माझ्या राजकीय आठवणी १०

अशावेळीच भारतात भारतीय कायदे-कौन्सिलांतील जबाबदार पुढारी व लोकप्रिय पुढा-यांनी बाहेर जाहीर सभांतून एकदिलाने राजकीय हक्कांची मागणी केली. हिंदु-मुसलमान एक झाले, जहाल मवाळ एक झाले व या सर्वांनी एकमताने एकच मागणी केली. अशाप्रकारे इंग्लंडच्या पार्लमेंटचे भारताकडे लक्ष वेधण्याचे श्रेय सन १९१४ साली उत्पन्न झालेल्या महायुध्दास आहे. त्याप्रसंगी भारताने दाखविलेली राजनिष्ठा व केलेली मदत यांचा इंग्लंडवर परिणाम झाला. त्याचवेळी भारतात सर्व लोकांनी एकमताने जबाबदारीच्या स्वराज्याची मागणी केली. महायुध्द चालू असतांना अमेरिकेचे प्रेसिडेंट विल्सन यांनी ‘स्वयंनिर्णायाचे तत्व’ चौदा कलमी योजनेद्वारा सर्व राष्ट्रास लाविले पाहिजे असे तत्व प्रतिपादिले. अशारितीने राष्ट्रीय अंतराष्ट्रीय गोष्टींचा बराच परिणाम होऊन पूर्वीचे उदासीन पार्लमेंट भारतविषयीच्या प्रश्नासंबंधी अधिकाधिक जागृत बनले. त्यातील मजूर पक्षाने पार्लमेंटात भारताचा प्रश्न उचलून धरला.

ता. २० ऑगष्ट १९१७ चे आश्वासन जाहीर केल्यावर माँटे्ग्यूसाहेब भारतांत आले व त्यांनी तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड चेम्सफर्ड यांचे बरोबर भारतभर हिंडून हिंदी-लोकमताचा अंदाज घेतला व इंग्लंडला गेल्यावर नव्या सुधारणांचा कायदा पास करून घेतला. तोच सन १९१९ चा माँटेंग्यू – चेम्सफर्ड रिफॉर्म ऐक्ट होय. हिंदी राज्यघटनेत हिंदी लोकांचा प्रवेश कसा होत गेला ते समजून येईल.

सन १९१९ च्या कायद्याने हिंदी लोकांना जबाबदारीचे हक्क प्रथमच मिळाले. त्यासाली जबाबदार राज्यपध्दतीच्या पहिल्या हप्त्याच्या प्रयोगास सुरवात झाली.

दरम्यानच्या काळांत सन १९१४ सालच्या महायुध्दाचा फायदा भारतीय क्रांतीकारकांनी कसा करून घेतला हे पाहिले पाहिजे. अमेरिकेतून पिंगळे, कर्तारसिंग प्रभृती शेकडो तरुण निरनिराळ्या मार्गांनी इंगजांविरुध्द सशस्त्र युध्द करण्यासाठी भारतात येऊ लागले. त्यांनी निरनिराळ्या स्वतंत्र आघाड्यावरून बडे करून, इंग्रजी सत्तेविरुध्द उठाव केला. परंतु इंग्रजांनी परिस्थिती ओळखून तिच्यावर प्रखर घाव घातले. त्यांत कित्येकांना फासावर लटकाविले. तर कैक तोफेच्या तोंडी गेले. अशारितीने सहस्त्रावधी क्रांतीकारकांचा अंत झाला. तरीही पुढे सचींद्रनाथ संन्याल, चंद्रशेखर आझाद यांनी स्वतंत्र संघटनेमार्फत क्रांतीचा झेंडा फडकवित ठेविला. बंगालमध्ये यदिंद्रनाथ मुखोपाध्याय व सूर्यसेन प्रभुतींनी क्रांतीयज्ञ चालूच ठेवला. क्रांतीकारकावरील काकोरी कटाचा खटला असेंब्लीतील बाँबचा धडधडांत रॅडर्सचा खून, दत्त, भगतसिंग, राजगुरु यांचे बलिदान अशा अनेक प्रसंगांनी क्रांतीकारकांचा आत्मयज्ञ चालूच होता.

राजकारणांत प्रवेश

“स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे “या आदेशाने भारतीय जनता भारावून गेली होती. लोकमान्यांनी अनेक नवीन तत्त्वांचे आवाहन केले होते. अत्याचारी कटवाल्यांचा निषेध न करता सनदशीर चळवळीबद्दल समाजांत आकर्षण निर्माण केले. लोकांच्या आकांक्षा वाढल्या होत्या स्वराज्याचे आंदोलन एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचले होते. पहिले महायुध्द संपले होते. अशा ऐन मोक्याच्यावेळी लोकमान्य टिळकांचे निधन झाले. सारा भारत दु:खाच्या सागरात बुडून गेला. राजसत्तेने फोडा व झोडा या कुटिल नीतीचा मंत्र भारतभर तसेच महाराष्ट्रांतहि यापूर्वीच आरंभिला होता. मागासलेल्या समाजांत शिक्षणाच्या प्रचारासाठी कोल्हापूरच्या छत्रपती शाहूमहाराज्यांच्या नेतृत्वाखाली ‘ब्राम्हण – ब्राम्हणेतर’ चळवळ जोरांस लागली होती. तिचे एक अधिवेशन मोठ्या प्रमाणावर कराड येथे भरले. त्या अधिवेशनांत श्री. भास्करराव जाधव, केशवराव बागडे वकील श्री. दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे प्रभुती मंडळीनीं प्रमुख भाग घेतला होता. श्री. दिनकरराव जवळकरांच्या वक्तृत्वाचा समाजावर अत्यंत मोठा प्रभाव पडे. त्यावेळच्या तरूण पिढीच्या मनावर त्यांच्या भाषणाचा ठसा उमटे.