इतिहासाचे एक पान. २६१

पं. नेहरूंचं देहावसान झाल्याचं ऐकलं मात्र, “मला ताबडतोब भारताकडे निघायला हवं”-यशवंतरावांनी टालबोट यांना सांगितलं.

“मला त्याची कल्पना होतीच, मी त्यासाठी व्यवस्था करत आहे.” टालबोट उत्तरले.

पंडितजींच्या अंत्ययात्रेला हजर रहाण्यासाठी अमेरिकेचे एक वरिष्ठ अधिकारी भारताकडे निघणार आहेत आणि यशवंतरावांनी त्यांच्यासमवेतच भारतांत पोचावं असंहि टालबोट यांनी सुचवलं. एवढं सांगूनच ते थांबले नाहीत, तर यशवंतरावांना वाँशिंग्टनला वेळेवर पोचता यावं यासाठी एक अतिशय वेगवान असं जेट विमान तयार ठेवलं. उरलेली संपूर्ण रात्र मग त्या विमानानं उड्डाण करून यशवंतराव वाँशिग्टनला नेमक्या वेळी पोंचले. डीन रस्क हे भारताकडे निघण्याच्या तयारीतच होते. त्यांच्यासमवेत मग, चव्हाणहि दिल्लीला पोचण्यासाठी निघाले. प्रे. जाँन्सन यांची भेट या आकस्मिक घटनेमुळे त्यांना रद्द करावी लागली. अमेरिकेनं अशा प्रकारे भारताला मदत करण्याच्या संदर्भात महिन्यांमागून महिने चर्चा करण्यांत खर्च केले आणि शेवटी मामुली स्वरुपाची मदत देऊ केली.

यशवंतरावांनी-संरक्षणमंत्र्यांनी – रशियाला भेट द्यावी यासाठी रशियाच्या संरक्षणमंत्र्यांकडून सांगितलं जात होतं. सोविएत रशियाचे उपपंतप्रधान कोसिजीन हे नेहरूंच्या अंत्ययात्रेला आलेले असतांना दिल्लीच्या मुक्कामात त्यांनीहि रशियाच्या आमंत्रणाची त्यांना आठवण करून दिली. भारताच्या संरक्षणविषयक गरजेकडे रशियाचं लक्ष होतं आणि त्या दृष्टीनं मिग-२१ विमानाचं उत्पादन भारतांत सुरू व्हावं यासाठी रशियानं आवश्यक ते सहकार्य दिलं होतं. कोसिजिन यांनी रशियाच्या भेटीचा पुनरुच्चार करतांच यशवंतरावांनी रशिया-भेटीचा कार्यक्रम निश्र्चित केला.

पं. नेहरूंच्या देहावसानानंतर आता भारतांत पंतप्रधानपद हे लालबहादूर शास्त्री यांच्याकडे आलं होतं. रशियाला निघण्यापूर्वी मग यशवंतरावांनी, रशियाबरोबर करायच्या चर्चेच्या संदर्भात कांही महत्वाच्या मुद्यांविषयी शास्त्रीजींशी खल केला. अमेरिकेच्या भेटींत, अमेरिकेकडून भारताच्या नाविकदलासाठी पाणबुड्या मिळवण्याची आशा दुरावलीच होती. रशिया मात्र भारतासाठी सब् मरिन्स देण्यास तयार आहे अशी यशवंतरावांची माहिती होती. नाविकदलांत अत्याधुनिक पाणबुड्या असणं हे राष्ट्राच्या दृष्टीनं प्रतिष्ठेचं मानलं जात असे. परंतु रशियाची त्यासाठी मदत घेण्यापूर्वी पंतप्रधान शास्त्रींजींकडून त्यासाठी अनुमति दिली जाणं आवश्यक होतं. या उभयतांमध्ये जेव्हा चर्चा झाली त्या वेळी या व्यवहाराबाबत शास्त्रींजींच्या मनाची तयारी झालेली नाही, असं चव्हाण यांच्या लक्षांत आलं. भारताच्या नाविकदलासाठी रशिया कडून वस्तु खरेदी करण्याबाबत यशवंतरावांनी वचनबध्द राहूं नये असाच सल्ला शास्त्रींजींनी या चर्चेच्या वेळी दिला.