यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ५८

चव्हाणांच्या लेखसंग्रहाबद्दल बोलणे झाले व बहुतेक प्रती खपल्या असे ते म्हणाले, तरी तुमच्या उपयोगासाठी एक प्रत देईन असेही म्हणाले. ‘जोशी’ आले आहेत असा आतून निरोप आला. म्हणून ते उठले, यामुळे बोलणे संपले.

पुण्यास गु. कै. बाबूराव जगताप वाईस ब्राह्मोसमाजात आले असताना ब-याच वर्षापूर्वी म्हणाले होते की – ‘यशवंतरावांच्या अंगी कर्तृत्वशक्ती आहे. ते कार्य करू शकतील. त्यांच्या हातून जरूर ते कार्य होईल. ते एकटेच समर्थ दिसतात.’ यशवंतरावांना आम्ही हे उद्गार सांगितले व त्यांना वंदन करून आम्ही त्यांचा निरोप घेतला. चव्हाणांच्या सहवासामुळे अद्याप धन्यता वाटते. पण भेटीत चर्चिलेला पुढील मुद्दा सांगून हा लेख पुरा करणे जरूर वाटते.

यशवंतरावांच्या समाजकारणावर लिहिताना, त्यांचा परंपरागत गुरूवादासंबंधीचा दृष्टीकोन व्यक्त करणे अत्यंत जरूरीचे आहे. ‘शिवाजी व रामदास’ यांच्या गुरूशिष्य संबंधावर महाराष्ट्रात रणं माजली! व निश्चित पुराव्याशिवाय अद्याप वादाचा निकाल लावणे अशक्य आहे. म. फुले यांनी कोणासच गुरू केले नव्हते. त्यांना मात्र अनेक शिष्य अनुयायी होते व आजही वाढत आहेत. यशवंतरावांनी देखील कोणासच गुरू केले नव्हते. असे असतानाही तर्कतीर्थ जोशी हे त्यांचे ‘गुरू’ असे प्रतिपादण्याची पश्चिम महाराष्ट्रात एक रूढी दिसते. पण तर्कतीर्थ यशवंतरावांना ‘मित्र’ म्हणून समजतात. ‘कृष्णाकाठ’ पुस्तकात तर्कतीर्थाची क-हाडास झालेली व्याख्याने ऐकून राष्ट्रीय चळवळीचा त्यांच्यावर फार परिणाम झाला असे ते लिहितात हे खरे आहे. (पृ. ६५) एम्. एन्. रॉय यांनी दुसरे महायुद्ध हे फॅसिस्टांनी सत्ता बळकाविण्यासाठी चालू केले आहे व इंग्रज जरी साम्राज्यवादी होते तरी त्यांचा पराभव झाला तर जर्मनीची फॅसिस्ट सत्ता जगावर जारी होईल म्हणून इंग्रजांना महायुद्धात साह्य करण्याचा सक्रिय पवित्रा रॉय यांनी घेतला. एम्. एन्. रॉय यांचे शिष्य तर्कतीर्थ यांनी देखील त्यांचेच अनुकरण केले. पण चव्हाणांना इंग्रजाला साहाय्य करण्याचा विचार-आचार पटला नाही. यामुळे यशवंतराव रॉयवाद्यांपासून दूर झाले. (पृ. २०१) मार्कसवादाचा देखील चव्हाणांनी रॉय यांच्या नव मानवतावादाप्रमाणे अभ्यास केला होता. समाजवादाचाही त्यांनी परिचय करून घेतला होता. हे जे प्रवाह समकालीन होते त्यांचे निरीक्षण, परीक्षण करून स्वावलंबनाने हिंदी स्वातंत्र्याचा गांधी-नेहरू यांच्या लढ्याचाच त्यांनी मार्ग स्वीकारला. रॉयवादी, स्वातंत्र्य आल्यावर त्यांचा राजकीय स्वतंत्र पक्ष बरखास्त करिते झाले व पुष्कळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला व सत्तेचेच आश्रित झाले. तत्त्वज्ञान बोलण्यास व लिहिण्यास सोपे असते. ‘नवमानवतावाद’ हा देखील एकप्रकारे ‘युटोपिया’ असू शकतो. आदर्शवाद व्यवहारात येणे सोप नसते!

चव्हाणांनी कोणासच गुरू केले नाही. तर्कतीर्थ जोशी यांचा अमृतमहोत्सव वाईस मोठ्या प्रमाणात झाला. त्यावेळी देखील ‘माझा कोणी गुरू नाही’ असे जाहीरपणे सांगितले व हे विचार त्यांनी लेखी देखील नमूद केले आहेत. उदा. तर्कतीर्थांच्या वाढदिवसानिमित्त ‘नवभारत’ (प्राज्ञ पाठशाळा, वाई) यामध्ये त्यांनी लिहिलेल्या लेखात गुरूशिष्य-संबंधावर प्रकाश टाकणारा लेख लिहिला आहे. दिल्लीत त्यांच्याशी बोलताना वरील खास अंकात ‘यशवंतराव यांचे गुरू तर्कतीर्थ’ असे दुस-या लेखात विधान केले आहे असे मी सांगितले. तेव्हा त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. या सर्वांचे अर्थ असा नव्हे की – यशवंतराव यांना तर्कतीर्थांचे अवमूल्यन करावयाचे होते. यशवंराव तर्कतीर्थांना फार मानीत. तर्कतीर्थांची सल्लामसलत घेत, त्यांच्याशी चर्चा करीत. गाठीभेट होत. तर्कतीर्थांनी मोरारजीनंतर महाराष्ट्रात चव्हाणांचे नेतृत्व प्रभावी झाल्यावर चव्हाणांच्या राजकारणाला पाठिंबा दिला. ‘हिरे चव्हाण’ यांच्या मतभेदात तर्कतीर्थांनी चव्हाणांना सल्लामसलत दिली.