मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ६७-१

‘‘बरं बरं!’’ म्हणत मी पुन्हा नमस्कार केला आणि विजेच्या चपळाईने खाली उतरले. कारण लोक हा प्रकार तोंडात बोट घालून पहातच होते. आता मला त्याची लाज वाटली. पण मनासारखे घडल्याच्या आनंदात मी मात्र सचैल डुंबत होते.

नंतर मी तसे पत्राचे वगैरे इतर व्यापात विसरलेच होते पण एक दिवस माझ्या नावे मंत्रालयाचा शिक्का असलेला एक सरकारी लखोटा पोस्टमनने आणून दिला. प्रथम मला काहीच उमजेना ! लखोटा जरा उलटसुलट केल्यावर ‘मुख्यमंत्र्यांकडून’ असे वाचले नि माझा आनंद गगनात मावेना! मी नुसती पाहातच राहिलेली दिसताच माझ्या पतींनी तो घेऊन फोडला आणि म्हणाले, बाईसाहेब, तुमच्या बंधुराजांचे यशवंतरावजींचे तुम्हास पत्र आलेय, वाचता वाचताच ते मनाशी वा, वा करू लागले. मग मी म्हटले,

‘अहो, असं काय करता वाचा की मोठ्ठ्यानी?’

‘ऐक, मुख्यमंत्री म्हणताहेत, ताई तुमची कविता अतिशय आवडली. कवितेतील भावाचा केलेला एवढा गौरव वाचून अक्षरश: मन भारावून गेले. मायेच्या माणसांच्या शाबासकीचे मोल करताच येणार नाही. पुन्हा कधीतरी निवांत भेटू वगैरे वगैरे. नागपूरला आल्यास बंगल्यावर या. मला व तुमच्या वहिनी सौ. वेणूतार्इंना खूप आनंद हाईल.’

हा सारा मजकूर असलेले ते मौल्यवान पत्र मी एखादा रत्नजडीत दागिना जपावा तसे अद्याप जपून ठेवले आहे.

त्यांना आवडलेली त्या वेळची ही कविता—

मुख्यमंत्री यशवंताचे यशोगान
यशवंता तव यशगानाने पुनित धरा होई
शिवरायाच्या वारसदारा प्रणाम हा घेई
धन्य धन्य ती वीरप्रसवा महान भाग्याची
माय माऊली तुझी जशी रे जिजाऊ शिवबाची
अनेक वर्षाने ये उद्या नवा महाराष्ट्र
मुख्यमंत्रि तू आम्हा लाभला, सद्गुणी अन् श्रेष्ठ
तूच पुढारी रक्षणकर्ता तूच योग्य नेता
तूच दाखवी मार्ग आम्हाला विजयाचा आता
कुणी नसावे असंतोषी अन् उच्च नीच येथे
रामराज्य जणु पुन्हा अनुभवा यावे आम्हाते
शारदेचिये दरबारातिल साहित्यिक नाना
तुझ्या स्वराज्यी योग्य प्रतिष्ठा, लाभावी त्यांना
शीलवतींच्या शीलासाठी संरक्षक व्हावे
तुझ्या मंदिरी सती देवता यांना आदरावे
हवा हवासा व्हावे आपुल्या प्रिय राष्ट्रालागी
तन मन वेचुनि सेवा करूनी कीर्ती मिळवावी
भूउद्धारा आम्हीही अर्पितो आहुती प्राणांची
हे वीरांगणा तुझ्या पाठीशी शक्ती लाखांची
प्रचंड स्वागत गावोगावी थाटाने होई
यशवंता तव भाग्य पाहुनी गहिवर मनि येई।।