शब्दाचे सामर्थ्य ४४

१०

केल्याने देशाटन

कामानिमित्त दिल्लीला आणि अन्यत्र कुठे कुठे जात-येत होतो. परंतु संपूर्ण भारत अजून मनानेच पाहत होतो. मी धावत असताना, मन माझ्याही पुढे पळत राहिले. वर्षामागून वर्ष ही पाठशिवणी चालूच राहिली. भारतयात्रेचे प्रस्थान मी ठेवले, तेव्हाच ही पाठशिवणी थोडी थांबल्यासारखी वाटली. परंतु तोपर्यंत १९६२ साल उजाडले होते. वयाने जवळजवळ पन्नाशी गाठली होती. जबाबदारीच्या कामासाठी आता मला भारतभ्रमण करावे लागणार होते. समाधान होते, देशाटनाची इच्छा पूर्ण होत असल्याचे.

भारताच्या निरनिराळ्या भागांत हिंडून आल्यावर आणि भारतातील विविधता पाहिली, तेव्हा भारत म्हणजे काय, याची मला कल्पना आली. कृष्णा, कोयना, आणि गोदावरीच्या तीरांवरील भारत मी पाहिला होता. परंतु सिंधूच्या तीरावरील, लेहच्या परिसरातील भारत, ब्रह्मपुत्रेच्या द-याखो-यांतील भारत, गंगाकाठचा भारत, नागाभूमीत पर्वतराजीवर उभा असलेला भारत, नर्मदा, तापी व साबरमतीच्या तीरांवरील भारत आणि दक्षिणेत रामेश्वरापर्यंत पसरलेला, नारळ-पोफळींनी शाकारलेला भारत, गोमंतकातील काजूसारखा आटोपशीर भारत, सागराच्या धडका परत फिरविणारा लांबच लांब किना-याचा भारत, असा हा विविधतेने नटलेला भारत पाहिला; डोळे भरून पाहिला. रोमहर्षक काव्य मनात साठवले. देशाटनाने बरेच काही साध्य झाल्याचा प्रत्यय आला. भारताचे वर्णन करणारी पुस्तके पुष्कळ वाचली होती. त्यामुळे भारत जेवढा समजला, त्याच्यापेक्षा किती तरी पटीने अधिक ज्ञान देशाटनाने मिळाले. दिल्लीला गेल्यानंतर संरक्षणाच्या कामासाठी भारतभ्रमण पुष्कळ करावे लागले. परंतु हे भ्रमण इथेच थांबणार नव्हते. त्यातूनच पुढे जागतिक भ्रमण, पृथ्वीपर्यटन सुरू व्हायचे होते आणि तसे ते सुरू झालेही.

परदेशी जाण्यासाठी भारताचा किनारा प्रथम मी १९६३ मध्ये ओलांडला. संरक्षण-व्यवस्थेच्या सरकारी कामासाठी त्या वेळी रशिया, इंग्लंड आणि अमेरिका या देशांची सफर केली. त्यानंतर गेली पाच वर्षे तर दरसाल जगाच्या निरनिराळ्या देशांतून भ्रमण करीत आहे. या पाच वर्षांत माझी आता पृथ्वीप्रदक्षिणा झाली. केवळ देशाटनाचेच नव्हे, तर पृथ्वीपर्यटनाचे अनेक अनुभव, अनेक प्रकारची माणसे, त्यांच्या चालीरीती, संस्कृती, इतिहास, राजकारण, साहित्य, कला, संगीत, निसर्गशोभा, जगाचे वैज्ञानिक वैभव, उद्योगाची उभारी अशी पुष्कळ माहिती संगृहीत झाली. पृथ्वीपर्यटन झाले, तरी पृथ्वीची संपूर्ण माहिती सापडली, असा दावा कोणालाच करता येणार नाही. पुष्कळ माहिती मिळाली, असेच म्हटले पाहिजे.

माझे सर्वच परदेशी प्रवास हे सरकारी कामासाठी म्हणून असतात. इंग्लंड, अमेरिका, लॅटिन अमेरिका, रशिया, युगोस्लाव्हिया, इजिप्त, सीरिया, थायलंड, ताश्कंद, मलेशिया, केनिया, लेबनान, सायप्रस, इटली, फ्रान्स, स्वीडन, कॅनडा, रोम, सिंगापूर, सिलोन, बांगला देश, जपान, मेक्सिको, जमेका, कॅरेबियन-सी मधील लहान लहान देश, गयाना, हवामा, बहामा, आफ्रिका, पेरू, इत्यादी जगाच्या पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील अनेक राष्ट्रांत काही महत्त्वाच्या कामांकरिता जावे लागले. विविध देशांच्या प्रवासात असताना, नियोजित कामातून फुरसतीचे जे क्षण सापडतील, त्या वेळी, सामान्यतः तेथील ऐतिहासिक, प्रसिद्ध स्थळे, इमारती, सांस्कृतिक जीवन, शिक्षणसंस्था, विद्यापीठे, संरक्षणविषयक प्रशिक्षण संस्था, प्रबोधिका, शिल्पकला, वस्तुसंग्रहालये, बुकस्टॉल्स, नाट्यगृह, वाद्यवृंद आणि यांशिवाय त्यांच्या जीवनातील जे जे उत्तम असेल, ते पाहण्याचा, त्यांतील बारकावे समजून घेण्याचा मी प्रयत्‍न केला. या भ्रमंतीत अनेकानेक गोष्टी मला पाहावयाची संधी मिळाली. परदेशांत वर्षानुवर्ष स्थायिक झालेल्या भारतीयांना भेटण्याचा आनंदही मिळाला.