सह्याद्रीचे वारे - २९

असा हा नवमहाराष्ट्र आतां निर्माण होत आहे. पूर्वी देवगिरीच्या यादवांच्या काळी जो मुलूख मराठी होता तो आतां एकत्र येत आहे. महानुभावी महीन्द्र व्यासानें आपल्या कांहीं ओव्यांत महाराष्ट्राच्या ज्या सीमा वर्णन केल्या आहेत, त्या सीमा आजच्या या समारंभाच्या दिवसापासून आतां अस्तित्वांत येत आहेत. हा मुलूख पूर्वी एकत्र होता, परंतु अधूनमधून तो इतिहासांत तुटला, सुटला होता. पण आतां पुन्हा तो एकत्र येत असून पिढ्यान पिढ्या मनांत बाळगलेली आपली आकांक्षा आज पूर्ण होत आहे.

गेल्या चारपांच वर्षांत महाराष्ट्रांतील जनतेनें महाराष्ट्राच्या निर्मितीसाठीं अनेक प्रकारांनी व मार्गांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी त्या प्रयत्नांचे दोन कालखंड मानतों. प्रतापगडावर पंडित नेहरू यांच्या हस्तें शिवप्रभूंच्या पुतळ्याचें अनावरण होण्यापूर्वीचा एक आणि प्रतापगडापासून शिवनेरीपर्यंतचा दुसरा. भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलालजी ज्या दिवशीं शिवछत्रपतींना प्रणाम करण्यासाठी प्रतापगडावर आले तेव्हांपासून माझ्या मतानें या निरगांठीनें बांधलेल्या प्रश्नाचे धागे उकलत गेले. एक एक गोष्ट घडत गेली आणि प्रकाश दिसूं लागला. शेवटीं साडेतीन कोटींचा महाराष्ट्र आज एकत्र येत आहे. आज नव्या कर्तृत्वाचें हें नवें दालन निर्माण होत आहे. बुद्धिवंत व कर्तबगार स्त्रीपुरुषांना आव्हान देणारें हें नवें क्षेत्र आहे. याची वाटचाल आतां सुरू करावयाची आहे.

या नवराज्याचा विचार करतांना शिवछत्रपतींच्या कारभारावर प्रकाश टाकणा-या नव्या नव्या शोधसाहित्याची मला आठवण येते. महाराजांच्या आज्ञापत्रांचा नुसता अभ्यास केला तरी उद्यांचा प्रवास आपणांला बिनधोक करतां येईल. महाराजांनीं त्या काळीं एका आज्ञापत्रांत सैनिकांना उद्देशून लिहिलें आहे, ''सैनिकांनो, शेतांत झोंपाल तेव्हां दिवे बंद करून झोंपा. उंदीर वात नेईल, पेटत्या दिव्यानें शेत पेटेल. शेतक-यांची गंज पेटली तर ते म्हणतील, राज्य स्वकीयांचे कसलें, तुर्कीचेंच आहे.'' सैन्याचे अधिकारी शेतक-यांना छळतात, दुःख देतात, असें होतां कामा नये, ही महाराजांची चिंता होती. आज तशीच लोककल्याणाची चिंता आपणांला वाहवयाची आहे.

हें राज्य आज निर्माण होत आहे असें आपण म्हणतों. पण तसें पाहिलें तर आपण कांही नवीन असें उत्पन्न करीत नाहीं, तर मोठ्या परंपरेचा जो वारसा या महाराष्ट्रांत चालत आला आहे तोच आपण पुढें नेत आहोंत. या आपल्या महाराष्ट्राच्या जीवनाचा मी विचार करतो तेव्हां मला चार त-हेच्या परंपरा आठवतात. त्या निरनिराळ्या प्रवृत्ति आहेत. प्रथम मला आठवते ती आमच्या मराठी साधुसंतांची परंपरा. मुक्तेश्वर-ज्ञानेश्वरांपासून ते आज विनोबांपर्यंत संतांची परंपरा समतेचा, न्यायाचा व बंधुभावाचा संदेश देत असतांना मला दिसते आहे. विनोबांचे, गाडगे महाराजांचे बोल आपण ऐकले. संत तुकडोजी महाराज नागपूर भागांत तोच संदेश देण्याचें काम करीत आहेत. दुसरी प्रवृत्ति वीर, पराक्रमी, राजकारणी पुरुषांची आहे. तिचें प्रतीक छत्रपति शिवाजी महाराज आहेत. अन्यायाविरुद्ध दलितांचा कैवार घेऊन लढण्याची महाराष्ट्राची तिसरी परंपरा आणि प्रवृत्ति महात्मा फुल्यांनी आपणांला दिली आहे. आणि शेवटीं विद्वानांच्या बुद्धिमत्तेचा वापर देशासाठी करून त्या मार्गानें वाटेल तो त्याग हसतमुखानें सहन करण्याची राजकारणी प्रवृत्ति लोकमान्य टिळकांनीं या महाराष्ट्राला दिली आहे.
आपला हा जो वारसा आहे त्याची आपणांला जाणीव ठेवावयाची आहे. जेव्हां मी या नव्या महाराष्ट्र राज्याच्या खजिन्याचा विचार करतों तेव्हां बदोबंस्तांत असलेल्या त्या तिजोरींत नाणें किती आहे याचा विचार माझ्या मनांत येत नाहीं. तर आमच्या खजिन्यांत जमेच्या बाजूला हा जो मोठा वारसा नोंदलेला आहे त्याचाच विचार माझ्या मनासमोर उभा राहतो. हा वारसा जतन करणें मोठें कठीण काम आहे. पैशाचा खजिना खर्चून टाकून मोकळा करता येतो. पण हा वारसा खर्च करतां येत नाहीं. तो बरोबर घेऊन आपणांला सदैव पुढें जावें लागतें, पुढच्या जबाबदारीची जाणीव ठेवून पुढें जावें लागते.