यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-सुसंस्कृत रसिक व्यक्तिमत्त्व-ch १९-२

साहित्य सभेच्या उद्धाटनासाठी चव्हाणसाहेब औरंगाबादला आले होते.  कला, कविता, साहित्य सभा, साहित्य परिषद, पुस्तक प्रकाशन, चर्चा, साहित्य संमेलन हा त्या रसिक माणसाचा खराखुरा आनंदाचा क्षण असायचा.  एखाद्या लहान मुलाचा आनंद व उत्साह मी प्रत्येक वेळी पाहिला.  या साहित्य सभेच्या उद्धाटनाचे सुंदर भाषण त्यांनी केलं.  सभागृहात साहित्यिकांचाच भरणा जास्त होता.  आपल्या भाषणात त्यांनी अलीकडच्या काळातल्या दोन पाच वर्षांतल्या प्रवाहांचे उल्लेख केले.  विशेषतः दलित साहित्य, ग्रामीण साहित्य व एकूण कलासाहित्यावर ते मनःपूर्वक व अभ्यासपूर्ण बोलले.  विशेषतः त्यांनी ज्या ज्या नव्या पुस्तकांचे व त्यातील काही व्यक्तिरेखा, चित्रण, जीवन, कवितांचे उल्लेख करून केले.  तेव्हा खूपच साहित्यिकांना आश्चर्याचा धक्का बसला व लाज वाटू लागली.  कारण बहुतेक तिथे बसलेल्या साहित्यिकांनी ती नवी पुस्तके वाचलेली नव्हती.  चार महिन्यांपूर्वी प्रकाशित झालेल्या एका अगदी नव्या कवीच्या कवितासंग्रहातील एक कविता त्यांनी उत्स्फूर्तपणे सहज म्हटली.

अंगावर चिंध्या पांघरून सोने विकायला बसलो तर
गिर्‍हाईक फिरकता फिरकेना
सोने अंगावर पांघरून चिंध्या विकावयास बसलो तर गर्दी
अजिबात आवरेना.

अशा काही तरी त्या ओळी होत्या.  चव्हाणसाहेब साधे खासदार होते व राजकारणातले दिवस काहीसे नीट नव्हते.  ह्या ओळी म्हटल्यावर चव्हाणसाहेबांनी त्यांच्या पद्धतीनं विमानतळ ते विश्रामधाम कमी गर्दीचे कसे होते इत्यादी सहज उल्लेख केले.  जिथे पूर्वी विमानतळ झाकले जाई तर प्रचंड टाळ्या, ''चालायचंच'' मी सहज काही कवितेच्या ओळी म्हणालो, असं प्रसन्न हसत हसत सभागृह जिंकले.  पुन्हा त्यांनीच प्रश्न विचारला हा कोण कवी कुठे असतो ? माहीत आहे ?  सगळ्यांना संभ्रम.  त्यांनी सांगितलं देवदूत कवितासंग्रह- नागपुरात पोस्टात हा पोरगा नोकरी करतो.  समान्य स्थिती.  अशा सुंदर ओळी लिहितो.  दलितांमधून खेड्यापाड्यातून नवीन मुलं येत आहेत.  नवा आशय नवा शब्द देताहेत.  ही कवितेतील साहित्यातील मोठी क्रांती !  कोण म्हणतंच नव्या साहित्यात दम नाही ?  इत्यादी.

त्याच रात्री सुभेदारी विश्रामधामवर रात्री नऊ वाजता पुढारी मंडळींची गर्दी.  श्री. भालचंद्र नेमाडेंना भेटीसाठी घेऊन आलो असं मी त्यांना आत जाऊन सांगितलं.  मग सगळ्यांना उद्या भेटू.  आता काहीच शक्य नाही असं पुन्हा पुन्हा सांगून खोलीतून उठून थेट बाहेरच्या उघड्या दालनापर्यंत चालत आले.  अन् हसत हसत भेटून हाती हात घेऊन नेमाडेंना खोलीत आणलं.  हे आतिथ्य, साहित्यप्रेम, रसिकता विरळ.  ही कुठे सापडत नाही किंवा असते दोन तास.  नंतर साहित्यावर त्यांच्याशी चर्चा.  नव्या लेखनाचे, स्वतःच्या आत्मचरित्राचे विचारणे इत्यादी.

कर्‍हाड पारितोषिकांचे पहिले पारितोषिक कवितेला दिले गेले ते दिलीप चित्रे ह्यांच्या ''कवितेनंतरच्या कविता'' ह्या पुस्तकाला.  चव्हाणसाहेब स्वतः त्या समारंभाला कर्‍हाडला जातीनं थांबले.  सगळं मनासारखं समारंभाचं रूप केलं.  कवितेशिवाय काहीच नाही असं दोन दिवसांचं चर्चासत्र, भेटी, आठवणी, काव्यवाचन, इतरांच्या कविता असं स्वरूप ठेवलं.  समीक्षेपासून कथा, कादंबरी, नाटक सर्वच वाङ्‌मयप्रकारात त्यांना रस होता.  कविता ह्या प्रकारावर त्यांचा विशेष लोभ होता.  एकदा मेघदूतासंबंधित सुंदर बोलत राहिले अशा अनेक घटना.

नॅशनल बुक ट्रस्टचे मराठी-गुजराती केंद्र दिल्लीहून मुंबईत आणलं.  तो आग्रह त्यांनीच धरला.  साहित्य अकादमीची बक्षिसं, त्यांची पद्धती, याचं स्वरूप बदललं पाहिजे असं ते आवर्जून म्हणाले.  अनेकांशी त्यांची आमची चर्चा झाली.  कितीतरी नव्या कल्पना कला, साहित्य, संस्कृती, नृत्य, चित्र, शिल्प, यासंबंधात त्यांच्या असायच्या.  महाराष्ट्राच्या ह्या संदर्भातल्या जडणघडणीतल्या व्यवस्था, यंत्रणा, संस्थांसंबंधी, साहित्य संस्कृती मंडळ, लोकसाहित्य समिती, कलाअकादमी इत्यादी आता कालाच्या संदर्भात खूप बदल केला तर पाहिजेच, असं त्यांना वाटे.  परंतु निश्चित स्वरूपाचं संशोधन, संपादन काळजीपूर्वक केलं पाहिजेच, असा त्यांचा आग्रह होता.