सह्याद्रीचे वारे -८६

इंग्लंडमधील आपल्या वास्तव्यांत तेथील शिक्षणपद्धतीचें अवलोकन करून सर अहमद यांनीं भारतीयासंबंधीं असे उद्गार काढले होते कीं, ''जोपर्यंत भारतांत शिक्षणाचें लोण इथल्याप्रमाणें सबंध जनतेपर्यंत पोहोंचत नाहीं तोपर्यंत कोणत्याहि भारतीयास सुसंस्कृत व मानाचें जीवन जगणें अशक्यच आहे.'' त्यांचें हें उदात्त स्वप्न सत्यसृष्टींत आणण्याचे आज जे सर्वत्र प्रयत्न चालू आहेत ते पाहण्याचें फार मोठें सद्भाग्य आपणांस लाभलें आहे.

शिक्षणाचा सर्व पातळीवर झपाट्यानें होत असलेला प्रसार ही स्वातंत्र्योत्तर काळांतील शिक्षणक्षेत्रामधली एक अर्थपूर्ण घटना आहे. पूर्वी कधींहि झाला नाहीं इतक्या वेगानें गेल्या दहा वर्षांत शिक्षणाचा प्रसार झाला आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या पातळीवर शिक्षणपद्धतींची पुनर्रचना करण्याचे प्रयत्नहि चालू आहेत. आपल्याकडे प्राथमिक शिक्षणाचा प्रसार झपाट्यानें झाला असून तुमच्या या विद्यापीठाचे अलिकडील काळांतील एक थोर उपकुलगुरु डॉ. झाकीर हुसेन यांच्या नांवाशीं निगडीत असलेली मूलोद्योग शिक्षणाची योजनाहि आपण अंमलांत आणली आहे. जीवनांतील प्रत्यक्ष परिस्थितीशीं व विशेषतः ग्रामीण जीवनांतील परिस्थितींशी शिक्षणाचा अगदीं निकटचा संबंध आणणें हा मूलोद्योग शिक्षणाच्या या प्रयोगामागील हेतु आहे असें मला वाटतें. प्राथमिक शिक्षणाप्रमाणेंच माध्यमिक शिक्षणाचाहि आपल्याकडे पुष्कळच प्रसार झाला आहे. विद्यापीठीय शिक्षण घेणें ज्यांना परवडत नाहीं अशा बहुसंख्य विद्यार्थ्यांसाठीं माध्यमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमांत विविधता आणून एक उपयुक्त असा पूर्ण स्वरूपाचा शिक्षणक्रम तयार करण्याचे प्रयत्न चालू आहेत. अलिकडे महाविद्यालयें आणि विद्यापीठें यांत दाखल होणा-यांची संख्याहि प्रचंड प्रमाणांत वाढली आहे. विद्यार्थ्यांच्या संख्येंत अशी ही वाढ कां होत आहे या प्रश्नाच्या कारणमीमांसेंत जाण्याची कांहीं आवश्यकता आहे असें मला वाटत नाहीं. त्यापेक्षां विविध पातळीवर शिक्षणाचा आज जो प्रसार होत आहे त्याची निरनिराळ्या क्षेत्रांत कोणती प्रतिक्रिया होते या प्रश्नाकडे मी वळतों व त्यासंबंधीचे माझे विचार मी आपल्यापुढें थोडक्यांत मांडतों.

वयाच्या चौदा वर्षांपर्यंत सर्वांना मोफत पण सक्तीचें प्राथमिक शिक्षण दिलें जावें असें शासनाच्या धोरणाचें एक मार्गदर्शक तत्त्व आपल्या घटनेंत आहे. आणि म्हणून प्राथमिक शिक्षणाचा प्रसार हें त्या दिशेनें टाकलेलें पाऊल होय असेंच सर्वत्र म्हटलें जातें. शिक्षणप्रसार ही प्रौढ मतदानपद्धति लोकशाही राज्यकारभाराचा पाया आहे. म्हणून, आपल्या नवजात लोकशाहीची मुळें खोलवर रुजविण्याच्या दृष्टीनें प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारास साहजिकच राजकीय महत्त्व आहे. त्याचप्रमाणें आपल्या प्रचंड मनुष्यबळाची कार्यक्षमता वाढविण्यासहि त्याची पुष्कळच मदत होऊं शकेल. तसें झाल्यास आर्थिक क्षेत्रांतहि त्याचे इष्ट असे परिणाम घडून येतील. शिवाय शिक्षणाच्या या प्रसारांत संस्कृतीच्या प्रसाराचीं बीजें सांठलेलीं असून त्यामुळें मानवी मूल्यें व ध्येयें आम जनतेच्या आवाक्यांत आणणें शक्य होणार आहे. मूलोद्योग शिक्षणाबाबतचे मतभेद बाजूला ठेवले, तरी घटनेच्या या मार्गदर्शक तत्त्वाची शक्य तितकी त्वरित अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनें, निरनिराळ्या शासनांनीं प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारासाठीं जीं पावलें टाकलीं आहेत त्यांना आज सर्वांचाच पाठिंबा आहे याबद्दल वाद नाहीं. परंतु सरकारी तिजोरीची परिस्थिति लक्षांत घेतां, प्राथमिक शिक्षणावर हा जो भार दिला जातो त्यामुळें इतर पातळीवरील शिक्षणाची कांहींशी हेळसांड होत आहे अशी तक्रार कधीं कधीं ऐकूं येते ही गोष्ट खरी आहे. तथापि एकंदरीनें पाहतां अशी तक्रार करणा-यांनींहि या धोरणाच्या इष्टतेबद्दल आक्षेप घेतलेला नाहीं.

माध्यमिक शिक्षणाचा प्रसार व त्याच्या स्वरूपांत विविधता आणण्याच्या दृष्टीनें केलेली उपाययोजना यांच्या बाबतींतहि अशाच प्रकारची अनुकूल प्रतिक्रिया आढळते. परंतु महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षणाचा प्रश्न आला कीं मतभेदांना सुरुवात होते. गेल्या दहा वर्षांत विद्यापीठांतील विद्यार्थ्यांच्या संख्येत जी विलक्षण वाढ झाली तिच्या इष्टतेबद्दल अनेकांनी शंका व्यक्त केली आहे. या वाढीचा परिणाम शिक्षणसंस्थांतून बेसुमार गर्दी होण्यांत झाला असून त्यामुळें अनेक शैक्षणिक दोष उत्पन्न झाले आहेत असें सांगण्यांत येतें. आमच्या महाविद्यालयांत व विद्यापीठांत दाखल होणा-या विद्यार्थ्यांपैकीं अनेकांत उच्च शिक्षण घेण्याची कुवतच नसल्यामुळें त्यांना आपला शिक्षणक्रम अर्धवटच सोडावा लागतो. त्यामुळें आपली पुष्कळशी सामाजिक शक्ति आज वाया जात असते.