इतिहासाचे एक पान. ५७

सप्टेंबर महिन्यांत तर मोर्चांनी कहर केला. यांतील कांही मोर्चातील घटना यशवंतरावांच्या मनांत जन्मभर रहाव्यात अशा घडल्या. बडूज-कचेरीवरील मोर्चा हा एक त्यांपैकी आहे. खटाव-वडूजचा मोर्चा संघटित करण्यासाठी यशवंतराव जयरामस्वामींच्या वडगावला गेले. ९ सप्टेंबरला हा मोर्चा वडूजच्या कचेरीवर नेण्याचा बेत नक्की झाला. या मोर्चाचं नेतृत्व परशुराम घाटगे पहिलवान यांनी करायचं ठरलं. गौरिहर सिंहासने, रामभाऊ नलावडे, माणिकचंद दोशी, बंडोपं लोमटे, बांपूसाहेब कचरे, परशुराम घाटगे आदींनी त्या भागांत प्रचार करून मोर्चाची तयारी केली होती. मोर्चा संघटित होऊन कचेरीवर जाण्यास निघाला तेव्हा यशवंतरावांनी मोर्चेवाल्यांना निरोप दिला. मोर्चेवाले पुढे निघाले तेव्हा त्यांनी यशवंतरावांना गुप्त होण्यास सांगितलं. त्याप्रमाणे यशवंतराव मोर्चेवाल्यांपासून निघून गेले आणि आसपासच दहा-पंधरा मैलांच्या क्षेत्रांत एका संकेत स्थळीं जाऊन थांबले.

हा मोर्चा वडूजच्या कचेरीसमोर आला तेव्हा पोलिस-फौजदारानं मोर्चाला एका विशिष्ट अंतराव थांबण्याचा इशारा केला. त्यावर परशुराम घाटगे यांनी सभा घेऊन झेंडावंदन करणं एवढाच कार्यक्रम असल्याचं फौजदाराला सांगितलं आणि एक पाऊल पुढे टाकलं. त्याबरोबर मोर्चातले लोकहि पुढे जाऊं लागले. परंतु मोर्चा पुढे सरकत आहे असं दिसतांच मामलेदारानं गोळीबाराची आज्ञा केली. त्याबरोबर फडाफड गोळ्या सुटल्या. मोर्चाचे पुढारी परशुराम घाटगे यांना टिपून छातीवर गोळी झाडण्यांत आली. त्यासरशी ते कोसळले आणि ठार झाले. परशुरामानं आपल्या अंगावर सहा गोळ्या झेलल्या, पण हातांतलं निशाण सोडलं नाही. मोर्चातील इतर कार्यकर्त्यांनाहि गोळ्या लागून ते जखमी झाले. लोक आडवे पडले तरी पोलिस गोळ्या झाडीतच होते. कचेरीसमोर रक्ताचे थारोळं साठलं. परशुराम घाटगे पहिलवानाबरोबर या मोर्चातील एकूण सात हुतात्मे झाले आणि शेकडो जखमी झाले. हवालदिल झालेले लोक, इतकं घडतांच पांगले. वडूजचा मोर्चा यशवंतरावांच्या कायमच्याच स्मरणांत राहिला. परशुराम घाटगे पहिलवानास निरोप दिला त्या वेळचा त्याचा उत्साह आणि अंगावर सहा गोळ्या झेलून हातांतलं निशाण अखेरपर्यंत घट्ट धरून ठेवण्याची त्याची जिद्द अतुलनीय अशी होती. एक तडफदार, जिद्दीचा कार्यकर्ता प्राणास मुकला हें दु:ख यशवंतरावांच्या मनांत कायमचंच राहिलं. परशुरामाच्या घरींच आदल्या रात्रीं ते जेवले होते, चर्चा केल्या होत्या, पहाटेपर्यांत थांबले होते आणि सकाळी परशुराम निघून गेला! हें दु:ख कधीच भरून निघालं नाही.

वडूजच्या मोर्चाच्या वेळीं यशवंतरावांच्याबरोबर त्यांचा लहान भाचा गेला होता. बाबूराव कोतवाल हा यशवंतरावांचा भाचा. राधाबाईंचा मुलगा. बाबू हा लहानपणापासूनच चळवळ्या मुलगा. वडील रामचंद्राराव निधन पावले त्या वेळी बाबू अडीच वर्षांचा आणि त्याचा धाकटा भाऊ दिनकर तीन दिवसांचा होता. कोतवाल हे मूळचे कराडचे. बेलिफ म्हणून वळवंतराव कराडला रुजू झाल्यावर डुबल गल्लींतल्या एका माळवदी घरांतील खोलींत त्यांनी संसार थाटला होता. कराडला कोतवाल यांच्या घरासमोर रहिमतुल्ला मुजावर हा बळवंतरावांचा एक जिवलग मित्र रहात असे. या मित्राच्या मध्यस्थीनंच बळवंतरावांनी आपली मुलगी राधा हिचा विवाह रामचंद्र कोतवाल यांच्याशीं ठरवला होता.

रामचंद्ररावांचे अकाली निधन झाल्यानं बाबू, दिनकर, त्यांची एक बहीण असे सर्वजण चव्हाण-कुटुंबांतच एकत्र राहूं लागले. ज्ञानोबा त्या वेळी मोठे होते. बाबू, चव्हाण-कुटुंबांत वाढत असतांना वयाच्या नऊ-दहा वर्षंपासूनच काँग्रस-सेवादलांत जाऊं लागला होता. यशवंतराव हे राजकीय कार्यकर्ते म्हणून काम करूं लागले होतेच. राघुअण्णा लिमये, आत्माराम पाटील, ह. रा. महाजनी, लक्ष्मणशास्त्री जोशी यांची वारंवार ये-जा असे. चर्चा होत असत. सेवादलांतला एक नियमित सैनिक म्हणून बाबू काम करत होता. सभासद-नोंदणीचं काम त्यानं आपल्याकडे घेतलं होतं. आपले मामा कांही तरी मोठं काम करताहेत, तेव्हा ते सांगतील त्याप्रमाणे आपण काम करायचं एवढंच बाबूला समजत होतं. चळवळ्या मुलगा म्हणून तो आता ओळखला जाऊं लागला होता.