थोरले साहेब - १९६

शेवटी साहेबांनी निर्वाणीचा इशारा दिला की, ''भारतीय नाविक दलाच्या सक्षमतेसाठी ब्रिटन मदत करीत नसेल तर भारताला खुल्या बाजारातून शस्त्रास्त्रे मिळतील तेथून घेण्याशिवाय पर्याय नाही आणि ती आम्ही मिळविणार.''

यानंतर हेरॉल्ड विल्सन यांनी मदतीचं आश्वासन साहेबांना दिलं.  प्रत्यक्षात मात्र हे आश्वासन उतरलं नाही.  साहेबांच्या हे लक्षात आलं की, अमेरिका आणि ब्रिटन पाकिस्तानच्या हिताचा विचार करूनच भारताला शस्त्रास्त्राचं साहाय्य करायचं किंवा नाही हे ठरवणार.  ब्रिटनचे नौदलप्रमुख भारताला मदत करण्याच्या मनःस्थितीत नव्हते.  जुन्या अडगळीत पडलेल्या युद्धनौका आणि पानबुड्या देण्याचं कबूल करून घेण्यात साहेबांना यश आलं.

पाकिस्तानचे अध्यक्ष अयुबखान यांनी मार्च १९६५ ला चीनला भेट दिली.  चीनकडून मिळालेल्या आश्वासनाच्या जोरावर पाकिस्ताननं भारताच्या हद्दीत कुरापती सुरू केल्या.  भारताला इतर राष्ट्रांपासून अलग पाडण्याचा बेत या दोन्ही राष्ट्रांनी २७ मार्चला रावळपिंडीत केला.  ४ एप्रिल १९६५ ला अयुबखान आणि भुट्टो यांनी रशियाचा दौरा केला.  रशियानं दळणवळणाच्या सुविधेसाठी आर्थिक मदत देण्याचं मान्य केलं.  

२४ एप्रिलला पाकिस्ताननं आपल्या लष्करी सामर्थ्यानिशी कच्छवर हल्ला चढविला.  भारताची काही ठाणी उद्ध्वस्त केली.  भारतीय हद्दीत घुसखोरी केली.  पाकिस्ताननं कच्छमध्ये अघोषित युद्ध सुरू केलं असं दिल्लीचं मत झालं.  भारतीय लष्कराच्या हालचाली सुरू होताच पाकिस्ताननं कांगावा सुरू केला की, भारतानं युद्धआघाडी उघडली आहे.  युद्धक्षेत्र वाढवू नये म्हणून ब्रिटन, अमेरिका यांनी भारतावर दबाव आणण्यास सुरुवात केली.  हेरॉल्ड विल्सन यांनी तात्पुरती एक योजनाच दोन्ही देशांसमोर ठेवली.  शास्त्रीजी तडजोड करून हा वाद मिटावा या मताचे होते; मात्र तोडगा सन्माननीय असावा.  ३० जूनला युद्धसमाप्‍तीचा करार होऊन प्रत्यक्ष १ जुलैला कराराची अंमलबजावणी झाली.  यात भारताला आपला काही भूभाग गमवावा लागला.  

विशाखापट्टणमच्या नौदल केंद्राची पाहणी करण्यास साहेब पोहोचतात न पोहोचतात तोच शास्त्रीजींचा 'तातडीने दिल्ली पोहोचा' असा संदेश साहेबांना मिळाला.  घुसखोर काश्मीरमध्ये घुसवून आपली युद्धाची खुमखुमी पाकिस्तानने तेवत ठेवली.  ३ हजार गनिमी भारताची सरहद्द ओलांडून भारताच्या भूमीवर पोहोचले.  या गनिमांनी ८ ऑगस्टला शेख अब्दुल्लाला पंतप्रधानपदावरून हाकलून त्यांना अटक करण्याला एक वर्ष पूर्ण होतंय त्यानिमित्तानं जी निदर्शनं होणार आहेत त्यात या घुसखोरांनी भाग घ्यावा व काश्मीरमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण करावी.  सर्व गनिमांना भारतीय पोलिसांनी पकडून त्यांचा हा डाव उधळून लावला.  पाकिस्तानच्या या वृत्तीला ठेचून काढण्यासाठी तातडीनं कारवाई करावी लागेल या मताशी साहेब आणि लष्करी अधिकारी ठाम होते.  कारगिल आणि उटी या सरहद्दीला साहेबांनी भेट दिली.  या घुसखोरीला पायबंद घालण्यासाठी युद्धबंदी रेषा पार करून पाकिस्तानच्या भूमीवर हल्ला करावा लागणार अशी भूमिका साहेबांनी घेतली.  तशा सूचना व अधिकार लष्करी अधिकार्‍यांना दिले.  १५ ऑगस्टलाच भारतीय सैन्यानं युद्धबंदी रेषा पार करून तीन ठाणी हस्तगत केली.