मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ८६-२

स्वातंत्र्यचळवळीतील एक मंतरलेला तरुण, जिल्ह्यातील प्रमुख आमदार, पार्लमेंटरी सेक्रेटरी, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रात संरक्षणमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री, उपपंतप्रधान अशा अनेक जागा त्यांनी जीवनात भूषविल्या. सामान्यातले म्हणून जगले. सामान्यातले होऊन राहिले. सामान्य माणसासाठी ग्रामीण तळागाळातील माणसासाठी जे करता आले ते केले. महाराष्ट्रात त्यांच्या शब्दात बेरजेचे राजकारण त्यांनी केले. विरोध वाढू दिला नाही. राजकीय खेळी म्हणून विरोधी पक्षातील अनेकांना काँग्रेसमध्ये आणून विरोधक संपविले. पक्ष वाढविला व स्वत:चे शत्रू कमी केले. अशा यशवंतराव चव्हाणांच्या जीवनातील शेवटचा राजकीय काळ तसा शांत व समाधानकारक गेला असे म्हणता येणार नाही. त्यांच्या मनाला क्लेशकारक घटना नंतर घडत गेल्या. इंदिरा काँग्रेस बाहेर आणि नंतर आत येण्याचा निर्णय, शिष्यांनी तो निर्णय नाकारणे, लवकर प्रवेश न मिळणे या त्यांना मानसिक क्लेश देणा-या घटना, पण त्यांचा त्यांनी कधीही त्रागा केला नाही. तेही विष त्यांनी पचविले. पण सौ. वेणूतार्इंचा सहवास संपणे हे त्यांना पचणारे नव्हते. त्यातून नवीन नेतृत्व मान्य करून आपण राजकारणात फारसा भाग घेऊ अशी उमेदही त्यांच्यात उरली नाही असे भेटीअंती मला वाटले.

त्यामुळे जोपर्यंत जगण्यासारखे काही आहे तोपर्यंतच मरण्यात मजा आहे असे गडक-यांच्या उक्तीप्रमाणे त्यांनी आपले जीवन संपविले असेच म्हणावे लागेल.

जीवनात करता येईल तेवढे केल्यानंतर तेवढे केल्यानंतर महाराष्ट्र घडविल्यानंतर, देशाला मोठे केल्यानंतर, ‘एक नेक आदमी’ म्हणूनच यशवंतराव जगले असेच म्हणावे लागेल. त्यांच्या कतृत्वाचे ठसे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावलोपावली उमटले आहेत. त्यांनी देशास खूप काही दिले आहे त्याचे जतन करून गुण जोपासणे हेच आपले कर्तव्य आहे.