थोरले साहेब - ११९

आम्ही सर्वांची काळजी घेत होतोच.  रात्री १२ वाजल्यानंतर साहेबांना उसंत मिळाली.  सर्वांचा निरोप घेऊन साहेब बंगल्यात आले.  बंगल्यात आल्या आल्या मी आणि साहेब देवघरात गेलो.  साहेबांनी गांधीजींच्या फोटोला नमस्कार केला.  नोकरांनी जेवण तयार असल्याची वर्दी दिली.  साहेब, मी आणि आमच्यासोबत डोंगरेंनी जेवण घेतलं.  साहेब दिवाणखान्यात जाऊन बसले.  डोंगरे यांना उद्याच्या कामाची कल्पना दिली.  डोंगरे आपल्या क्वार्टरवर निघून गेले.  साहेबांच्या चेहर्‍यावर दिवसभराचा शीण जाणवत होता; पण मन मात्र उल्हासित होतं.  द्वैभाषिक राज्य निर्मितीच्या वेळी खेळण्यात आलेल्या खेळीचा आणि डावपेचाचा साहेब विचार करू लागले.  ज्या काही वेगवेगळ्या प्रवाहांनी जे कार्य केलं आणि ते पुढंही करीत राहणार्‍या अशा प्रवाहांना खंडित कसं करावं याचा विचार साहेब करू लागले.  त्या अडथळ्यांना दूर केल्याशिवाय संयुक्त महाराष्ट्र मिळणे दुरापास्त आहे याची जुळवाजुळव साहेब मनात करीत असावेत.

मीच साहेबांना म्हणाले, ''चला, मध्यरात्र उलटून गेलीय.  दिवसभराच्या दगदगीनं तुम्ही थकला असाल.''

''आता दमूनभागून कसं चालेल ?  ज्यांच्यासाठी आपण जगतोय त्यांच्या जीवनात सुखाचा सूर्योदय झालेला पाहायचाच आपल्याला.'' साहेब.

''ते खरं आहे; पण त्याकरिता तब्येतही ठणठणीत हवीय ना ?  त्यांच्यासाठी तरी आपण तब्येतीला जपलं पाहिजे.'' मी.

चहाचा ट्रे स्वतः घेऊन मी बाहेर आले.  साहेबांसोबत हिरवळीवर बसले.  चहा घेतला इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.  नंतर मला राहावलं नाही म्हणून मी त्यांना सहज विचारलं.

म्हणजे, ''९६ कुळी काय प्रकार आहे ?''

साहेब मोकळे हसले व म्हणाले, ''तुम्ही बायका आपल्या नवर्‍याविषयी कुणी उणंदुणं बोललं की फार मनाला लावून घेता.  राजकारणात असे प्रसंग घडतच असतात.  त्याकडं दुर्लक्ष करायचं असतं.''

''पण विरोधकांनी तरी असा खेटा प्रचार का करावा ?  असं खोटं बोलून कुठं राजकारण करायचं असतं का ?''  मी.

''अगं, तुला नाही कळायचं यातलं राजकारण.  याला राजकारणात 'गोबेल नीती' म्हणून संबोधलं जातं.  या गोबेलनं खोट्यानाट्या अफवा पसरून युद्धात विजय मिळविला होता.'' साहेब.

''मला काय करायचं त्या गोबेलशी ?  पण मी म्हणते, त्यांनी असा खोटा व हीन पातळीचा प्रचार का करावा तुमच्याविरोधात ?'' मी.

''विरोधकांनी केलेल्या प्रचारात काही तथ्य नाही.  त्यांना ९६ कुळीचा इतिहासही माहीत नसावा असं मला वाटतं.  त्यांना जर इतिहासकालीन सत्य माहीत असतं तर त्यांनी असा प्रचार केलाच नसता माझ्याविरोधात.'' साहेब.

''मग सत्य इतिहास काय आहे ते मला समजून सांगा.  तुम्हाला कमी लेखणं माझ्या मनात सलतंय.  माझ्या जिव्हारी लागलीय ही गोष्ट.''  मी.