• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य ७८

१७

पंडित जवाहरलाल नेहरू

पं. नेहरूंना मी १९३१ मध्ये प्रथम पाहिले कराडला. मी शाळेत शिकत होतो आणि विद्यार्थ्यांच्या चळवळीत थोडा-बहुत भागही घेत होतो. एके दिवशी आम्हांला कुणकुण लागली ! पं. नेहरू बंगलोर मेलने जाणार आहेत. बंगलोर मेल कराड स्टेशनवर मध्यरात्रीनंतर येते. अशा आडवेळी पं. नेहरूंना उठवावे, की उठवू नये, अशा द्विधा मनःस्थितीत स्थानिक नेते होते. पण या चर्चेत मला काहीच रस नव्हता. माझ्या मनाचा निश्चय केव्हाच झाला होता. पं. नेहरूंच्या दर्शनाची ओढ मला व माझ्या सहकारी मित्रांना लागली होती. आम्ही पं. नेहरूंना उठवून विद्यार्थ्यांसमोर उभे करावयाचे ठरविले होते. ठरल्याप्रमाणे त्या मध्यरात्री आम्ही पाचशे विद्यार्थ्यांचा तांडा घेऊन कराड स्टेशनच्या फलाटावर जमलो. गाडी यावयाची वेळ जसजशी जवळ येत होती, तसतसे आमचे औत्सुक्य शिगेला पोचत होते. अखेर शेवटी तो क्षण जवळ येऊन ठेपला. बंगलोर मेल कराड स्टेशनवर उभी राहिली. पंडितजींचा डबा आम्ही शोधून काढला व डब्याच्या भोवती आम्ही उभे राहिलो. धडधडत्या अंतःकरणाने डब्याचे दार आम्ही वाजविले. क्षणार्धातच पंडितजी जागे झाले. दार उघडून बाहेर आले. काहीशा रागीट मुद्रेनेच त्यांनी आमच्याकडे पाहिले. पण हा राग लगेच मावळला. गाडी सुटण्याची वेळ होईपर्यंत या पाच मिनिटांत पंडितजी आम्हां बाळगोपाळांच्या मेळाव्यात होते. पं. नेहरू त्या गाडीने हुबळीला निघाले होते. त्यांच्याबरोबर, मला आठवते, त्याप्रमाणे हिंदुस्थानी सेवा दलाचे डॉ. हर्डीकर आणि श्रीमती कमलादेवी चटोपाध्याय ही मंडळी होती.

पं. जवाहलाल नेहरू यांचे हे पहिले दर्शन झाल्यावर प्रत्यक्षतः त्यांना पाहण्याचा योग पुढे कित्येक वर्षांपर्यंत आला नसला, तरी विचाराने त्या काळातील आम्ही तरुण मंडळी त्यांच्या आसपासच वावरत होतो. त्यांच्या व्याख्यानांचे वृत्तान्त आवडीने वाचत होतो. त्यांच्यासंबंधीचे लेख, आठवणी मिळवीत होतो. वाचत होतो.

- आणि अशा त्यांच्यासंबंधीच्या औत्सुक्याने भरलेल्या काळात आणि संस्कारक्षम वयात त्यांची आत्मकथा माझ्या वाचनात आली. १९३४-३५ साल असेल ते. कॉलेजमध्ये असताना मी त्या ग्रंथाचे वाचन केले. आज तीस वर्षांनतर सुद्धा तो ग्रंथ, त्याचे त्या काळी केलेले वाचन या सर्व गोष्टी अजून ताज्या वाटतात. मला वाटते, आत्मकथेच्या वाचनानंतर आपला नेता हाच, ही भावना अधिक दृढ झाली. राष्ट्रीय चळवळीतील एक आकर्षक नेता म्हणून आम्ही त्यांच्या जवळ गेलो होतो, पण वैचारिकदृष्ट्या त्यांचे नेतृत्व मी आत्मकथेच्या वाचनानंतर स्वीकारले. विचाराने त्यांच्याजवळ जो गेलो, तो शेवटपर्यंत कधी दुरावा निर्माण झाला नाही. त्यांच्यासंबंधीचे वाचन, मनन पुढे चालूच राहिले. मेळावे, अधिवेशने, जाहीर सभा यांतून लाखो श्रोत्यांतील एक म्हणून त्यांना पाहतही होतो. पण त्यांची प्रत्यक्ष भेट मात्र १९५२ पर्यंत कधी झाली नाही.

पं. नेहरूंचा प्रत्यक्ष परिचय होण्याचा योग मी मुंबई सरकारचा पुरवठा मंत्री असताना आला. रफी अहमद किडवाई केन्द्रीय पुरवठा मंत्री होते व निर्नियंत्रणासंबंधीचे धोरण ते आखत होते. त्यासंबंधीच्याच काही चर्चेसाठी मी दिल्लीला गेलो होतो. मुंबईत तेव्हा रेशनिंग चालू होते व आम्ही ते काटेकोरपणे चालवीत होतो. निर्नियंत्रणानंतर मुंबई शहराच्या धान्य-पुरवठ्यासंबंधी काही प्रश्न निर्माण होणार होते. किडवाई साहेबांशी प्रदीर्घ चर्चा केल्यानंतरही त्यातून जेव्हा काही निष्पन्न झाले नाही, तेव्हा त्यांच्याच सल्ल्यानुसार मी पंडितजींना भेटलो. जवळजवळ तास, दीडतास मी त्यांच्याशी चर्चा केली आणि मुंबई शहराला रेशनिंगच्या काळात मिळत असलेले धान्य पुढेही मिळत राहिले पाहिजे, हा माझा मुद्दा मी पंडितजींना पटवून देऊ शकलो, याचा जसा मला आनंद झाला, त्यापेक्षा त्यांच्याशी आपला परिचय झाला, याचा आनंद, नाही म्हटले, तरी माझ्या मनात भरून राहिला होता. त्या आनंदाने भरलेल्या मनानेच तेव्हा मी दिल्लीहून परतलो होतो.