थोरले साहेब - १३९

अनेक ज्ञात-अज्ञात वीरांनी मराठवाड्याच्या मुक्तीसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली.  वानगीदाखल म्हणून मी काही नावांचा नामोल्लेख करतो, ज्यांची नावं मला आठवणार नाहीत त्यांच्याही बलिदानाची दखल शासन घेणार आहे.  वसमत तालुक्यातील वापटीचे बहिर्जी शिंदे, बीडचे बलभीमराव कदम, नांदेड जिल्ह्यातील अर्धापूरचे पानसरे यांचं बलिदान मराठवाड्याच्या कायम स्मरणात राहील.  त्यांच्या बलिदानानं मुक्त झालेला मराठवाडा महाराष्ट्रात लहान भाऊ म्हणून सामील झाला.  तो मोठ्या अपेक्षेनं मोठ्या भावाकडे पाहतोय. या लहान भावाचं संगोपन करणं हे मोठ्या भावाचं कर्तत्व आहे.  त्याच भावनेतून शिक्षणाची मुहूर्तमेढ देशाच्या भाग्यविधात्याच्या हस्ते आज आपण रोवली आहे.  उच्च शिक्षणाची दारं तुमच्याकरिता आज उघडी झाली आहेत.  या संधीचा लाभ दलित, वंचित, उपेक्षित वर्गांनी घ्यावा.  आपला विकास करून घ्यावा.  शासन तुम्हाला कुठलीच कमतरता पडू देणार नाही अशी मी तुम्हाला ग्वाही देतो.''  नेहरूजींनी महाराष्ट्राच्या विकासाची आणि साहेबांची मुक्तकंठाने स्तुती केली.

नेहरू म्हणाले, ''मी मोठ्या आत्मविश्वासानं द्वैभाषिक राज्याची सूत्रं चव्हाण यांच्या हाती सोपविली.  माझा हा निर्णय माझ्या काही सहकार्‍यांना आवडला नाही.  महाराष्ट्रात अनेक दिग्गज नेते असताना त्यांना डावलून एका सामान्य किसान पुत्र चव्हाणांच्या हाती महाराष्ट्रासारख्या प्रगत आणि जागृत प्रदेशाची सूत्रं काय म्हणून नेहरूजींनी दिली ?  असा सूर निघत होता; पण या किसानपुत्र चव्हाणांनी माझा विश्वास सार्थ करून दाखविला.  मला त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटतो.  चव्हाणांसारखे इतर राज्यातील कर्तृत्ववान मुख्यमंत्री मला मिळाले तर मी भारताला सुजलाम सुफलाम करून दाखवील.  देशाचं भविष्य उज्ज्वल करण्याचं माझं स्वप्न चव्हाण महाराष्ट्रात साकार करीत आहेत.  मराठवाड्यातील जनतेवर अन्याय-अत्याचार झाले याची मला जाणीव आहे.  तुम्हाला शिक्षणापासून वंचित राहावं लागलं त्यामुळं तुमचा विकास होऊ शकला नाही.  आता या संधीचा फायदा घेऊन तुम्ही स्वतःचा विकास करून घ्याल अशी मी अपेक्षा बाळगतो.''

शिक्षणापासून कुणी वंचित राहू नये म्हणून साहेबांनी शासनाची तिजोरी गोरगरिबांच्या शिक्षणासाठी उघडी केली.  उच्च शिक्षणाचे दरवाजे सर्वांसाठी खुले केले.  या निर्णयावर शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली.  'मास एज्युकेशन की क्लास एज्युकेशन ?'  असा वाद शिक्षणक्षेत्रातील मत्तेफ्दारांनी निर्माण केला.  साहेबांना आपले बंधू गणपतरावांची आठवण झाली.  हे सर्व निर्णय घेण्यामागची प्रेरणा गणपतरावांची आहे.  नादारीच्या अर्जावर धनदांडग्याची शिफारस घेण्यासाठी बंधू गणपतरावांसोबत धनदांडग्यांच्या घरी गेले असता तिथं या दोन्ही बंधूंना त्यांच्याकडून मिळालेली मानहानीकारण वागणूक साहेबांना आठवली.  अशी मानहानीकारक वेळ वंचितांवर येऊ नये म्हणून साहेबांनी शिक्षणक्षेत्रातील मूठभर मत्तेफ्दारांच्या कोल्हेकुईकडे दुर्लक्ष केलं.  गणपतरावांनी आपल्याला वाचावयास दिलेले महात्मा जोतीबा फुले यांचे साहित्य आणि त्यात त्यांनी शिक्षणाबद्दल व्यक्त केलेले विचार साहेबांना आठवले.

''विद्येविना मति गेली,
मतीविना नीती गेली,
नीतीविना गती गेली,
गतिविना वित्त गेले,
वित्तविना शूद्र खचले,
इतके अनर्थ
एका अविद्येने केले.''