यशवंतराव चव्हाण (53)

या निवडणुकीने पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला चांगलाच धक्का दिला. काँग्रेसची भली भली मंडळी समितीच्या साध्या उमेदवाराकडून पराभूत झाली. पुण्यात एस. एम. जोशींनी बाबूराव सणसांचा पराभव केला तर जयंतराव टिळकांनी सौ. नलिनीबाई शिंदे यांना पराभूत केले. पोपटलाल शहांना शिवरकरांनी हरविले आणि लोकसभेच्या मतदानात ना. ग. गोरे यांनी काकासाहेब गाडगीळांचेवर मात केली. महाराष्ट्रात इतरत्र हरिभाऊ पाटसकर, जनरल जगन्नाथराव भोसले आदि मातब्बर मंडळींचा समितीच्या साध्या उमेदवारांनी पराभव केला. समितीची हवाच पसवरली होती. मालोजीराजे नाईक-निंबाळकर, पी. के. सावंत, नानासाहेब कुंटे, गणपतराव तपासे आदि मंडळींनाही पराभव पत्करावा लागला. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला अवघ्या ३३ जागा मिळाल्या तर समितीने १०२ जागा जिंकल्या. मुंबईत काँग्रेसला १३ आणि समितीला ११ जागा मिळाल्या. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचे ४६ आणि समितीचे ११३ आमदार निवडून आले. विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र समितीला नाममात्र जागा मिळाल्या. विदर्भात एकूण ६३ जागांपैकी विरोधकांना फक्त ८ जागा मिळाल्या. मराठवाड्यात ४२ पैकी फक्त सात जागांवर समितीला समाधान मानावे लागले. गुजरातने काँग्रेसला चांगला हात दिला. गुजरात, कच्छ, सौराष्ट्र मिळून १३२ जागांपैकी १०० जागा काँग्रेसने जिंकल्या. त्यामुळे काँग्रेसला असेंब्लीत बहुमत मिळू शकते. यशवंतरावांची नेतेपदी निवड झाली आणि ते मुख्यमंत्रिपदावर पुन्हा आरूढ झाले.

पश्चिम महाराष्ट्रातील पराभवाने काँग्रेसच्या नेत्यांना अंतर्मुख बनविले. प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारिणीची बैठक बोलाविण्यात येऊन पराभवाची चिकित्सा करण्यात आली. द्विभाषिकास लोक मनातून अनुकूल नाहीत असा निष्कर्ष काढण्याऐवजी विरोधकांच्या प्रक्षोभक, भडक प्रचारावर टीका करण्यात आली. मोरारजींनी केलेल्या गोळीबारात १०५ लोक ठार झाले होते. आचार्य अत्रे यांच्या ''मराठा'' पत्रात त्यांचे फोटो छापण्यात आले होते. काँग्रेसला चेष्टेचा विषय बनविण्यात अत्रे यांनी पुढाकार घेतला होता. तथापि त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र समितीची प्रतिष्ठा वाढली अशातला भाग नव्हता. यशवंतरावांनी निवडणुकीतील यशाबद्दल मतदारांचे आभार मानणारे पत्रक काढून विजयाचे श्रेय काँग्रेस संघटनेला आणि कार्यक्रमाला दिले. स्थानिक प्रश्नांपेक्षा देशाच्या कल्याणाला लोकांनी प्राधान्य दिले याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. काँग्रेस संघटनेच्या पुनर्बांधणीचे दृष्टीने पावले टाकण्याची गरज आहे हे निवडणूक निकालातून दिसून आल्याबरोबर मराठवाडा आणि महाराष्ट्र काँग्रेस कमिट्यांचे अध्यक्ष बदलण्यात आले. बाबासाहेब सावनेस्कर आणि राजे नाईक-निंबाळकर यांचेकडे अध्यक्षपद सोपविण्यात आले. द्विभाषिक यशस्वी करण्याचे दृष्टीने प्रत्येक विभागाच्या विकासासाठी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अहमदाबाद, राजकोट अशी सहा विभागीय विकास मंडळे स्थापन केली. पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसवर लक्ष केंद्रित करून विरोधकांवर मात करण्याचे डावपेच यशवंतराव लढवू लागले.