यशस्वी झाले होते. त्यांच्या विविधांगी वाचन-धंदामुळे विचारंच्या विविध छटा त्यांच्या भाषणामध्ये दिसतात. संसदेतील भाषणामध्ये उत्तम संसद पटुत्वाचे अनेक दर्जेदार नमुने पाहावयाच मिळतात. विषयाचे सखोल ज्ञान, परिपूर्ण माहिती गोळा करून त्यावर टिप्पणी तयार करणे व नंतर आपले म्हणणे समाजाला पटवून सांगणे यामुळे त्यांचे मोठेपण बहुतेक भारतीयांना मान्य आहे. अशा या मराठी मातीशी एकरूप झालेल्या नेत्याचा आदर्श आजच्या तरुण पिढीला, राजकारणी लोकांना मार्गदर्शक ठरेल. म्हणूनच त्यांना भेटलेल्या साहित्यिक व्यक्ती, अनेक साहित्यिक घटना त्यांचे अनेक अनुभव आणि त्यांची मतं ही आजच्या काळात मौल्यवान ठरतील. कारण आज प्रसार माध्यमांनी एवढ्या प्रचंड प्रमाणात आक्रमण केले आहे की आजचा माणूस, वाचन, मनन, लेखन, चिंतन व त्यावर भाष्य या गोष्टी विसरून गेला आहे. म्हणून यशवंतरावांच्या अभ्यासपूर्ण वृत्तीच्या स्मृती आजच्या पिढीसमोर ठेवण्यासाठी हा लेखनप्रपंच. यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची श्रीमंती आजच्या पिढीच्या नजरेत भरेल.

यशवंतरावांच्या भाषणांचा, विचारांचा, मध्यबिंदू हा भारतातील सामान्य माणूस होता. हा सामान्य माणूस वैचारिकदृष्टया प्रगत झाल्याशिवाय, त्याला आर्थिक सामर्थ्य प्राप्त झाल्याशिवाय तो ख-या अर्थाने स्वतंत्र होणार नाही. आता त्यांचा दृष्टिकोन होता. भारतातील ऐक्य टिकले पाहिजे हा त्यांच्या चिंतनाचा आणि चिंतेचा सर्वात मोठा विषय असे. त्यासंबंधीच्या विचारांचे पडसाद त्यांच्या अनेक भाषणांतून उमटलेले दिसून येतात. गरीबीशी कधीही तडजोड करता कामा नये. लोकभाषा हीच ज्ञानभाषा असली पाहिजे, असे ते ठामपणे सांगत. अशा क्रियाशील विचारमंथनातून साहेबांचे कर्तृत्व आणि नेतृत्व निर्माण झाले. या नेतृत्वाने भारताला वेगळी विचारशलाका दिली ती भाषणातून.

महाराष्ट्राच्या उत्कर्षाचे विचार त्यांनी काही भाषणांमधून मांडले आहेत. मा. यशवंतरावजींचे विचार आणि मुद्दे महाराष्ट्राच्या आजच्या आणि उद्याच्या संदर्भातसुद्धा तंतोतंत लागू पडतात. म्हणूनच त्यांचे विचार काळ उमटला तरी अढळ आहेत व ते भावी पिढ्यांना स्फूर्ती देणारे आहेत, हे त्यांच्या भाषणांतून जाणवते, त्याचबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू त्यातून उलगडत जातात. एखादी व्यक्ती समाजवादी विचारांची आहे की लोकशाहीवादी, तिला सर्वधर्मसमभाव मान्य आहे की ती संकुचित धार्मिक प्रवृत्तीची आहे, स्वार्थी आहे की परोपकारी हे त्या व्यक्तीच्या बोलण्यातून समजते. म्हणूनच त्यांच्या विचारांचे, भावनांचे व प्रेरणांचे स्वच्छ प्रतिबिंब आपणास या भाषणांमधून पाहावयास मिळते.

आपल्या भाषणांत सुभाषितवजा सुंदर वाक्यांची ते पेरणी करीत. ते संयमी राजकारणी होते. त्यांचा आपल्या वाणीवर विलक्षण ताबा होता. ते मोजके आणि मुद्देसूद बोलत. सर्व विषयांवर बोलत, सर्व प्रसंगी बोलत. सर्वसाधारण सभांपासून ते पंडितजींच्या परिषदांपर्यंत त्यांनी भाषणे केली. समोरील श्रोत्यांच्या पातळीवर जाऊन सर्वांना समजेल असे मिठ्ठास भाषण ते करीत. शब्दांनी केलेल्या जखमा जन्मभर झोंबत राहतात. त्यांच्या वाणीला चीड, द्वेष, राग यांचा संसर्ग झालेला कधी दिसत नाही की विजयी वातावरणात  त्यांच्या वाणीमध्ये अहंकाराचा दर्पही कोठे दिसत नाही. सुरुवातीच्या काळापासून यशंतरावा चिंतनशील स्वभावाचे असल्यानेच यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक शालीनता प्राप्त झालेली दिसते. शब्दांचे भांडार त्यांच्याकडे होते. त्यामुळेच चर्चासत्रात, परिसंवादात, वादविवादात प्रभावीपणे ते आपली मते मांडत असत. प्रभावी विचार मांडणीबरोबरच दुस-यांची भाषणेसुद्धा ते लक्ष देऊन ऐकत असत. त्यांच्या काही मुद्द्यांची लगेच स्तुती करत किंवा सूचना देत. कित्येकदा श्रोत्यांच्या प्रश्नांना संयमाने उत्तरे देत.