थोरले साहेब - ९३

मुंबई तशी मला नवीन नाही.  मलबार हिल हा भाग मात्र मी कधी पाहिला नव्हता.  ऐरी बंगला नीटनेटका करण्यात मी गुंतले.  सर्वात प्रथम साहेबांची वाचनालयाची खोली व्यवस्थित केली.  त्याला लागूनच साहेबांची झोपण्याची खोली होती.  ती डोंगरेंनी साहेबांच्या मनाप्रमाणे सजविलेली होती.  मी माझ्या स्वयंपाकघराचा ताबा घेतला.  स्वयंपाकघरात आवश्यक तेवढ्या सामानाची यादी करून डोंगरे यांच्याकडे दिली.  स्वयंपाकघराला लागून छोटेखानी देवघर, त्यात महात्मा गांधींचा फोटो लावून घेतला.  शेवटी माझ्या खोलीत गेले.  माझ्या मनाप्रमाणे माझ्या खोलीत सामान लावून घेतलं.  डायनिंग हॉल आणि बैठक डोंगरे यांनी साहेबांच्या मनाप्रमाणे तयार केली होती.  नोकरचाकर हाताखाली होतेच.  

महाराष्ट्र आणि दुष्काळ यांचं अतूट नातं.  त्रेपन साल उगवलं ते दुष्काळाला सोबत घेऊन.  केंद्र शासनाकडून अधिकचा धान्य कोटा वाढवून घेणं आवश्यक होतं.  त्याकरिता साहेबांचे प्रयत्‍न सुरू झाले.  केंद्रीय अन्नमंत्री किडवाई यांचा दुष्काळग्रस्त भागात दौरा आयोजित करण्याचं साहेबांनी ठरविलं.  त्याच वेळी हैदराबाद येथे काँग्रेस अधिवेशन घेण्याचं घाटत होतं.  त्या अधिवेशनानंतर तुम्हाला तारीख देतो, असं अन्नमंत्र्यांनी कळविलं.  ही चालढकलच जनतेच्या असंतोषाला कारणीभूत ठरते असं साहेबांचं मत झालं.  अन्नमंत्र्यांचा दौरा, पाहणीनंतर मदत यात वेळेचा अपव्यय होतो.  सामान्य जनतेला उपासमारीच्या खाईत ढकलण्याचा हा प्रकार आहे.  महाराष्ट्राला दुष्काळ निवारण्यासाठी केंद्राकडून काही आर्थिक मदत मिळते का म्हणून साहेबांनी प्रयत्‍न सुरू केले.  तिथे चिंतामणराव देशमुखांनी आडवा पाय घातला.  अन्नमंत्र्यांच्या दौर्‍यात पंचमहल, विजापूर या भागांचा समावेश करावा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी साहेबांना दिला.  रेशनिंगसाठी अधिकचा अन्न कोटा उपलब्ध करून घेणे व अर्थमंत्र्यांनी निर्माण केलेली अडचण दूर करणे या कामाला साहेबांनी प्राधान्य दिलं.

नगर जिल्ह्यातील कर्जत भागातील दुष्काळी भागास भेट देताना घोगरगाव या ग्रामीण भागातील माणुसकीचा आलेला अनुभव साहेबांनी सांगितला.  

म्हणाले, ''खायला अन्नधान्य नाही, पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब.  अशा अवस्थेत घोगरगावच्या ग्रामस्थांनी मला दूध, कॉफी घेऊन जाण्याबद्दल आग्रह केला.''  या आदरातिथ्याबद्दल मला गहिवरून आलं.  

दुष्काळी परिस्थितीची कल्पना साहेबांनी हिरे यांना दिली.  हिरे आणि किडवाई यांच्यात धान्याचा कोटा वाढवून देण्याच्या संदर्भात बोलणं झालं,  असं हिरे यांनी साहेबांना सांगितलं.  काकासाहेब गाडगिळांचा हिरे यांच्या निवासस्थानाहून साहेबांना फोन आला.  साहेब त्यांना भेटण्यासाठी हिरे यांच्या बंगल्यावर गेले.  गाडगीळदेखील किडवाई यांच्याशी धान्यपुरवठ्याबद्दल बोलले.  हिरे आणि गाडगीळ यांनी जी माहिती दिली त्यात तफावत आढळत होती.  साहेबांनी दिल्लीला परिषदेला गेल्यानंतर माहिती पडताळून पाहण्याचं ठरविलं.  कारण काकासाहेब गाडगीळ अघळपघळ गप्पा मारण्यात रमून जातात.  त्यामध्ये आत्मप्रौढी व थापांची सहज पेरणी करून टाकतात.

८ जानेवारीच्या अन्न परिषदेकरिता दिल्लीला जाण्यापूर्वी साहेबांनी मोरारजी देसाईंची भेट घेतली. मोरारजी देसाई नुकतेच हैदराबाद येथील वगि कमिटीच्या बैठकीला जाऊन आले होते.  वगि कमिटीतील हकिगत मोरारजींनी साहेबांना सांगितली.

म्हणाले, ''भाषावार प्रांतरचनेवर चर्चा चालू असताना त्यात हैदराबादचा प्रश्न निघाला त्या वेळी नेहरूजी म्हणाले, ''हैदराबादची विभागणी मी होऊ देणार नाही.  प्रसंग आल्यास सर्व सैन्य नेऊन तेथे उभे करील.''