मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ९२-३

या पत्रासोबत अशाच अर्थाची दोन-तीन काँग्रेस कार्यकर्त्याची पत्रे होती. उल्लेख केलेले पत्रलेखक संयमी कार्यकर्ते म्हणून नावाजलेले होते.

ही सर्व पत्रे वाचून मी सर्दच झालो व चौकशी करण्यासाठी तीन-चार दिवसांची मुदत मागून घेतली. माझ्या कार्यालगत आल्यावर अहवा, नवापून व डांग विभागात कोणाची नेमणूक केली आहे, याची चौकशी केल्यावर कळले की, सदरचे अधिकारी दौ-यावर आहेत. दौ-यावरून परत आल्यावर मला भेटण्यासाठी त्यांना कळविण्यास सांगितले.

दोन दिवसांनी दौ-यावरून परत आल्यावर ते अधिकारी मला भेटले. त्यांच्याकडे चौकशी करताना त्यांनी सभेच्या ठिकाणापर्यंत पोलिस वाहनातून श्रीमती गोदावरीबाई परूळेकर यांना नेल्याचे कबूल केले. हे करण्याचे कारण विचारता ते अधिकारी म्हणाले, ‘‘गोदावरीबार्इंची सभा अहवा येथे होती. अहवापासून २५-३० मैलांवर जंगलात गोदावरीबाई ज्या मोटारीतून प्रवास करीत होत्या, ती गाडी बंद पडली असल्याचे दिसले. बंद गाडीच्या ड्रायव्हरला तसेच पोलिस जीपच्या ड्रायव्हरला बंद गाडी सुरू करता येईना. हे होईपर्यंत संध्याकाळ होऊन गेली. गोदावरीबार्इंच्याकडे अहवापर्यंत जाण्याचे कोणतेच साधन नव्हते. रात्र पडू लागल्यावर ‘‘मला जंगलात सोडून जाऊ नका. तुमच्याबरोबर न्या.’’ अशी गोदावरीबार्इंनी विनंती केली. एकट्या स्त्रीला जंगलात सोडून जाणे योग्य वाटेना, म्हणून मी गोदावरीबार्इंना अहवाला घेऊन गेलो.’’ त्या अधिका-यांनी त्यांची बाजू मांडली.

‘‘बाईना तुम्ही थेट सभेच्या जागेपर्यंत घेऊन का गेलात? गावाजवळ का सोडले नाहीत?’’

‘‘साहेब आपण विचारलेल्या प्रश्नाला योग्य उत्तर नाही. गोदावरीबार्इंना थेट सभेच्या ठिकाणापर्यंत घेऊन जाणे योग्य नव्हते. ही चूक झाली आहे.’’ ते अधिकारी म्हणाले.

या सर्व चौकशीचा अहवाल मी यशवंतरावांना दिला व सांगितले की, या अधिका-याकडून नकळत चूक झाली. त्यांचे रेकॉर्ड फार चांगले आहे. शिवाय ते अधिकारी हरिजन आहेत. नकळत झालेल्या चुकीकडे दयार्द्र दृष्टीने ताकदीशिवाय कोणतीही शिक्षा करू नये.

यशवंतरावांनी या अधिका-याला क्षमा केली. या अधिका-याचे काम चांगले होते. सेवानिवृत्त होण्यापूर्वी त्यांना अधीक्षकाची पदोन्नती मिळाली. यशवंतरावांच्या या क्षमाशील वृत्तीमुळे महाराष्ट्र शासनातील लहानमोठे अधिकारी स्वत:च्या जबाबदारीवर मोठमोठी कामे करू लागले.

पोलिसांचे काम कसे सुधारता येईल, याबद्दल यशवंतराव मौलिक सूचना करीत. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर यशवंतरावांनी मला बोलाविले. त्या वेळेस मी गुप्तचर विभागाचा प्रमुख म्हणून काम करीत होतो. यशवंतरावांनी माझ्याबरोबर गुप्तचर विभागाच्या कामाच्या पद्धतीविषयी चर्चा केली, ते म्हणाले,

‘‘एखादी गोष्ट झाल्यावर ती कशी झाली व का झाली, याबद्दल अहवाल पाठविण्याची गुप्तचर विभागाची आजवरची रीत आहे. हे सगळे अहवाल तुम्ही नेहमीप्रमाणे शासनाच्या सचिवांकडे पाठवा. मला मात्र उद्या काय होणार आहे, याची बातमी तुम्ही आज दिली पाहिजे आणि ब्रिजमधील पिन्नेसप्रमाणे आगाऊ दिलेल्या बातम्या कमीतकमी पन्नास टक्के तरी बरोबर आल्या पाहिजेत. या माझ्या सूचनेचे पालन कसे करावयाचे ते तुमचे तुम्हीच ठरवा.’’

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार दर पंधरा दिवसांनी महाराष्ट्र राज्यात कोणत्या राजकीय घडामोडी होणार आहेत. त्याबद्दलचे एक पत्र मी मुख्यमंत्र्यांना पाठवू लागलो. पुढे होणा-या राजकीय घडामोडींची आगाऊ बातमी काढण्याच्या प्रयत्नामुळे गुप्तचर विभागाच्या कामाचा दर्जा व अहवालांची उंची वाढली. त्यामुळे गुप्तचर विभागाला ज्या गोष्टी अशक्य वाटत असत, त्या शक्य होऊ लागल्या.