मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ६८-१

‘काय गाववाले, काय चाललंय?’— यशवंतराव. मी सारा किस्सा सांगितला. त्यासरशी माझ्या बकोटीला धरून त्यांनी मला उचलले आणि तसेच कवेत धरून, जिना चढून चहासाठी मला घेऊन गेले! मी तर पुरता शरमिंदा बनून गेलो. देशाच्या संरक्षणमंत्र्यांची अशी आपुलकी मला नवीन होती.

तशाच दुख-या पायानं मी नाटक पूर्ण केलं. नाटक संपवून यशवंतराव परत जायला निघाले तेंव्हा पुन्हा रंगपटापर्यंत आले. मला बजावलं की,

 ‘‘नाटक संपलयं. असाच हॉस्पिटलमध्ये जा आणि पायाचं प्लॅस्टर पूर्ववत करून घे. प्लॅस्टर बसवून झालंय हे मला समजलं पाहिजे. जबाबदारी लक्षात ठेवा. मघाशी पाय पाहिला त्याच वेळी, खरं म्हणजे मी तुला त्याच वेळी हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं होतं? प्रेक्षकांसाठी तू स्वत: यातना सहन करतोस याचा अभिमान वाटतो.’’

यशवंतरावांमधील माणूसपणाचं त्या रात्री मला वेगळंच दर्शन घडलं. दुरितांचं तिमिर जाण्यासाठी झटणा-या या माणसाची त्या रात्रीची आठवण माझ्या मनात बिंबून राहिली.

दिल्लीतल्या मुक्कामातील अनुभव तर थक्क करून सोडणारा आहे. ‘पंडितराज जगन्नाथ’ या नाटकाचा दिल्लीत प्रयोग होता. यशवंतराव नाटकाला येणार असं आम्ही गृहीत धरलं होतं. परंतु त्यांनी आम्हाला त्या दिवशी वेगळाच धक्का दिला. पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंसमवेत नाटकाला येणार असल्याचा त्यांचा निरोप मिळताच आनंदाला पारावार उरला नाही.

नियोजित वेळेला पंतप्रधानांसह यशवंतराव दाखल झाले. नाट्यप्रयोग सुरू झाला. कलागुण दाखिवण्याची त्या रात्री जणू काही आमच्यात चढाओढच लागून राहिली. प्रयोग अप्रतिम रंगला.

पंतप्रधान पं.नेहरूंची उपस्थिती लाभलेली असल्यानं त्यांच्यासाठी चहापानाची चोख व्यवस्था थिएटरमध्ये अन्यत्र करून ठेवली होती. मध्यंतरात एका विशिष्ट दरवाजाने पं. नेहरू आणि यशवंतराव यांनी प्रवेश करायचे संयोजकांनी ठरविले होते आणि त्यांच्या स्वागतासाठी भालचंद्र पेंढारकर आणि मंडळी त्या दरवाजाशी थांबली होती. खुच्र्यांची मांडामांड व्यवस्थित झालेली आहे किंवा कसे हे पाहण्यासाठी मी आत थांबलो होतो आणि खुच्र्या लावून घेत होतो.

मी पाठमोरा होतो अन् आश्चर्य असे की पं.नेहरूंच्या समवेत यशवंतराव तिथं पोहोचले होते. ‘अरे चित्तरंजन, काय करत आहेस, पंडितजी आलेत’ यशवंतरावांच्या तोंडून मी हे ऐकलं आणि सर्दच झालो. त्यांचं स्वागत करून त्यांना आत घेऊन येणारी मंडळी अजून दारावरच उभी होती. हे दोघे ज्येष्ठ चहाच्या टेबलापर्यंत पोहोचले होते. भांबावलेल्या मनानं मी तिथूनच ओरडलो, ‘अरे इकडे आत या, पंडितजी इथं आले आहेत.’

घडलं ते असं की, हे दोघेही त्या दरवाजाकडे गेलेच नाहीत. प्रेक्षागृहातून उठले ते सरळ स्टेजचा पडदा बाजूला करून मधल्या फटीतून स्टेजवर आले आणि तेथून थेट चहाच्या ठिकाणी !

‘असं कसं झालं ?’ - कुणीतरी यशवंतरावांना विचारलं.

‘‘अरे हे नटराजाचं क्षेत्र आहे. रंगमंदिर आहे. स्वागत करायचं ते त्याचं इथं कसला आलाय मानपान ? ’’

- यशवंतराव मोकळेपणानं हसले.

कलेची कदर करणारी ही आठवण मनात कोरून ठेवली आहे. कलेची आणि कलावंताची कदर म्हणून जी म्हणतात ती काही वेगळी असू शकते काय असा प्रश्न नेहमीच माझ्यासमोर उभा राहतो !