इतिहासाचे एक पान. २४३

१९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर यशवंतरावांची लोकप्रियता कळसास पोचली. कोणी त्यांची तुलना शिवाजीमहाराजांबरोबर करूं लागले, प्रतिशिवाजी म्हणून संबोधू लागले, परंतु यशवंतराव सावध होते. खोट्या तुलनेनं ते स्वतः फसणारे तर नव्हतेच, पण लोकांनीहि खोट्या तुलनेमध्ये फसू नये असं त्यांनी एकदा जाहीरपणे सांगितलं. त्यांनी सांगितलं की, “एकच शिवाजीमहाराज होऊन गेले आणि एकच टिळक होऊन गेले. महाराष्ट्राचा इतिहास ज्यांनी घडवला ते शिवाजीमहाराज आता पुन्हा होणार नाहीत. ब्रिटिशांच्या सत्तेखाली दबलेल्या हिंदुस्थानला स्वराज्याचा जन्ममंत्र देणारे लोकमान्य टिळक एकदाच होऊन गेले. ते आता पुन्हा होणार नाहीत. पुन्हा होणार नाहीत याचा अर्थ हिंदुस्थान पुन्हा परतंत्र होणार नाही हा आहे. ज्यांच्यापुढे नतमस्तक व्हावं अशा शिवाजीमहाराज व लोकमान्य टिळक ह्या महान् विभूति आहेत. आपण सारी छोटी माणसं आहोत. १९३० सालानंतर जी मंडळी राजकारण करायला लागली अशा असंख्य कार्यकर्त्यांचा मी एक प्रतिनिधि आहे, शिवाजी नव्हे; प्रतिशिवाजी नव्हे. तेव्हा मला फसवू नका आणि तुम्हीहि फसू नका. ”

यशवंतराव अजून राज्यपातळीवरील नेतेच मानले जात होते. त्यांनी आपल्या गुणांची आणि कर्तृत्वाची झलक दाखवली होती, तरी पण अखिल भारतीय राजकारणांत त्यांची प्रतिमा निर्माण व्हावी अशी संधि आलेली नव्हती; परंतु त्यांची पावलं मात्र त्या दिशेनं पडूं लागली होती. त्यांच्याकडून लोकांच्या अपेक्षाहि वाढत होत्या. दरम्यान लोकप्रियतेची आणि कर्तृत्वाची पावती अखिल भारतीय स्तरावर प्राप्त होण्याची संधि १९६१ च्या भावनगर काँग्रेसमध्ये त्यांना मिळाली.

काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सभासदांची निवडणूक या अधिवेशनांत होणार होती. यशवंतराव हे या निवडणुकींतले एक उमेदवार होते. या निवडणुकीसाठी जे मतदान झालं त्यामध्ये यशवंतरावांना सर्वांत अधिक मतं मिळाली. एकट्या इंदिरा गांधी यांनाच त्यांच्यापेक्षा अधिक मतं मिळाली होती. या वेळपर्यंत यशवंतरावांची अखिल भारतीय प्रतिमा निर्माण झालेली नसतांनाहि जास्तीत जास्त मतं संपादन करून वर्किंग कमिटीचा सभासद होण्याचं यश त्यांनी संपादन केलं. त्याच वेळी अनेकांनी असं भविष्य वर्तवलं की, एक ना एक दिवस चव्हाण हे दिल्लींतली श्रेष्ठ जागा पटकावण्याची शक्यता आहे. स्वतः यशवंतराव मात्र दिल्लीतलं असं एखादं वरिष्ठ पद संपादन करावं अशी इच्छा बाळगून नव्हते. महाराष्ट्रांत राहूनच आपलं स्थान भक्कम करावं आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाचं प्राप्त कर्तव्य करत रहावं अशी त्यांची मनोमन इच्छा होती.