थोरले साहेब - १५०

''विदर्भाच्या संदर्भात मी जाहीर वक्तव्य केलेलं आहे.  ते मला बदलता येणार नाही; पण मी तुमच्याविरोधात जाणार नाही'' अशी कन्नमवारांची भूमिका वेगळी होती.

साहेबांनी कन्नमवारांना विचारले, ''हा तिढा कसा सोडवायचा ?''

कन्नमवार म्हणाले, ''दोन्ही भागातील दोन-दोन, तीन-तीन काँग्रेसजनांची एक समिती नेमावी.  त्यांच्या सल्ल्याप्रमाणं निर्णय घ्यावा.''

फक्त विदर्भ-महाराष्ट्राशी निगडित हा प्रश्न नव्हता तर गुजरातच्या बाबतीतही विचार करावा लागणार होता.  मोरारजी मुंबईला आले असताना साहेबांनी त्यांची भेट घेतली.

म्हणाले, ''द्वैभाषिकाचा फेरविचार करणं अत्यंत गरजेचं आहे.  आता आपण काही न करता गप्प बसलो तर परिस्थिती गंभीर होईल, कदाचित हाताबाहेर जाईल.''

मोरारजींच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असता त्यांनी विचारलं, ''तुम्हाला याबाबत काय करावं असं वाटतं ?''

साहेब म्हणाले, ''तुम्हाला द्वैभाषिकांची विभागणी मान्य नाही.  तुमच्यावर अविश्वास दाखवला असं तुम्हाला वाटतं; पण आपण दोघांनी एकत्र बसून यावर मार्ग काढण्याची योग्य वेळ आलेली आहे.  शांततेच्या मार्गाने आणि कुठलीही कटुता निर्माण न होता दोन स्वतंत्र राज्ये निर्माण करूया.''

साहेबांच्या या तोडग्याला मोरारजींनी मान्यता दिली.

''दिल्लीच्या नेत्यांचं मत अजमावलं आहे का ?''  असा प्रतिप्रश्न साहेबांना मोरारजींनी विचारला.

त्यावर साहेब म्हणाले, ''नेहरूजींच्या सल्लामसलतीची गरज नाही.''

मोरारजी साहेबांना म्हणाले, ''तुम्ही दिल्लीच्या नेत्यांशी चर्चा करा.  त्यांच्याकडे आग्रह धरा. आपण दोघं गुजराती नेत्यांना बोलू.''

मोरारजींसोबत चर्चा केल्यानंतर साहेब दिल्लीला गेले. तिथे गोविंद वल्लभ पंतांना विदर्भाविषयी व मोरारजींबरोबर झालेल्या चर्चेचा वृत्तांत सांगितला.  त्यांनी साहेबांना 'आगे बढो' असं म्हणून प्रोत्साहन दिलं.  नेहरूजींना नंतर सांगू म्हणाले.  मुंबईला परत आल्यानंतर साहेब कामात गुंतले. आठ दिवसांनंतर दिल्लीहून मोरारजींचे साहेबांना बोलावणे आले.  साहेब लगेच मोरारजींना भेटण्यासाठी दिल्लीला गेले.

मोरारजींनी साहेबांना विचारलं, ''गुजरातची राजधानी व डांगच्या भविष्याबद्दल तुम्ही काही विचार केला आहे का ?''

साहेब म्हणाले, ''याबाबत आपण जो मार्ग मला सुचवाल त्याप्रमाणे मी माझ्या सहकार्‍यांशी विचारविनिमय करून आपणास कळवितो.''