ऋणानुबंध (160)

तुम्हाला एक गंमत सांगू? जर पुस्तक वाचण्याचा तुम्हाला नाद असेल, तर आपल्याला आवडलेले पहिले पुस्तक पहिल्यांदा कसे आणि केव्हा वाचले, याची आठवण मनात ताजी असते. ते पुस्तक आपल्या हातात घेऊन कसे कुरवाळले, हे आईला आपले पहिले मूल झाल्यावर कुरवाळताना कसे वाटले असेल, हे विचारा, म्हणजे कळेल. कोल्हापुरातील भुसारी वाड्यातील खोलीत त्या पावसाळी दुपारी मी कादंबरी कशी वाचली, हे आजही माझ्या लक्षात आहे. नव्या को-या पुस्तकाला येणारा सुरेखसा वास कसा येत होता, याचीसुद्धा मला आठवण आहे. मला तर असे वाटते, की भाऊसाहेबांनी 'दोन ध्रुव' हे पुस्तक लिहिले, तेव्हा फार मोठे काम केले. त्यानंतर काही लोकांनी टीका केली, की भाऊसाहेबांचे हे दोन दोन काय आहे? दोन मनं, दोन ध्रुव, हे जे दोन दोन आहे, हे या लोकांना समजले नाही. पण 'दोन ध्रुव' शब्द वाङ्मयीन मराठीत लिहिले गेले, त्याच वेळी आज जे घडत आहे आणि जे घडले पाहिजे, असे आग्रहाने सांगितले जाते आहे, त्याची जाणीव या द्रष्ट्या लेखकाला तेव्हाच झाली होती. दोन ध्रुवांसारखे अंतर असणारी माणसाची जीवने आहेत. शब्दांचे सामर्थ्य फार आहे. मी शब्दांना फार मानतो. त्यांच्यात अस्त्रांचे सामर्थ्य आहे, तसेच प्रकाशाचे तेज आहे. एखादा शब्द कोणी अशा वेळी उच्चारतो, की त्यामध्ये एक विलक्षण सामर्थ्य येते. गांधीजींनी 'क्विट इंडिया' हे शब्द उच्चारले. केवढे सामर्थ्य या दोन शब्दांत होते ! हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या रामायणाचे सर्व सार आहे या शब्दोच्चारात !

केव्हा केव्हा काही शब्द उच्चारले, की सर्व समजल्यासारखे वाटतात. तसेच माझ्यापुरते माझ्या विद्यार्थिदशेत प्रश्न सुटले. ज्या वेळी मी 'दोन ध्रुव' हे नव्या सामाजिक संदर्भात ऐकले व खांडेकरांच्या कादंबरीच्या मुखपृष्ठावर वाचले. हिंदुस्थानातील सर्व प्रश्नांचा मूळ आवाज मी त्या शब्दांत ऐकला. पृथ्वीचे दोन ध्रुव एकत्र येतील, की नाही, हे माहीत नाही, अर्थात येणार नाहीत. पण समाजजीवनात निर्माण झालेले हे विषमतेचे ध्रुव नाहीसे करणे हे मानवतेचे आजचे काम आहे. खांडेकरांनी हा विचार आपल्या साहित्यात मांडण्याचा या वेळी प्रयत्न केला, ही महत्त्वाची गोष्ट आहे.

भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक रूपे आहेत. लेखक हा बहुरूपी आहे, असे त्यांनीच म्हटले आहे. वाङ्मय किंवा ललित साहित्य म्हणजे काय? ते कशासारखे आहे? त्यांनी आपल्या एका भाषणात सांगितले आहे, की ललित साहित्य अनंत व गंभीर अशा समुद्रासारखे आहे. सागर केव्हा, कशी रूपे घेतो, हे कळत नाही. कधी ओसरलेला असतो, तर कधी उफाळलेला, कधी शांत, तर कधी रौद्ररूप धारण केलेला. पण त्याच्या पोटात काय असते? पोटात कधी रत्ने असतात, कधी शार्क मासे. पोटात - तळाशी तेलही असते. रत्ने असतात, म्हणून त्याला रत्नाकरही म्हणतात. अशा अनेकविध रूपांत तो असतो.

लेखक या नात्याने भाऊसाहेब तसे बहुरूपी आहेत. त्यांनी गुजगोष्टी लिहिल्या आहेत, कथा लिहिल्या आहेत. भाषणे केली आहेत, टीकाकार म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. त्यांची किती रूपे आहेत! कादंबरीकार ते नंतर झाले. कादंबरीकार म्हणून, 'ययाति'-कार म्हणून, ते आज आपल्या डोळ्यांपुढे आहेत. मानवतावादी कलाकार हे जे त्यांचे रूप आहे, ते माझ्या मताने अतिशय महत्त्वाचे असे रूप आहे.