• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य ३७

स्वातंत्र्याचा पहिला दिवस

स्वातंत्र्य-जी कालपर्यंत एक अमूर्त कल्पना होती, ती आज मूर्त स्वरूपात येत होती. जे, काल एक स्वप्न होते, ते आज सत्य ठरणार होते. जो, कालपर्यंत एक संकल्प होता, तो आज सिद्ध होणार होता. कालपर्यंत गुलाम असलेला एक देश आज स्वतंत्र होणार होता. पारतंत्र्याचा काळोख संपून स्वातंत्र्यासाठी मंगलप्रभात आज उगवणार होती.

अननुभूत आनंदाचा तो एक दिवस, कृतार्थभावनेचा तो दिवस आज पंचवीस वर्षांनंतरही माझ्या डोळ्यांसमोर ताजा आहे. पंचवीस वर्षे झाली. कालगणनेचे चक्र चालू आहे, अव्याहत चालू आहे, त्याची नोंदच आहे ती. ती चुकेल कशी? खरोखरच पंचवीस वर्षे झाली असलीच पाहिजेत; पण त्या दिवसाची आठवण झाली, की मनाचे हरिण केव्हाच त्या पवित्र दिवसापाशी जाऊन पोचते.

तो स्वातंत्र्यदिन, लौकिकार्थाने दि. १५ ऑगस्ट खरा; पण दि. १४ ऑगस्टलाच आम्ही त्याच्या स्वागतासाठी सिद्ध झालो होतो. त्या दिवशी मध्यरात्री जुन्या सचिवालयाच्या इमारतीवर तिरंगा फडकणार होता. अधिकृत अशा त्या स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य कार्यक्रमाचे वेध, तसे म्हटले, तर सकाळपासूनच लागले होते. मी तेव्हा पार्लमेंटरी सेक्रेटरी होतो, आणि त्या समारंभाला मला हजर राहावयाचे होते. आमचे बि-हाड तेव्हा मरीन लाइन्सजवळ होते. येणा-या - जाण्या-यांची वर्दळ घरी तेव्हा खूप असायची. त्याही दिवशी सकाळपासून मित्रमंडळी येत-जात होती. गप्पागोष्टी चालल्या होत्या. विषय स्वातंत्र्याचाच होता. माझे काही मित्र, स्वातंत्र्य-लढ्यातले माझे सहकारी मुंबईतला स्वातंत्र्यदिन सोहोळा पाहण्यासाठी मुद्दाम आले होते, तेही घरी होतेच. एका धन्यतेच्या भावनेने आम्ही स्वातंत्र्याबद्दल गोष्टी बोलत होतो. हा दिवस इतक्या लवकर पाहायला मिळेलसे आम्हांला पाच वर्षांपूर्वी - ४२ साली काही वाटले नव्हते. पण आज स्वातंत्र्याची पहाट झाली होती. ती कोवळी उन्हे अंगावर खेळवत असतानाच आम्हांला आमच्या स्वातंत्र्याच्या लढाईतील काही प्रसंग आठवत होते, काही सहका-यांची याद येत होती. स्वातंत्र्य मिळाले, आता पुढच्या जबाबदा-या कोणत्या, याची चर्चा आम्ही करीत होतो.

गप्पागोष्टी चालल्या होत्या आणि माझ्या एका सहका-याने आम्हांला जवळजवळ सोळा वर्षे मागे खेचून नेले. आम्ही साज-या केलेल्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाची आठवण निघाली होती. स्वातंत्र्य-चळवळीचा एक भाग म्हणून लाहोर काँग्रेसमध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा प्रस्ताव संमत झाला, त्या दिवशी २६, जानेवारीला स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे आदेश काँग्रेसने दिले होते. १९३० सालची २६ जानेवारी जवळ येत चालली होती.

कराडमध्ये हा स्वातंत्र्यदिन कसा साजरा करावयाचा, याचा आम्ही काही तरुण मंडळी विचार करीत होतो. मी तर तेव्हा वरच्या वर्गातला शाळकरी विद्यार्थीच होतो. पण काँग्रेसच्या चळवळीत स्वतःला लोटून दिलेले होते. समविचाराच्या युवकांत रंगून गेलो होतो. असेच आम्ही काहीजण कराडमधल्या एका छोट्या छापखान्यात जमलो होतो; दि.२६ जानेवारीचाच विचार चालू होता. ‘स्वातंत्र्याची हाक’ देणारे एक बुलेटिन तयार करून शाळेतून व चौकाचौकांतून वाटावे, अशी कल्पना पुढे आली आणि लगेच संमतही झाली. मी तेव्हा थोडासा लेखक होतो. शाळेतील निबंध वगैरे ब-यापैकी लिहीत असे. तेव्हा काही लिहिण्याचा प्रसंग आला, म्हणजे माझे सहकारी ते काम माझ्यावर टाकीत, त्या दिवशी ‘स्वातंत्र्याची हाक’ लिहिण्याचे कामही माझ्यावर आले होते. त्या रात्री लिहिलेली ‘स्वातंत्र्याची हाक’ स्वातंत्र्याच्या त्या पहिल्या दिवशी व त्यानंतर आज पंचवीस वर्षांनीही माझ्या कानांत खणखणते आहे.

त्या ‘स्वातंत्र्याच्या हाके’ तील शब्द जसेच्या तसे आज मला आठवणार नाहीत, हे खरे; पण त्याचा आशय निश्चितच आठवतो आहे. म. गांधींच्या नेतृत्वाखाली चाललेल्या लढाईतील आम्ही सैनिक आहो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी पडेल तो त्याग करावयाला आम्ही सिद्ध आहो. प्रसंगी आमचे प्राणही आम्ही अर्पण करणार आहो. असा तो प्रतिज्ञालेखच होता. तेव्हाच्या तारुण्यसुलभ उत्कट भावनेला शोभणारा. ती ‘स्वातंत्र्याची हाक’ आम्ही कराडच्या चौकाचौकांतून कशी वाटली, शाळेतील विद्यार्थ्यांना कशी दिली, यांच्या आठवणी निघाल्या.