• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण (6)

यशवंतरावांचे मामा श्री. दाजी घाडगे यांनी यशवंतरावांना देवराष्ट्राला नेले आणि प्राथमिक शाळेत घातले.  चव्हाण कुटुंबाला जी कांही थोडी फार मदत करता येईल ती केली.  यशवंतरावांचे बालपण देवराष्ट्र येथेच गेले व तेथेच त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.  इंग्रजी शिक्षण घ्यावे अशी त्यांची इच्छा होती म्हणून ते कराडला आले.  घरातील लोकांना वाटले की, यशवंता जर मराठी सातवी इयत्ता पास झाला तर त्याला नोकरी मिळू शकेल.  कुटुंब चालविणेस नोकरीची गरज भासत होती.  तथापि यशवंतरावांनी मराठी सातवी इयत्ता पास केली आणि नोकरीचा मार्ग न चोखाळता इंग्रजी शिक्षणाच्या ओढीने टिळक हायस्कूलमध्ये स्वतः जाऊन आपले नांव विद्यार्थी म्हणून नोंदिवले.  त्यावेळी ते तेरा वर्षांचे होते.  थोरले बंधू ज्ञानोबा कुटुंब चालवीत होते, ते यशवंतरावांना वडिलांच्या ठिकाणी होते.  ज्ञानदेव नोकरीनिमित्त कराडला आले म्हणून यशवंतरावांना कराड येथे येण्याची संधी मिळाली.  हायस्कूलमध्ये शिकत असताना त्यांच्या डोळ्यापुढे विशाल क्षितिज दिसू लागले आणि भावी जीवनाचा आराखडा मनाशी रंगविण्यात ते दंग होऊ लागले.  कृष्णा-कोयनेच्या संगमावर सायंकाळी ते एकटेच विचार करीत बसायचे.  कृष्णेचे पाणी आणि कृष्णाकांठची माती यांची त्यांना खूप आस्था आणि ओढ वाटायची.

गणपतराव आणि यशवंतराव या दोघा बंधूंचे खूप सख्य असायचे.  दोघेही धोतर, सदरा आणि फेटा असा पेहराव करायचे.  गणपतरावांना पैलवानी षौक होता.  ते यशवंतरावांना तालमीत न्यायचे, कुस्तीचे डाव शिकवायचे.  यशवंतराव त्यांना ''गणपू'' म्हणायचे.  गणपतराव कर्तबगार होते, महात्त्वाकांक्षी होते.  त्यांचे मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाल्यावर आणखी शिकण्याची त्यांची इच्छा होती.  तथापि परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही.  आपल्याला नाही शिकता आले तरी धाकटा भाऊ यशवंताने खूप शिकावे असे त्यांना वाटायचे आणि त्या दृष्टीने ते प्रयत्‍न करून यशवंतरावांना प्रोत्साहन द्यायचे.  महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे त्यांना आकर्षण वाटायचे.  शोषणशाहीबद्दल त्यांना घृणा वाटायची.  कराडात त्यांनी कळंबे गुरुजींना साथ दिली, चळवळीच्या प्रचारात भाग घेतला.  यशवंतरावांनीही आपल्याबरोबर यावे असे गणपतरावांना वाटायचे.  दोघांत चर्चा व्हायची, यशवंतराव विचार करायचे.  शोषण करणार्‍या वर्गाबद्दल त्यांचे मत प्रतिकूल होते.  तथापि महाराष्ट्रात भटजी-शेटजी विरोधी वातावरण तयार केले जात असताना यशवंतरावांना गांधीजींच्या राजकीय चळवळीचे आकर्षण अधिक वाटायचे.  त्यांनी गांधीजींच्या चळवळीत सामील होण्याचा मनाशी निर्णय घेतला.

यशवंतराव अभ्यासात हुशार होते.  यशवंता चव्हाण हा वर्गाचे आकर्षण असायचा.  त्यांच्या वाचनाच्या आवडीबद्दल आणि वक्तृत्वाबद्दल शिक्षकवर्ग खूष असायचा.  खेळाची आणि त्यातल्या त्यात क्रिकेट खेळायची त्यांना खूप मजा वाटायची.  क्रिकेटची बॅट विकत घेणे किंवा क्रिकेटची मॅच तिकीट काढून बघायला जाणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याने त्यांनी वाचनावर आणि वक्तृत्वावर अधिक भर दिला.  टिळक हायस्कूलमध्ये शिकत असताना १९३० मध्ये पुण्यात विद्यार्थ्यांसाठी एक वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.  या स्पर्धेत भाग घ्यावा असे यशवंतरावांना मनोमनी वाटले.  पण पुण्याला जायचे कसे, मोटार भाड्यासाठी पैसे कोठून आणायचे हा प्रश्न त्यांचेपुढे पडला.