• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य २४०

दुसरा एक मुद्दा दलित साहित्यासंबंधी सांगण्यासारखा आहे. ती एक उपेक्षित सामाजिक स्तरांच्या भावनांची जी कोंडी इतकी वर्षे होती, ती आज फुटली आहे. त्याचा सामाजिक सुधारणेसाठी वा सामाजिक प्रक्रियेसाठी उपयोग होईल. जी समाजसंस्था जुनी झाली आहे, तिच्याविषयी संबंधित सामाजिक गटांना काय वाटत होते, तिचा जाच त्या गटांना कसा होत होता. त्यांचा सामाजिक अनुभव काय होता, याचे हे दर्शन या साहित्यातूनच घडते, ते सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. सामाजिक वास्तवता कितीही कठोर व कटू असली, तरी ती समाजसुधारकाला पाहावी लागते. एखाद्याच्या रोगाचे निदान करण्यासाठी डॉक्टरला जशी माहिती हवी असते, तसेच हे आहे. म्हणून हे साहित्य हा आरसा आहे. त्याचा सामाजिक उपयोग होण्यासारखा आहे. केवळ साहित्यबाह्य निकष लावून जरी या साहित्याचा विचार केला, तरी ते मोलाचे आहे.

मराठी वाङ्‌मयाच्या दृष्टीने साहित्यिकांनी विचार करण्यासाठी मी आणखी दोन मुद्दे मांडतो. ते म्हणजे मराठी वाङ्‌मयाची गुणवत्ता आणि विस्तार. दोन्ही दृष्टींनी त्याचा अन्य भारतीय भाषा आणि प्रगत जागतिक भाषा यांच्याशी सांधा जुळविणे आवश्यक आहे. पाश्चात्य इंग्रजी वाङ्‌मयानेच सामान्यतः आपल्यावर संस्कार केले आहेत. त्यांचे अनुकरण गेल्या दीडशे वर्षांत आपण करीत आहोत. मला वाटते, जगातील अनेक राष्ट्रे मुक्त झाली आहेत, त्यांच्या विचारधनाचा, ललित वाङ्‌मयाचा परिचय, त्यांचे संघर्ष आपल्या भाषेत आणणे आवश्यक आहे. विशेषतः आशिया व आफ्रिका यांतील साहित्याचा, त्यांतील विचारांचा परिचय मोठ्या प्रमाणात करून घेणे आवश्यक आहे. आपल्या मनाचे जे पश्चिमीकरण झाले आहे, ते ऐतिहासिक दृष्ट्या अपरिहार्य असले, तरी आता योजनापूर्वक इतर विश्वसाहित्याचा व्यापक व सखोल अभ्यास झाला पाहिजे.

जसे विश्वसाहित्यविषयी आपण उदासीन राहता कामा नये, तसेच, आपण भारतीय भाषाभगिनींकडे दुर्लक्ष करता कामा नये. गेल्या पंचवीस वर्षांत सर्वच भारतीय भाषा कमी-जास्त प्रमाणात विकसित झाल्या आहेत. त्यांच्यांतील नव्या प्रवाहांची ओळख आपण करून घेतली पाहिजे. भारतीय साहित्य नावाची संकल्पना त्यातून साकार होत आहे. भारतीय साहित्य म्हणजे वेगवेगळ्या भाषांतून लिहिल्या जाणा-या सामाजिक अनुभवाचा आरसा असेल. मी केवळ राष्ट्रीय अस्मितेच्या दृष्टीने राष्ट्रीय साहित्य आवश्यक आहे, असे म्हणत नाही. पण ज्ञानेश्वर, तुकाराम आणि कबीर भारतीय कवी आहेत, असे मी मानतो. याचे कारण भारताच्या अंतरंगाचे दर्शन यांचे साहित्य घडविते. आधुनिक काळात शरच्चंद्र किंवा ह. ना. आपटे हे जसे या राष्ट्रीय उषःकालाचे कांदबरीकार होते, तसेच आता राष्ट्रीय प्रबोधनाचे साहित्यिक निर्माण झाले पाहिजेत.

भारतीय संगीत, भारतीय रंगभूमी या संकल्पना आता जशा रूढ होत आहेत, तशी भारतीय साहित्य ही संकल्पना आता रूढ झाली पाहिजे. पण असे व्हावयाचे असेल, तर मराठी वाङ्‌मयातील उत्कृष्ट कृतींचे रूपांतर हिंदीमध्ये व्हावयास पाहिजे. अलीकडे वि. स. खांडेकर यांच्या कादंब-या मोठ्या प्रमाणात हिंदीमध्ये भाषांतरित केल्या गेल्या. तसेच, अलीकडे विजय तेंडुलकर-खानोलकर यांच्या नाटकांची रूपांतरे हिंदी रंगभूमीवर येत आहेत. त्यांत खरी प्रादेशिकता कमी असते. ती नव्या सामाजिक परिस्थितीची प्रातिनिधिक नाटके आहेत. कारण नागरी जीवनातील मध्यमवर्गाच्या समस्या नव्या औद्योगिक संस्कृतीमुळे भारतात सर्वत्र सारख्याच आहेत. त्यांचे प्रतिबिंब त्यांत आढळते. सत्यजित रे यांचे चित्रपट हे भारतीय चित्रपट मानले जातात. कारण त्यांत आधुनिक भारतीय मनः प्रवृत्तीचे व भारतीय समाजाचे प्रतिबिंब असते. तेव्हा प्रादेशिक भाषेत लिहिले गेलेले साहित्य हे राष्ट्रीय साहित्य असते व ते केवळ भौगोलिक अर्थाने नव्हे, तर त्यातील अंतरंगावरूनही ते साहित्य भारतीय ठरावे. मला वाटते, की मराठी साहित्याला या दोन्ही दिशांनी स्वतःचा विकास करावा लागेल. भारतीयता, विश्वात्मकता व मराठीपणा हे तिन्ही गुण एकाच साहित्यात एकाच वेळी नांदले, तर ते साहित्य समृद्ध होईल. त्यात भिन्नरुचित्व येईल. इंद्रधनुष्याची प्रभा त्यावर पसरेल.