विविधांगी व्यक्तिमत्व-२०

महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर भारतीय जीवनाला निश्चित गति देण्याचे कार्यात प्रभावीपणे भाग घेण्यासाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधत्व प्रभावी पाहिजे. त्यामागे महाराष्ट्रीय समाजाचा जागृत पाठिंबा हवा या गोष्टी साधने हे सर्वस्वी महाराष्ट्रीय समाजामध्ये एकोपा आणि उत्साह निर्माण करण्यासाठी सामाजिक आणि आर्थिक समस्या सोडविल्या पाहिजेत. सामाजिक क्षेत्रांत ब्राह्मण-ब्राह्मणेतर-वाद आणि अस्पृश्यांचा प्रश्न यामुळे प्रमुख समस्या निर्माण झाली आहे. आर्थिक क्षेत्रामध्ये उद्योगधंद्यांची वाढ. शहकारी पद्धतीचा प्रसार, भूमिहीनांना शेती आणि सुशिक्षितांतील बेकारी हे मुख्य प्रश्न आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या तिन्ही विभागांचे - विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांचे - एकात्म्य साधणें ही मुख्य समस्या आहे. या सर्व समस्यांच्या मुळाशी लोकशाहीबद्दल निष्ठा वाढवून लोकशाही व्यवहाराला चालना द्यावयाची ही मूलभूत भूमिका आहे.

महाराष्ट्रात कृषी औद्योगिक समाजरचना निर्माण व्हावी असे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी कार्य केले. यशवंतरावजी म्हणजे एक सुजाण सुसंस्कृत, प्रज्ञावंत व्यक्तिमत्व, त्यांनी जीवनभर स्वच्छपणाने राजकारण केले आणि जीवनाकडे सदैव रसिकवृत्त्तीने पाहिले. ज्वलंत राष्ट्रभक्ती आणि काँग्रेस तत्व प्रणालीवर अस्सीम श्रद्धा यातूनच त्यांनी राजकारणांकडे पाहिले आणि त्या तत्वानुसारच ते सदैव अगदी अखेरपर्यंत वागत राहिले.

आपला महाराष्ट्र सर्वार्थाने मोठा व्हावा यासाठी यशवंतराव तळमळीने धडपड करीत. सहकाराच्या, शिक्षणाच्या, उद्योग व्यवसायाच्या अगर जीवन उदात्त्त बनविणार्‍या अन्य कोणत्याही कार्य क्षेत्रात नवे विचार पेरीत जाण्याचा जणू त्यांना ध्यासच लागला होता. १९३० ते १९४५ या काळात यशवंतरावांना स्वातंत्र्य आंदोलनातील सहभागाबद्ल अनेकदा कारावासाच्या शिक्षा भोगाव्या लागल्या. या काळात कारागृह हे सुद्धा एक विद्यालय आहे असे समजून त्यांनी सामाजिक आणि राजकीय सत्वज्ञानाचे व समाजवादी विचारांचे मौलिक अध्ययन केले, चिंतन केले, परिशीलन केले आणि स्वत:च्या विचारांची बैठक भरभक्कम केली.

कृषी औद्योगिक समाज कल्पना ही मूळची यशवंतरावांचीच. शेती सुधारावी, शेती मालावर औद्योगिक प्रकिया करावी, विज्ञानाचे वरदान समाजाला लाभावे, शिक्षण जीवनोपयोगी व्हावे. यासाठी त्यांनी अनेक प्रयत्‍न केले. विज्ञानाइतका त्यांना अध्यात्माबद्लही आदर होता. पण ते देवभोळे नव्हते किंवा वृथा कर्मकांडे, ज्योतिष इत्यादीवर त्यांचा विश्वास नव्हता. आई विठामातावर कमालीची भक्ती होती आणि पत्नी वेणूताईवर अजोड प्रेम होते.

यशवंतराव राजकारणी होते, राजकारणाच्या डावपेचात ते तरबेज होते. तसेच कार्यक्षम प्र्रशासक आणि मजबूत संघटक म्हणूनही त्यांची ख्याती होती. त्यांचा मूळपिंड मधमाशीचा होता. जेथे जेथे घेण्यासारखे, शिकण्यासारखे असेल ते ते गोळा करावे, स्वत:च्या जीवनात आणावे आणि समाजाला त्याचा लाभ द्यावा ही त्यांच्या विचारधारेची एक प्रभावी बाजू होती.

यशवंतराव नुसते मुरब्बी राज्यकर्तेच नव्हते, ते साहित्य प्रेमी, कलाप्रेमी रसिक होते. साहित्य संमेलन असो, नाट्यसंमेलन असो की उत्कृष्ट नृत्याचा अगर गायनाचा कार्यकम असो तिथे यशवंतराव आवर्जून उपस्थित रहायचे. मराठी  नाटकांवर त्यांचे अतोनात प्रेम होते. त्यातूनच नाटकांवरचा करमणूक कर रद्द झाला आणि नाट्य व्यवसायाला उर्जितावस्था आली.

यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट रसिकराज होते, तसे स्वत: रसाळ वक्तेही होते. त्यांचे वाचन अफाट, चौफेर होते. त्यांचा त्यांना वक्तृत्वाच्या आकर्षक मांडणीसाठी खूप उपयोग होत असे. आपल्या भाषणात सुभाषितवजा सुंदर वाक्याची पखरण करण्यात त्यांचा हातखंडा होता. ते राजकारणात गेले नसते तर फार मोठे साहित्यिक आणि प्रथम दर्जाचे आंतराष्ट्रीय ख्यातीचे, प्रभावी वक्ते म्हणून गाजले असते.