विविधांगी व्यक्तिमत्व-३३

* माझी आजवरच्या वाटचालीतील भूमिका मुलाखतकार – श्री. रामभाऊ जोशी, केसरी प्रतिनिधी/पुणे : रविवार केसरी : १० मार्च १९७४.

'काँग्रेसच्या पुढील काळात तो गरिबाचा पक्ष झाला पाहिजे. त्याची गरिबी हटवायची. त्याचे प्रतिनिधित्व करणारे नवे नेतृत्व त्या वर्गातून उभे केले पाहिजे. छोटा शेतकरी, शेतमजूर, दलित व कामगार यांचे नेतृत्व करणारे काँग्रेस पक्षात जास्तीत जास्त संख्येने आले पाहिजेत, तरच ते नेतृत्व समाजवाद प्रस्थापित करेल. त्यांचा पक्ष बनला पाहिजे. ही संघटना बांधण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे यशवंतराव सांगतात. ते पुढे म्हणतात, 'सध्या प्रादेशिकता विचारात व पक्षीय राजकारणातही वाढत आहे. जातीवर आधारित राजकारण उचल घेत आहे. याचे कारण लोकशाहीची प्रवृत्ती कमी होत आहे. गरीब वर्गातील तरुणांनी पुढे येऊन नेतृत्व केले पाहिजे ते यासाठी की, त्यांच्या प्रत्यक्ष, कार्यातून प्रादेशिकतेच्या व प्रतिगामी राजकारणाला पायबंद बसेल.'

* प्रा. सदाशिव भावे यांनी घेतलेली तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची मुलाखत
(साप्ता. 'विवेक' महाराष्ट्र दिन विशेषांक-१९८५)

ही मुलाखत घेताना भावे यांनी तर्कतीर्थांकडून यशवंतरावांविषयीच्या त्यांच्या भावना नेमक्या शब्दात काढून घेतल्या आहेत. 'साहित्य संस्कृतीचे मानकरी यशवंतराव चव्हाण' ही १२ मार्च १९९३ रोजी मुंबईच्या 'शिदोरी' पाक्षिकात प्रसिद्ध झालेली आठवणीवजा डॉ. य. दि. फडके यांची मुलाखत ही वैशिष्टयपूर्ण आहे.

इतर मुलाखतीपेक्षा या मुलाखतीच्या आठवणींचे वैशिष्ट्य असे की, यशवंतरावाविषयी आस्था असणार्‍या आणि तरीही स्वत:चे असे जीवनविषयक तत्त्वज्ञान असणार्‍या या प्राध्यापकांच्या विचारांना एक आगळे असे महत्व होते.

डॉ. य. दि. फडके हेही महाराष्ट्रातील एक पुरोगामी व डाव्या विचारसरणीचे चिकित्सक व डोळस अभ्यासक आहेत. यशवंरावांसंबंधी त्यांनी जे विचार व्यक्त केले आहेत, त्यातून माणूस म्हणून त्यांना दिसलेले यशवंतराव नुसते काँग्रेस पक्षाचे एक मातब्बर नेते म्हणून दिसले नाहीत, तर पुरोगामी विचाराशी बांधील असलेले आणि त्यासाठी कृतिशील असलेले मानवतावादी विचारवंत म्हणून यशवंतरावांचे प्रा. डॉ. फडके यांना भावलेले मोठेपण या आठवणीतून दिसून येते.

प्रा. स. शि. भावे यांनी घेतलेल्या मुलाखतीत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी यशवंतरावांच्या विषयी व्यक्त केलेले पुढील विचार महत्त्वाचे वाटतात. ते म्हणतात, ''यशवंतरावांचे स्थान फार मानाचे आणि कार्य भरीव व विधायक आहे. महाराष्ट्रातील प्रबोधनाची नेमस्त परंपरा यशवंतरावांच्या रूपाने बहुजन समाजात संप्रात झाली. महाराष्ट्रातील बहुजन समाजाने आणि दलितांनी यशवंतराव आणि आंबेडकर यांचे आदर्श नव्याने समजून घेतले पाहिजेत.'' शास्त्रीजींचे हे उदगार आजच्या परिस्थितीत तर अधिकच अर्थपूर्ण ठरतात. 'हिंसा आणि द्वेष' या दोन टोकांकडे हेंदकाळल्या जाणार्‍या समाजाला यशवंतरावांचेच मध्यममार्गी समन्वयवादी विचार तारक ठरतील अशी माझी ठाम श्रद्धा आहे.

या मुलाखतींचे संदर्भ बदलले तरी त्यातील विचारांच्या स्पष्टतेमुळे, सापेक्षतेमुळे व मूलगामी दृष्टिकोनामुळे ते ताजेच वाटतात. त्यातील काही वाक्ये सुभाषितांप्रमाणे आजही मार्गदर्शकच वाटतात. उदा. 'हा लढा एकाधिकारशाही विरुद्ध आहे' या मुलाखतीमध्ये 'अंतर्गत लोकशाही व सामुदायिक नेतृत्व यातून स्थिर सरकार निर्माण होऊ शकेल. त्याच वेळी हेही लक्षात ठेवले पाहिजे की, लोकशाही कमजोर झाली तर देश कमजोर होईल' असे एक वाक्य आले आहे. एक तप उलटले तरी या वाक्याचे गांभीर्य आजही शिल्लक आहे. उलट आजच्या परिस्थितीत त्यांचे हे विचार समजून घेणे अगत्याचे ठरेल. कारण आता तर परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली आहे.

''हळूहळू अनुभवाने पंचायत राज्यातील दोष काढून टाकता येतील, पण लोकशाहीच्या विकेंद्रीकरणासाठी पंचायत राज्य महत्त्वाचे'' हा त्यांनी सांगितलेला विचार आज नव्या पंचायत राज्याच्या कार्यवाहीच्या संदर्भातही मोलाचा ठरतो.