थोरले साहेब - १४६

हैदराबादच्या चर्चेची आठवण देऊन लगेच पंडितजींनी साहेबांना विचारलं, ''द्वैभाषिक राज्याची विभागणी करून दोन स्वतंत्र राज्ये निर्माण केली तर जनतेचं समाधान होईल का ?''

''निश्चितचं जनतेचं समाधान होईल.'' साहेब.  

''दोन्ही राज्यांत काँग्रेसला बहुमत मिळेल का ?  काँग्रेसला १९५७ च्या निवडणुकीत कमी जागा मिळाल्या होत्या.'' पंडितजी.

''याबाबत मी विचार केला नाही; पण मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला तर महाराष्ट्रात हमखास काँग्रेसला यश मिळेल.  याबाबत मी माझ्या सहकार्‍यांशी चर्चा करून पुढील बैठकीत आपणास वस्तुस्थिती सांगू शकेल.'' साहेब.

पुढील बैठकीत माहिती घेण्याचं नेहरूजींनी मान्य केलं.  भेट संपली.  नेहरूजींना काँग्रेसच्या बहुमताची हमी हवी होती.  

जानेवारी १९५९ ला काँग्रेसचं अधिवेशन नागपूरला घेण्यात आलं.  साहेबांकडे या अधिवेशनाचं यजमानपद होतं.  नेहरूजींचा मुक्काम राजभवनावर होता.  नेहरूजी अधिवेशनसमयी त्या भागातील जनतेच्या आवर्जून भेटी घेत असत.  त्यांच्या प्रश्नांसंबंधी चर्चा करीत असत.  नागपूर आणि विदर्भातील जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करीत असताना साहेबांना हजर राहावं लागे.  साहेबांची आणि नेहरूजींची वारंवार भेट होऊ लागली.  अधिवेशन संपण्याच्या एक दिवस अगोदर संध्याकाळी नेहरूजींचे साहेबांना बोलावणे आले.  या भेटीच्या वेळेसही साहेब आणि नेहरूजी दोघेच होते.

नेहरूजींनी साहेबांना विचारले, ''द्वैभाषिक राज्याची विभागणी केल्यावर काँग्रेसला बहुमत मिळेल का ?  यावर विचार करून आलात का ?''

''होय, मी विचारविनिमय करून आलो आहे.  आपल्याला बहुमत मिळेल असा मला विश्वास आहे.'' साहेब.  

''बहुमत कसं मिळेल हे मला पटवून द्या''  नेहरूजी.

''तांत्रिक दृष्टिकोनातून आपण अल्पमतात आहोत.  विधानसभेतील पंधरा सदस्य हे केवळ संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर विरोधात आहेत.'' साहेब.

''ते आपल्या पक्षात येतील का ?''  नेहरूजी.

''ते आपल्या पक्षात येतील की नाही हे मला सांगता येणार नाही; पण द्वैभाषिकाची विभागणी होत आहे.  मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात येत आहे हे कळताच ते आपल्याला पाठिंबा देतील.  कदाचित पक्षातही येतील.'' साहेब.

''मला त्यांची नावे कळण्याची आवश्यकता नाही; पण ते पाठिंबा देतील हे निश्चित आहे का ?  त्यांचा तुमच्यावर विश्वास आहे का ?''  नेहरूजी.

''होय, ते माझ्या संपर्कात आहेत.'' साहेब.