विविधांगी व्यक्तिमत्व-७०

''गंगोघाचे प्रत्येक ठिकाणी आगळे-वेगळे महत्त्व आहे., परंतु हरिद्वारक्षेत्री जो गंगोघ दिसतो तो पारदर्शक, निर्मळ, स्वच्छ असा.''

''आकाशी फुलला बाग तारका चंद्रिका सुमे।
स्त्रवतो रस तो त्यांचा चंद्रिका मजला गमे।।


बाहेर चांदण्याची बरसात आणि मनात काव्याची बरसात अशा मनाच्या धुंद अवस्थेत हे दीर्घ काव्य साकारू लागलं.''

"जीवनाची गंगा वाहत असते. गंगोघात काटेकुटे, गदळ, रेती सतत मिसळतच असते. वाहत्या ओघांतून काटेकुटे आपोआपच तीरावर ढकलेले जातात. निसर्ग, नियतीच ते करीत असते. गंगोघ शुद्ध रहावा, मानवी मनावर त्यांचा संस्कार घडावा ही नियतीचीच रचना आहे. आनंद असतो तो असा जीवनोघ मागे वळून पाहण्यातच.''

यशवंतराव शेवटी म्हणतात, ''माझ्या स्वभावातच निसर्गाची ओढ. एकटं हिंडावं, डोंगरकडे चढावेत - उतरावेत, नदीच्या संगमावर बसावं आणि एकमेकांत मिसळून जाणारं आणि पुढे एकोप्यानं, संथगतीनं चाललेलं जीवन पाहावं असा एक छंद. कर्‍हाडपासून ताकारीपर्यंत आगगाडीने जायचं असा एक छंद मी कितीतरी दिवस केला. कर्‍हाडपासून शेणोली मागे टाकलं की ताकारी हे तिसरं स्टेशन. ताकारीला उतरायचं आणि गाडीनं हिरवं निशाण फडकवलं की सागरोबाच्या खिंडीचा रस्ता पार करून पुढे चाललेल्या गाडीकडे पाहात राहायचं. धाड धाड करीत समोरून चाललेली गाडी पुढे किर्लोस्करवाडीकडे (तेव्हाच्या कुंडल स्टेशनकडे) लहान लहान होत जाताना दिसायची आणि अदृश्य व्हायची. गाडी तीच, तिच्यातून मी प्रवास केलेला., पण आपल्याला सोडून जात आहे, अदृश्य होत आहे या दृश्याचा मनावर विलक्षण परिणाम होत असे. मनातून उदासीनता दाटत असे.''

यशवंतरावांचे निसर्गाचे निरीक्षण जीवनाच्या संघर्षातही त्यांना रसग्रहणासाठी उपयोगी पडायचे. सृष्टीतला निसर्ग डोळयांना दिसायचा, तर अंत:चक्षूला दिसणारा ध्येयवादी निसर्ग त्यांच्या शब्दातून आपोआप झरायचा! त्यांच्या भाषणातून सहज फुलपायचा, त्या फुलण्यामागे अनुभवाची पाळेमुळे त्याला जीविताचे रसायन पुरवायची आणि यशवंतरावांच्या मनाचा निसर्ग असा डवरलेल्या झाडाप्रमाणे विचारसृष्टींनी मोहरायचा.