यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे-१५

"कुठल्याही समाजातील कर्तृत्ववान मनुष्य हा समाजाला सोडून कर्तृत्व करूच शकत नाही" असे यशवंतरावांनी म्हटले आहे तसेच काहीसे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात घडले आहे. त्यांनी वास्तव जीवनात जे पाहिले, वाचले, अनुभवले तेच त्यांच्या जीवनात मार्गदर्शक ठरले. यशवंतरावांसारखा लेखक समाजातच जन्मतो, जगतो त्यामुळे जन्मापासूनच त्यांचे मत एका अखंड सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेने संस्कारित झालेले होते. त्यांच्या लौकिक जीवनाचे क्षेत्र समाजातच असल्याने लेखक म्हणून निर्माण केलेली वाङ्मयनिर्मिती ही देखील सामाजिक जाणीव प्रकट करणारी आहे. त्यामुळे ही सामाजिक जाणीव त्याने घेतलेल्या जीवनविषयक अनुभवांचे अन्वयार्थ लावणारी असते. ते लिहितात "ज्या समाजात, ज्या देशात आपण जन्मलो, त्या देशाला, समाजाला, आपला काहीतरी उपयोग व्हायला नको का? माणूस हा 'सामाजिक प्राणी' असं म्हणतात तेव्हा त्याचं सामाजिकत्व हे त्याच्या सामाजिक बांधीलकीवरच अवलंबून असतं." यशवंतरावांसारखा लेखक आपल्या कलाकृतीतून अशी जी सामाजिक जाणीव प्रकट करतो ती त्यांच्या वास्तवाच्या आकलनातून आलेली असते आणि हे त्यांचे आकलन अगदी मूलगामी आहे. त्यामुळे साहित्यातील जाणीव ते प्रभावीरीत्या प्रकट करू शकतात.

यशवंतरावांनी आपली सामाजिक जाणीव अर्थपूर्णरीत्या प्रकट केली आहे. त्यांनी त्यांच्या साहित्यात वास्तवाचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांची सामाजिक जाणीव कोठेही धूसर जाणवत नाही. याचे कारण त्यांचे समाजवास्तवाचे असलेले भरपूर आकलन हे आहे. तसेच पूर्वग्रह दूषित लेखन त्यांनी अजिबात केले नाही. ते म्हणतात, "आपणही समाजाचे घटक आहोत. समाजाचे आपल्यावर ऋण आहे. ही भावना मनात आणली तर तुम्हाला या समाजासाठी कितीतरी गोष्टी करता येतील. समाजऋण हे केवळ पैसा देऊनच फेडायला लागते असे नाही तर काही प्रेमाचे शब्द,  आपुलकीची भावना, थोडे फार कष्ट याबरोबरच समाजाविषयीची तळमळ असली तरी कितीतरी कामे करता येणं सहज शक्य आहे." म्हणून समाजासाठीही नेमकं काय करता येईल याचा वेध घेतला पाहिजे. त्यासाठी विचारांचं आंदोलन उभं केलं पाहिजे. यासाठी संबंधित व्यक्तीकडे भक्कम वैचारिक बैठक असणे गरजेचे आहे. यशवंतरावांच्या साहित्यातील सामाजिक जाणिवांचा विचार करताना त्यांच्या वाङ्मयीन, सामाजिक व राजकीय प्रेरणांचा शोध घेणे महत्त्वाचे ठरते. हा शोध घेताना एक गोष्ट चटकन जाणवते की या प्रेरणा संमिश्र स्वरुपाच्या होत्या. त्यांच्यावर वाङ्मयीन संस्कार हरिभाऊंच्या साहित्यातून, खांडेकर, साने गुरुजी, गोविंदाग्रज, कोल्हटकर आदी मान्यवर साहित्यिकांच्या साहित्यातून झालेला होता. या साहित्यिकांचा आदर्शही त्यांच्यासमोर होता. 'कृष्णकाठ' या आत्मचरित्राची सुरुवातच त्यांनी प्रसिद्ध कवी श्री गोविंदाग्रज यांच्या "कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही" या कवितेच्या ओळीने केली आहे. लहानपणापासूनच ते कविता वाचायला लागल्यापासून त्यांच्या आवडत्या कवितापैकी ती एक कविता होती. सुरुवातीच्या काळात गडकरी, कोल्हटकर, खांडेकर यांच्या भाषेच्या विलासाने त्यांना विशेष मोहिनी घातली असावी. पण नंतर या साहित्यिकांच्या साहित्यात कधी कधी जो एक सामाजिकतेचा पदर दिसतो तेवढाच यशवंतरावांनी प्रामुख्याने उचलला होता असे दिसते.

कृष्णा कोयनेचा प्रीतिसंगमकाठचा नैसर्गिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न असलेला परिसर यशवंतरावांच्यामधील संवेदनशील प्रकृतीला पोषक ठरला. यशवंतरावांना खेड्याचे, ग्रामीण जीवनाचे उत्स्फूर्त असे आकर्षण होतेच.  सुरुवातीचा बराच काळ यशवंतरावांचे वास्तव्य देवराष्ट्रसारख्या आडवळणाच्या गावात होते. तिथेच त्यांचे अनुभवविश्व समृद्ध झाले. पुढे शिक्षणासाठी कोल्हापूरला येईपर्यंतच्या काळात यशवंतरावांनी सातारा, सांगलीचा संबंध कमी होऊ दिला नव्हता. पण कोल्हापूरच्या वास्तव्यात त्यांच्या वाचनात व ज्ञानात खूप भर पडली. वाचनाने त्यांचे सामाजिक भान सतर्क बनले. यशवंरावांना तेथील लोकांचे, शेतक-यांचे दारिद्रय दिसत होते. शेतकरी-मजूर, कामक-यांच्या याच दारिद्रयाला, असहाय्यतेला, समाजातील शोषणाला त्यांनी आपल्या लेखणीवाणीच्या माध्यमातून शब्दांकितही केले होते. या दारिद्रयाचा अर्थ,या शोषणामागील कारणे शोधण्याचा प्रयत्न ते करत होते. साहजिकच यशवंतरावांच्या साहित्यातून मानवी दु:ख, शोषित माणसाचे दारिद्रयाने खचलेले आयुष्य हे सगळे चित्र उमटले.